देशात सांप्रदायिक विचार वाढणे ही चिंतेची बाब :शरद पवार
‘पुण्यभूषण पुरस्कार’ भाई वैद्य यांना शरद यादव यांच्या हस्ते प्रदान
पुणे :
सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’(त्रिदल, पुणे) यांच्या वतीने दिला जाणारा 28 वा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कार्यकर्ते भाई वैद्य यांना ज्येष्ठ समाजवादी नेते खासदार शरद यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रविवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदीर येथे झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शरद यादव उपस्थित होते.
एक लाख रूपये रोख आणि बालशिवाजींची पुण्याची भूमी सोन्याच्या फाळाने नांगरित असलेली प्रतिमाया स्मृतिचिन्हाने या वर्षीचे पुण्यभूषण पुरस्कारार्थी भाई वैद्य यांना गौरविण्यात आले.
या पुरस्काराबरोबर सहा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचाही गौरव करण्यात आला . यामध्ये शंकर बुरुंगले, बाबुराव पाटील (किवळकर), यशवंत नामजोशी, बाळासाहेब जांभूळकर, अरविंद मनोलकर, दत्ता गांधी यांचा समावेश होता.
यावेळी प्रमुख पाहुणे खासदार शरद यादव म्हणाले ,’ सध्या बिकट परिस्थिती देशात आणि काश्मीर मध्येही आहे . सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे ,मात्र देशात विषमता आहे ,अनेक भागात शतकांपूर्वीची अवस्था आहे . आजूबाजूला पाहताना चीन ,युरोप ची प्रगती अधिक झालेली आढळते . तरीही आपला देश पुढे जात असल्याचे सांगितले जाते . आदिवासी ,शेतकरी ,दलितांची वाईट अवस्था आहे . देशाची संपूर्ण प्रगती होण्यासाठी समतापूर्ण विकासाची गरज आहे .
आताच्या परिस्थितीत सत्य बोलणेही सध्या अवघड झाले आहे ,लगेच भावनांना धक्का बसल्याचे सांगून वेढा घातला जातो . लोकांच्या बोलण्यात कट्टरता आली आहे . अशा परिस्थितीत देशाला पुढे नेण्याचा विचार मांडला जात नाही . म्हणून पुण्याने नवा इन्किलाब घेऊन पुढे आले पाहिजे . ‘
जयप्रकाश नारायण ,एसेम जोशी यांच्यासमवेत काम करणाऱ्या भाई वैद्य यांचा गौरव होतोय ,ही आनंदाची बाब आहे असेही त्यांनी नमूद केले
अध्यक्षस्थानावरून बोलताना शरद पवार यांनी भाई वैद्य यांच्यासमवेतच्या कामाला उजाळा देत अखंड कार्यरत राहण्याच्या गुणाचे कौतुक केले . अनेक दिग्गजांबरोबर काम करण्याचा आनंद भाई वैद्य याना मिळाल्याचे त्यांनी सांगितले . ते म्हणाले ,’ साम्यवाद हा विचार म्हणून चांगला असला तरी व्यवहारात गरिबीचे वाटप करण्याऐवजी समाजात संपत्ती निर्मितीची वाढ होणे गरजेचे असते . धोरणात्मक वास्तवात गरजेची असते ,हे समाजवादी चौकटीतील मंडळीना पटत नाही . पुण्याच्या परिसरात झालेल्या औद्योगिक विकासाने हजारोंना रोजगार मिळाले ,हे या संदर्भात लक्षात ठेवले पाहिजे . मात्र येणाऱ्या गुंतवणुकीला ,औधोगिकीकरणाला मानवी चेहरा दिला की चिंता करण्याचे कारण राहणार नाही .
देशात सांप्रदायिक विचार वाढणे ही चिंतेची बाब आहे,सतर्क राहिले पाहिजे ,गायीला आई म्हणायचे नसेल तर देशात राहायचे नाही काही लोक असे सांगतात ,हा अधिकार त्यांना कोणी दिला ? आई ही आईच असते . गायीचा आपण सन्मान करतो ,पण ,गाय कशी आई असू शकेल ? ही मंडळी या संदर्भातील सावरकरांचा विचार का मांडत नाहीत ?
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना भाई वैद्य म्हणाले ,’ वित्त्तीय भांडवलशाहीत कल्याणकारी भूमिका राहिली नाही . तरीही जगाच्या अनेक कोपऱ्यात समाजवादाची किरणे दिसू लागली आहेत . आर्थिक संपन्नता वाढण्यापेक्षा मानवी विकास निर्देशांक वाढला पाहिजे . राजकीय लोकशाही टिकण्यासाठी आर्थिक -सामाजिक विकसाबरोबर आर्थिक वितरण आणि जातीयता निर्मूलनाचे काम करावे लागेल . संविधान ,समाजवाद ,धर्म निरपेक्षता ,पुढे न्यावी लागेल . ‘
महापौर प्रशांत जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले . प्रास्ताविक डॉ सतीश देसाई यांनी केले ,योगेश देशपांडे यांनी सूत्र संचालन केले तर सुरेश धर्मावत यांनी आभार मानले .