दर्जेदार साहित्य नेहमीच चांगल्या कलाकृती बनविण्यासाठी प्रोत्साहित करीत असतात. याच कारणामुळे नेहमीच जगभरातील ख्यातनाम साहित्यिकांच्या साहित्यावर आधारित सिनेमे बनत असतात. सुप्रसिद्ध लेखक मारिओ पुझो यांची ‘गॉडफादर’ ही कादंबरी या प्रवासातील माईलस्टोन ठरली आहे. जगभरातील विविध भाषांमध्ये जवळजवळ ८० हून अधिक चित्रपट बनणं हेच या कादंबरीचं सर्वात मोठं यश आहे. काहीतरी वेगळ करण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या दिग्दर्शकांना नेहमीच ही कादंबरी खुणावत आली आहे, त्यामुळेच या कादंबरीवर ‘धर्मात्मा’, ‘आतंक ही आतंक’, ‘दयावान’, ‘सरकार’, ‘सरकार राज’, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ आदी हिंदी चित्रपट बनले आहेत.
‘येडयांची जत्रा’, ‘फोर इडियट्स’, ‘जस्ट गंमत’, ‘शिनमा’, ‘1234’ या चित्रपटांद्वारे कायम वेगवेगळे विषय हाताळणाऱ्या दिग्दर्शक मिलिंद अरूण कवडे यांनाही मारिओ पुझो यांच्या ‘गॉडफादर’ या कादंबरीने भुरळ घातली
आहे.
मिलिंद कवडे यांनी ‘गॉडफादर’ या कादंबरीवर आधारित असलेला चित्रपट बनविण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. आऊट ऑफ द बॉक्स या बेनरअंतर्गत बनणाऱ्या या चित्रपटाचं शीर्षक ‘रायबा’ असं ठेवण्यात आलं आहे. या
चित्रपटाबाबत बोलताना मिलिंद कवडे म्हणाले, “कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळापासून मला नेहमीच वेगळे विषय खुणावत आले आहेत. त्यामुळे आता कोणत्याही अवघड विषयावर चित्रपट बनविण्याचं आव्हान स्वीकारण्याची सवय झाली आहे. मारिओ पुझो या महान साहित्यिकाने लिहिलेल्या ‘गॉडफादर’ या कादंबरीवर चित्रपट बनवायचा ही खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आता करियरच्या या वळणावर ‘गॉडफादर’वर चित्रपट बनवायचं धाडस केलं आहे. ‘रायबा’च्या रूपात प्रेक्षकांना मराठमोळी कथा पाहायला मिळेल. पुझो यांच्या
कादंबरीचा केवळ मूळ गाभा चित्रपटात घेण्यात आला आहे. त्यावर मराठमोळी कथा रचण्यात आली आहे.
प्रेक्षकांना मराठी मातीतील ‘रायबा’ पाहायला मिळावा यासाठी हा अट्टाहास आहे. माझ्या यापूर्वाच्या चित्रपटांप्रमाणे ‘रायबा’ देखील संगीतप्रधान सिनेमा असेल. “चिमणी उडाली…’’ आणि आगामी “आपला हाथ जगन्नाथ…’’ या गाण्यांच्या तुफान यशानंतर गायक आनंद शिंदे पुन्हा एकदा ‘रायबा’साठी गाणार आहेत.
याशिवाय इतरही श्रवणीय गाणी या चित्रपटात असतील. सध्या पटकथेवर काम सुरू आहे. कलाकारांची निवड अद्याप व्हायची आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात येणार आहे. ‘रायबा’च्या रूपात प्रेक्षकांना पूर्णतः व्यावसायिक चित्रपट पाहायला मिळेल.’’
‘रायबा’ची पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहीली असून ही कथा एका शेतकऱ्याच्या मुलाभोवती गुंफण्यात आली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाचा डॉन बनण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात असेल. सचिन अंधारे या चित्रपटासाठी संवादलेखन करीत आहेत. सध्या या चित्रपटात विविध भूमिका साकारण्यासाठी कलाकारांच्या निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या चित्रपटात मराठीतील जवळजवळ ३० ते ३५ नामवंत कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट नगर, संगमनेर, वाई, कोल्हापूर, अकलूज, पठार यांसारख्या एकूण १६ ते १७ लोकेशन्सवर चित्रीत
करण्याची योजना आखण्यात आली आहे.