पुणे-“पर्यावरण आणि मनुष्याचे नाते जन्मापासून मृत्युपर्यंत जुळलेले असते. जन्मल्यानंतर लाकडाच्या पाळण्यात तुम्हाला झुलवलेले असते. तर मृत्युनंतर तुमचे अंतिम संस्कार तुमच्यावर लाकडांच्या चितेवरच होत असते. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटकात पर्यावरणाचा समावेश आहे. मग आपण त्या पर्यावरणाशी नाते कसे काय तोडू शकतो? पर्यावरणाची हेळसांड केल्याने त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागत आहे. पर्यावरण संवर्धनाचे महत्व अनेक संतांनी शेकडो वर्षांपूर्वीच सांगितले आहे. भगवान महावीरांनीदेखील 2600 वर्षापूर्वी जलसंधारणाचे महत्व सांगितले आहे. तुम्ही देखील पर्यावरणाच्या रक्षाणासाठी पुढाराकार घ्या. पर्यावरणाचा अर्थ केवळ झाडे लावणे, प्राण्यांची शिकार न करणे इतकाच नाही तर पर्यावरणाचा अर्थ एक इंद्रियापासून, पंचइंद्रिय असलेल्या जीवांना जीवनदान देणे हा आहे. एका झाडाला, पक्षांना पाणी द्या, जनावराला अन्न द्या यातूनच संत आहाराचे पुण्य लाभेल,” असा संदेश मुनिश्री प.पु. 108 पुलकसागर महाराज यांनी गुरूवारी दिला.
मुनिश्री प.पू. 108 पुलकसागर महाराज यांचा चार्तुमास पुण्यातील धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी महालक्ष्मी लॉन्स येथे चालू आहे. सकल जैन वर्षायोग समितीतर्फे येथे चातुर्मासानिमित्त आयोजित ज्ञानगंगा महोत्सवातील एकोणीसाव्या पुष्पात मुनिश्री पर्यावरण विषयावर बोलत होते. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष अजित पाटील, सुजाता शहा, जितेंद्र शहा, वीरकुमार शहा, उत्कर्ष गांधी, सुदीन खोत, संजीव नाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी सनीज् वर्ल्डचे चेअरमन व माजी आमदार विनायक निम्हण, ज्येष्ठ कवयित्री अरूणा ढेरे, आज का आनंद वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आनंद अगरवाल व त्यांच्या पत्नी सौ. रितू अगरवाल, गायिका आणि अभिनेत्री सुश्मिता भंडारी, गायक मोहन भंडारी, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना महिला शहरप्रमुख सविता मते, शिवसेना महिला उपशहरप्रमुख कांचन कांबळे यांनी मुनिश्रींना श्रीफळ अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले व प्रवचनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महावीर शहा आणि परिवार यांच्यातर्फे कलशस्थापना करण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड येथील पार्श्वपद्मावती महिला मंडळातर्फे मंगलाचरण सादर करण्यात आले. मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष शोभा धारिवाल यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
मुनिश्री पुढे म्हणाले, मुक्या प्राण्यांची शिकार करून स्वत:ला बहादूर म्हणवणे ही मुर्खता आहे. स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करणे ही अनावश्यक हिंसा आहे. भगवान महावीरांनी यासाठी मनाई केली आहे. युद्ध करायचेच असेल स्वत:मधील वाईट प्रवृत्तींशी करावी. तुमच्याकडे मुबलक पाणी आहे. परंतु दुसरीकडे पाण्याच्या एक एक थेंबासाठी लोक तरसतात. येणार्या काळात जर विश्वयुद्ध झालेच तर ते पाण्यावरूनच होईल. त्यामुळे पाण्याचे महत्व समजून ते जपून वापरा. डोळ्यांमधील अश्रू थांबवायचे असेल तर नळाचे पाणी वाचवून आवश्यक तेवढेच पाणी वापरावे असे ते म्हणाले.
“हिंदू आणि जैन धर्मानुसार अंत्यविधीच्या वेळी लाकडाची चिता बनवली जाते. परंतु त्या चितेचा वापर करण्याचा अधिकार तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात किमान 100 झाडे लावत नाही. पर्यावणाचे रक्षण कराल तरच सुदृढ आयुष्य जगाल” असे मुनिश्रींनी सांगितले.
याप्रसंगी सनीज् वर्ल्डचे चेअरमन व माजी आमदार विनायक निम्हण यांनी मुनिश्री यांना श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. मुनिश्रींनी त्यांना पुस्तके भेट दिली. याप्रसंगी विनायक निम्हण म्हणाले, खडकी येथील जैन संघाच्या माध्यमातून जैन समाजाशी जुळण्याची संधी मला मिळाली. या समाजाचे विचार देशाला दिशा देण्याचे काम करतात. तर अशा विचारांना समाजापर्यंत पोहचविणारे मुनिश्रींच्या दर्शनामुळे नागरिकांसाठी विकासाचा मार्ग खुला होतो.
ज्येष्ठ कवयित्री अरूणा ढेरे यांनी मुनिश्री यांना श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. मुनिश्रींनी त्यांना पुस्तके भेट दिली. याप्रसंगी अरुणा ढेरे म्हणाल्या, भारतीय प्राचीन परंपरेचे मूल्य आजही समाजात खोलवर रूजले आहे. त्यामुळेच जगात अनेक वाईट घटना घडूनही समाज सुदृढपणे चालत आहे. याचे श्रेय या परंपरांना दिले पाहिजे. प्राचीन मौखिक परंपरेचे प्रतीक असणार्या मुनिश्रीसारख्या संतांनी समाजात या मूल्य आणि परंपरांना कायम ठेवले आहेत.
या प्रवचनात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उपाध्यक्ष अजित पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. आर.एम. धारिवाल फाउंडेशनतर्फे धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे मंडपाजवळ 2 सप्टेंबर पर्यंत रक्तदान महायज्ञ सुरू आहे. यानिमित्त आर.एम. धारिवाल फाउंडेशनतर्फे अत्याधुनिक बसही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रविवार दि. 2 सप्टेंबर रोजी ज्ञानगंगा महोत्सवातील मुनिश्रींच्या प्रवचनाचे अखेरचे 22वे पुष्प गुंफले जाईल. त्यानंतर लगेचच सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 यावेळेत जिनशासनाचे महास्तोत्र श्री उवस्सहग्गर स्तोत्र याचे सामुहिक पठन संपन्न होणार आहे. यासाठी पुरूषांसाठी सफेद व महिलांसाठी केसरी वस्त्र हा ड्रेसकोड असणार आहे. भाविकांनी यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष शोभा धारिवाल आणि कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.