नदी पात्रातील रस्त्यांच्या अर्धवट कामांची आयुक्त राव यांनी केली पहाणी
पुणे – जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक, कर्वे रस्ता येथील वाहतूकीची कोंडी कमी करण्यासाठी नदी पात्रातून रस्ता महापालिकेने करण्याचा प्रकल्प तयार हाती घेतला. रस्त्यांची कामेही काही प्रमाणात करून अर्धवट अवस्थेतील रस्ते वाहतुकीसाठी खुले करून वाहतूक कोंडीत भर टाकली. ही कोंडी कमी करण्यासाठी रजपूत झोपडपट्टी ते म्हात्रेपूल डीपीरोड मुख्य रस्त्याला जोडून द्या अशी मागणी आमदार विजय काळे यांनी आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली.
आमदार विजय काळे यांनी आज आयुक्त सौरभ राव यांना नदी पात्रातील रस्त्याची प्रत्यक्षात असलेली अवस्था जागेवर नेऊन दाखवली. त्यावेळी प्रकल्प विभागाचे अतिरिक्त नगर अभियंता श्रीनिवास बोनाला, विकास आराखड्याचे अधीक्षक अभियंता अनिरूद्ध पावसकर, उपायुक्त सुनील केसरी आणि पथ विभागाचे अधिकारी यावेळी त्यांच्या बरोबर होते.बाबा भिडे पूलाकडून एरंडवणेकडे येणारा रस्ता रजपूत झोपडपट्टीवरून ऐंशी फूटी डीपी रस्त्याला जोडण्याचे नियोजन होते. त्यातील शेवटचा १०० ते २०० मीटर रस्त्याच्या तुकडा तयार नसल्याने सर्व वाहने अरूंद रस्त्यावरून एका वस्तीतून कशी येतात हे आयुक्तांना आमदार काळे यांनी प्रत्यक्ष दाखवले.
रजपूत झोपडपट्टी ते म्हात्रेपूल डीपी रोड सारखाचा बाबा भिडे पूल ते वैकुंठ स्मशान भूमी रस्ता कसा अर्धवट अवस्थेत सोडण्यात आला आहे हे आमदार काळे यांनी प्रत्यक्ष जागेवर नेऊन आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. हे दोन्ही रस्ते जोडले गेले तर कर्वे रोड आणि शास्त्री रोडवरील वाहतुकीचा ताण कसा कमी होऊ शकतो ? तसेच हा नदी पात्रातील रस्त्याचा प्रकल्प काय उद्देशाने तयार केला होता ? याचीही महिती आमदार काळे यांनी आयुक्त राव यांना दिली. कर्वे रोडवर आणि नदी पात्रात मेट्रोची कामे सुरू असल्याने वाहतुकीस होणारा अडथळा वाढला असून त्यात दिवसेंदिवस वाढच होत जाणार असल्याचेही आमदार काळे स्पष्ट केले. त्यामुळे या पर्यायी रस्त्यांची फारच आवश्यकता असून कसेही करून हे रस्ते जोडले जाणे आवश्यक असल्याचेही त्यांनी आय़ुक्तांचा निदर्शनास आणून दिले.
नदीपात्रात नव्या आखण्यात आलेल्या निळ्या रेषेत रस्ता येत असल्याने त्याची कामे करता येत नसल्याचे कारण सातत्याने अधिकारी देत होते. मात्र त्याचवेळी मंगल कार्यालयांची तात्पुरती बांधकामे निळ्या रेषेत कशी असा प्रश्न आयुक्त राव यांनी उपस्थित केल्यावर अधिकारी निरूत्तर झाले. सध्या नदी पात्रातून सूचनाही आयुक्तानी केली. नव्याने आखण्यात आलेल्या निळ्या रेषेची अंमलबजावणी कडक होत असल्याने आपण बाबतची बैठक लवकरच घेऊ असेही त्यांनी नमूद केले.