पुणे – खडकवासला धरणाच्या कालव्याच्या दुर्घटनेनंतर आजुबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. पाण्याचा प्रवाह प्रचंड मोठा असल्याने येथील नागरिकांना बाहेर पडणेही अशक्य झाले होते. अशा कठीण परिस्थितीत घरात अडकलेल्या लहान मुलांना स्वतःच्या पाठीवर बसवून बाहेर काढणाऱया पोलीस कर्मचारी नीलम गायकवाड आणि संतोष सुर्यवंशी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
पुण्यातील मुठा कालवा फुटल्यानंतर हे पाणी रहिवाशी वसाहतीत शिरले होते. यावेळी नीलम गायकवाड यांनी प्रचंड वेगाने पाणी वाहत असतानाही ७ ते ८ महिला आणि लहान मुलाला पाठीवर बसवून बाहेर काढले होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनीही त्यांच्या या धाडसाचे कौतूक केले. याशिवाय पोलीस कर्मचारी संतोष सुर्यवंशी यांनीही आपला जीव धोक्यात घालून लहान मुले आणि स्त्रियांना पाण्याबाहेर काढले होते. या दोघांच्या धैर्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.