जगातील सर्वात मोठ्या तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर वर्ल्ड पीस डोमचे लोकार्पण आणि वर्ल्ड पार्लमेंटचे उद्घाटन
पुणे:- भारतीय संस्कृतीने जगाला ”वसुधैव कुटुंबकम” हे तत्वज्ञान दिले. विश्वशांतीसाठी बाह्यशांतीपेक्षा आत्मिक शांतीचे महत्व नव्या पिढीला देण्याचे काम या घुमटाद्वारे होईल. जगात दहशतवादी आणि अशांततेच वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी सर्वांना शांतीची गरज आहे. मानवसेवा हीच खरी माधवसेवा असल्याचा आदर्श घुमटातील 54 पुतळ्यांनी आपल्या कार्यातून जगासमोर ठेवले आहे. जागतिक संस्कृतीचे श्रेष्ठत्व या अशाच विचारात आहे. घुमटाद्वारे वैष्विक संदेश निर्धारित करत जगाला विश्वशांतीचा संदेश देण्याचे काम घुमटाद्वारे होईल, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्तकेले
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्ट, डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे निमित्ताने जगातील सर्वात मोठा घुमट असलेल्या वास्तूमधील तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज विश्व शांती प्रार्थना सभागृह आणि विश्व शांती ग्रंथालयाचा लोकार्पण आणि विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित ‘जागतिक परिषदेचे’ उद्घाटन उपराष्ट्रती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी वर्ल्ड पीस डोम.कॉम या संकेतस्थळाचेही अनावरण करण्यात आले. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, पुण्याच्या महापौर श्रीमती मुक्ता टिळक, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. आर. ए. माशेलकर, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड हे उपस्थित होते.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले, डॉ. विश्वनाथ कराड यांना आध्यात्मिक संस्कार मिळाले. या संस्कारातून त्यांना आंतरिक शांतीची पायवाट सापडली. याच पायवाटीचे त्यांनी शांतीच्या महामार्गात रुपांतर करून जगातील सर्वात मोठी कलाकृती स्थापित करून जगाला सोपवली. आज जगातील दहशतवादी वातावरणात खऱ्या अर्थांने शांतीचा आणि मानवतेचा संदेश देण्याचे काम या घुमटाद्वारे होईल. समजात संकुचित विचाराद्वारे निर्माण होणारी द्वेषभावना बाजूला सारण्यासाठी आपण सारे एकाच ईश्वराची लेकरे आहोत. या भावनेने मानवसेवेला समर्पित होण्याची आज प्रकर्षाने आवश्यकता आहे. भारतीय संस्कृती जगाला उन्नतीचा मार्ग आणि विकासाची दिशा दाखविण्याचे कार्य भविष्यात या घुमटाद्वारे होईल. जगातील एक आश्चर्य म्हणून हे प्रार्थना सभागृह नावारुपाला येईल. सांस्कृतिक वारसा आणि मानव कल्याणाचा शांतीचा संदेश, नवविचारांची कल्पना आणि भारतीय परंपरेचे सुंदर दर्शन या ठिकाणी घडेल.
जगातील हिंसेचा सामना हिंसे नाही, तर अहिंसेने करता येईल. माता, मातृभूमी, मातृभाषा, गुरू आणि देश यांचा सन्मान सर्वांनी करावा आणि एक होऊन सर्वांनी भारतीय संस्कृतीतील शाश्वत मुल्यांचा विचार जगात पोहचवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राचे मुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या घुमटाचे लोकार्पण आज झाले. डॉ. विश्वनाथ कराड यांनी मानव कल्याणासाठी हा घुमट उभारला आहे. ही जगातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नावारुपाला येईल. मानव शांतीसाठी महात्मा गांधी यांनी दिलेले अहिंसा हे महत्वाचे शस्त्र आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी पसायदानाच्या माध्यमातून वाईट विचाराला आळा घालण्याच्या संदेश दिला. त्यांच्याच नावाने जगातील सर्वात मोठ्या घुमटात प्रार्थना सभागृह निर्मिती करण्यात आली, तो जगाला मानवतेचा आणि विश्वशांतीचा संदेश देत राहिल.
प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड म्हणाले, घुमट भविष्यात भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान यांचा प्रतिक म्हणून नावारुपाला येईल. भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांना जगात शांतीचा दूत म्हणून ओळखले जाते. या दोन्ही महान शांतीदूतांची अहिंसा आणि शांतीची वाणी घुमटाच्यामाध्यमातून जगात पसरेल. स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार 21 व्या शतकात भारत विश्वगुरू म्हणून पुढे येईल. घुमट हा त्याचा एक प्रतिक आहे.
डॉ. आर. ए. माशेलकर म्हणाले, जगाला वेगळी कल्पना आणि मानवकल्याणाचा संदेश या गोल घुमटाकार वास्तूच्या माध्यमातून दिला जात आहे. मानवतेच्या अंर्त:मनात शांतीचा नवा मार्ग आणि विकासाची दिशा जगाला देण्याचे काम घुमटाद्वारे होईल.
डॉ. विजय भटकर म्हणाले, हा घुमट मानवकल्याण आणि शांतीचे मंदिर आहे. याठिकाणी विज्ञान आणि अध्यात्माचा संगम आहे. सातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वराने हे ‘विश्वची माझे घर’ हा संदेश संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दिला होता, तोच संदेश आज या विश्वशांती डोमच्या माध्यमातून दिला जात राहिल.
आपल्या प्रस्ताविकात प्रा. राहूल कराड म्हणाले, हा घुमट राष्ट्रीय नसून संपूर्ण विश्वाचा आहे. ज्या प्रकार घुमटाद्वारे शांतीचा संदेश दिला जाईल, तसेच भविष्यात जगातील पर्यटन स्थळ म्हणूनही उद्यास येईल.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड यांनी आभार मानले.