पुणे- मंगेश खराटे या सामान्य कार्यकर्त्याने पानशेत पूरग्रस्तांसाठी सनदशीर मार्गाने ,दीर्घकाळ लढा दिला आणि सर्व प्रश्नांचा यथोचित सामना केला अशा कार्यकर्त्यांवर योग्य जबाबदारी सोपविली गेली पाहिजे असे मत येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
‘कहानी पानशेत पूरग्रस्तांची ‘ या मंगेश खराटे लिखित पुस्तकाचे प्रकाशन श्री . चव्हाण यांच्या हस्ते झाले .यावेळी ते बोलत होते . माजी महसूल आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम , आमदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर ,रमेश बागवे ,माजी आमदार मोहन जोशी, उपमहापौर मुकारी अलगुडे ,माजी महापौर कमल व्यवहारे ,अंकुश काकडे, पिंपरी कॉंग्रेस चे अध्यक्ष सचिन साठे , नरुद्दीन सोमजी , सुनंदा गदाळे,अंजनी निम्हण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्री चव्हाण म्हणाले ,’पानशेत ची धरण फुटी आणि पूर ही देशाच्या इतिहासातली सर्वात मोठ्ठी आपत्ती होती . तोपर्यंत आपत्ती व्यवस्थापन कसे असते याची कोणालाच जाणीव नव्हती . त्यानंतर कोयनेचा , लातूरचा भूकंप , सुनामी, उत्तराखंडमधील भूकंप अशा अनेक आपत्ती देशावर आल्या . पानशेतच्या घटनेनंतर ४ हजार पूरग्रस्तांचा लढा सुरु झाला अत्यंत सनदशीर मार्गाने आणि लोकप्रतिनिधी , मंत्री यांची सहानुभूती असतानाही हा प्रश्न सोडविण्यासाठी ५५ वर्षे लागली ती केवळ शासंदार्बारच्या दप्तर दिरंगाई मुळे. मात्र हि दप्तर दिरंगाई मुद्दामहून केली नव्हती . नियम निकष आणि कागदपत्रांचा खेळ यात अधिकाऱ्यांनी देखील अनेकदा मार्ग सुचविले . आज हा प्रश्न १०० टक्के सुटलेला नसला तरी बहुतांशी सोडवणूक झाली आहे . २०१३ मध्ये आपल्या सरकारमध्ये बाळासाहेब थोरात मंत्री असताना पूरग्रस्तांना मालकी हक्काचे प्राॅपर्टी कार्ड द्यायला सुरुवात झाली .पानशेत पूरग्रस्तांचे नेतृत्व एका सामान्य व्यक्तीने केले याची नोंद कायम राहील ‘
आमदार मेधा कुलकर्णी, मोहन जोशी , बाळासाहेब शिवरकर आणि पतंगराव कदम यांनी हि आपल्या भाषणातून यावेळी मंगेश खराटे यांनी पानशेत पूरग्रस्तांसाठी दिलेल्या लढ्याचे कौतुक केले . . अभिनव शाळेतील १९८० च्या वर्गातील शालेय मित्रांनी आणि पूरग्रस्त वसाहत क्रमांक १० च्या वतीने तलवार देवून यावेळी खराटे यांचा सत्कार करण्यात आला .
मंगेश खराटे यांनी आपल्या भाषणात यावेळी सांगितले कि ,पूरग्रस्त असूनही मी अपघाताने २००१ साली या लढ्यात उतरलो . शिवरकर, पतंगराव कदम ,मंत्री गिरीश बापट आणि सध्या आ.मेधा कुलकर्णी यांनी हि या प्रश्नाची तड लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा चालविला आहे . पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थाने या प्रश्नाची सोडवणूक मालकी हक्काचे प्राॅपर्टी कार्ड देवून करण्यास प्रारंभ झाला .या पुस्तकात सर्व बाजूने हा लढा आपण साकारण्याचा प्रयत्न केला आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले तर आभार किरण गायकवाड यांनी मानले .