ग्रामीण भागातील ‘स्टार्ट अप’ला संधी नाही
पुणे : ‘महाराष्ट्र राज्य इनोव्हेटिव्ह सोसायटी’ आणि राज्य सरकार च्या वतीने राज्यातील पहिल्याच स्टार्ट अप सप्ताहास सुरुवात झाली आहे. या सप्ताहात महाराष्ट्राबाहेरील उद्योजकांचीच वर्णी लावल्याचे दिसून येत आहे. या प्रक्रियेत राज्य शासनाने मराठी तरुणांचा विचार न करता केवळ परप्रांतीयांनाच संधी देऊन महाराष्ट्रातील नवउद्योजकांना दूर ठेवण्यात आले आहे. या सर्व घटनेबाबत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ आंदोलन करणार आहे, असे ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ चे राज्य उपाध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी या पत्राद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या कौशल्यविकास व उद्योजकता विभागांतर्गत स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य इनोव्हेटिव्ह सोसायटी’तर्फे आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्याच स्टार्ट अप सप्ताहात महाराष्ट्राबाहेरील उद्योजकांचीच वर्णी लावल्याचे दिसून येत आहे.
100 पैकी 36 उद्योग हे कर्नाटक, गुजरात, राजस्थान, दिल्ली, तेलंगणा इ. राज्यातील आहेत. तर 51 स्टार्ट अप चे संचालक परप्रांतीय आहेत, हे धक्कादायक आहे. मराठी उद्योजकांवर केलेला हा अन्याय आहे, असे अॅड. गणेश सातपुते यांनी म्हटले आहे.
ज्या 100 उद्योगांना यात निवडण्यात आले आहे. त्यातील अनेक उद्योजक यापूर्वीपासूनच उद्योगात कार्यरत आहे. यापैकी काही उद्योजकांनी यापूर्वीच शासनाच्या योजनेअंतर्गत कर्ज घेतली आहेत. ‘स्टार्ट अप महाराष्ट्र’ या योजनेत नवीन तरुणांना संधी मिळावी हे धोरण असताना यापूर्वीच्या उद्योजकांपैकीच 24 भाजपाच्या विविध आघाड्यांशी संबंधित उद्योगांनाच यात स्थान दिल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रातील स्टार्ट अप योजनेतील लाखो रुपये परप्रांतीय उद्योगांना व उद्योजकांना देऊन भाजपाचे सरकार मराठी नवउद्योजकांना व्यवसायातून हद्दपार करण्याचे काम या माध्यमातून करीत आहे, असा आरोप अॅड. सातपुते यांनी पत्रकात केला आहे.
दि. 25 ते 29 जून या काळात होणार्या स्टार्ट अप सप्ताहात सहभागी होण्यासाठी 5 जूनपर्यंत अर्ज मागविले होते त्यातून निवडण्यात आलेल्या 100 स्टार्टअपसाठी त्यांच्या उत्पादनांचे किंवा सेवेचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
या सर्व बाबतीत ‘महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’ या संस्थेलासुद्धा डावलण्यात आले असून, ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या वेळेला सुद्धा राज्य शासनाने या संस्थेला विश्वासात घेतले नव्हते.
ग्रामीण भागात अनेक चांगले स्टार्ट अप आहेत ज्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. परंतु या स्टार्ट अप पर्यंत या सप्ताहाची माहिती पोहोचली नाही. तरी मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असून, या विरोधात आंदोलन करणार आहोत असे अॅड. गणेश सातपुते यांनी सांगितले.