मुंबई- ‘तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील.असा टोला आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधताना आपल्या सहकारी पक्षांना विशेषतः कॉंग्रेसला लगावला आहे. हे संबोधन करत असताना त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत विरोधकांनाहि सुनावले आहे. तसेच भाजपवरही टोलेबाजी केली आहे.
“माझ्या शिवसेना कुटुंबातील माता भगिनी आणि बंधुंशी संवाद साधत आहे. त्यामुळे काही काळ मी मुख्यमंत्रिपद बाजूला ठेवतो आणि शिवसैनिकांशी संवाद आहे. जुन्या फळीतील शिवसैनिक मला मार्गदर्शन करत आहे. शिवसेनेच्या कार्यकाळात तीन दिवस खूप महत्त्वाचे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस, शिवसेनेचा वर्धापन दिवस आणि मार्मिकचा वर्धापन दिवस हे तीन दिवस महत्त्वाचे आहेत.” असं त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं.
ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्रिपदाची झूल बाजूला ठेवून मी आज तुमच्याशी संवाद साधत आहे. मी 55 वर्षांच्या वाटचालीचे श्रेय ज्यांनी ज्यांनी शिवसेना जोपासली, वाढवली, त्या सर्व शिवसैनिकांना जाते. या सर्व शिवसैनिकांना माझे अभिवादन आहे. माझ्या शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा, अशा शुभेच्छा देतानाच गेल्या दीड वर्षात आपले काम बोलत आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.
“अनेकांच्या पोटात दुखतंय. पण शिवसेना त्यांना औषध देतंय. मी अनेकांचं अंतर्मन पाहिलं आहे. त्यामुळे अनुभवाचं गाठोडं घेऊन पुढे जात आहे. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. आपण पण स्वबळाचा नारा देऊ. न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. अन्याय होतोय आणि न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ नाही. तलवार उचलण्याची हिम्मत नाही. आधी तलवार उचलण्याची ताकद तर कमव. मग वार कर. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात जातात. जय पराजय होत असतो. कोण हारतं कोण जिंकतं. जिंकलं तर आनंद आहे. पण हारल्यानंतर सुद्धा पराभूत मानसिकता घात करते.” असा अप्रत्यक्षरित्या टोमणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला मारला.
“गेल्या निवडणुकीत दुर्दैवाने जे पराभूत झाले त्यांच्याशी मी संवाद साधला. त्यांना सांगितलं आपल्या समोरचा पराभूत हा शब्द काढा. पराभव हा निवडणुकीत झाला आहे. आपण मनाने खचलो नाही आहोत. मनाने खचला तो संपला. ते जे बळ आहे ते स्वबळ आहे. गेल्या ५५ वर्षात अनेक संकटं आली. आज सुद्धा संकटाचा सामना करतो. संकटाला मी घाबरलो तर मी शिवसैनिक कसा? संकटाला मी घाबरलो तर शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेब मला माफ करणार नाहीत.संकटाच्या छाताडावर चालून जा. संकटावर चालून जायचं असेल तर आत्मविश्वास पाहीजे आणि स्वबळ पाहीजे. उद्धव ठाकरेंनी दिला स्वबळाचा नारा, नारा नाही हा आमचा हक्क आहे. आमचा अधिकार आहे. तो केवळ निवडणुकांशी संबंधित नाही. तर अन्यायाविरुद्ध वार करण्यासाठी आहे.” असं त्यांनी शिवसैनिकांना सांगितलं.
“शिवसेना जेव्हा नव्हती तेव्हा कार्यालयातील खिडक्या, दरवाजे मराठी माणसांसाठी बंद होत्या. त्या बंद दरवाज्यावर धडक मारून, तोडून कार्यालयात मराठी माणसं घुसवली. आणि त्यांना न्याय मिळवून दिला. हे शिवसेनेचं कतृत्व मनगटात ताकद नसती तर काहीच होऊ शकलं नसतं. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला त्याच्या मनगटातल्या ताकदीची जाणीव करून दिली. त्यानंतर मराठी माणूस पेटून उठला. हा शिवसेनेचा इतिहास आहे. शिवसेनाप्रमुखाच्या लक्षात हिंदुत्वावर संकट आलं आहे. तेव्हा त्यांनी गर्व से कहो हम हिंदू है, असा नारा दिला. शिवसेनेने मराठी आणि हिंदुंना आधार दिला. हिंदुत्व आमचं राष्ट्रीयत्व आहे.आपण मराठी आहेत. कोण गुजराती आहे. आणखी कोण आहे. देशाचा पाया हा प्रादेशिक आस्मितेचा आहे. प्रादेशिक आस्मितेवर जर घाला आला. तर तडाके बसल्याशिवाय राहणार नाही. ” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
“करोनाच्या काळातही शिवसेना पुढे सरसावली आहे. आपल्या महाराष्ट्रात तशा निवडणुका नाहीत. बंगालच्या ज्या निवडणुका झाल्या. स्वबळाचा अर्थ निवडणुका नुसतं जिंकणं नाही. ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी लढल्या आणि जिंकल्या. मला त्यांच्यासोबत बंगाली जनतेचं कौतुक करायचं आहे. याला म्हणतात स्वबळ. त्यांनी बंगालची ताकद दाखवून दिली. निवडणुका होतात निवडणुका जातात. कोण हरलं कोण जिंकलं. हा विषय गौण आहे. ज्या पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये अनेक आरोप अनेक हल्ले झाले. अंगावर झेलून सुद्धा बंगाली माणसाने आपलं मत निर्भिडपणाने मांडलं. त्याला म्हणतात खरं बळ. ज्या बंगालने स्वातंत्र्यांच्या वंदे मातरमचा मंत्र दिला होता. त्याच बंगालचे दाखवून दिलं.”, पश्चिम बंगाल निवडणूक निकालावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं कौतुक करताना भाजपाला टोला हाणला.
भाजपला राजकीय औषध देणार
यावेळी भाजपला टोला लगावताना मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्ष हा सत्तेसाठी कासावीस झालेला आहे. त्यांना सत्तेची पोटदुखी झालेली आहे. त्यांना मीच राजकीय औषध देणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
स्वबळाचा नारा देणाऱ्यांनाही लगावला टोला
उद्धव ठाकरेंनी बोलताना स्वबळाचा नारा देणाऱ्यांनाही टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देस असल्याचे दिसत आहे. आपणही देऊ, ताकद दाखायलाच हवी. आपले बळ असायलाच हवे. स्वत:चे बळ आणि आत्मविश्वास असायला हवा. स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला टोला लगावत मुख्यमंत्री म्हणाले की, ‘तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील.’
बाळासाहेबांनी मराठी माणसाला स्वाभिमान दिला
आत्मबळ आणि स्वबळ हे शिवसेनेने दिलेले आहे. मुंबईमध्ये मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती. अपमानजनक जीवन होते, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवत असताना मराठी माणसाला स्वाभिमान दिला आहे. स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचे, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवे असते. असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.