मुंबई-“कितीही अफजल खान आले, तरी घाबरणार नाही”, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.उस्मानाबादमधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सोबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या लढाईत विजय आमचाच होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उस्मानाबादमधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत आज प्रवेश केला असून, त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, विजय आपलाच होणार, मला आई भवानीवर पूर्णपणे विश्वास आहे. खरी शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, दसऱ्याला तर आपण भेटणारच आहोत. एक चांगली सुरुवात झाली असून, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मला न्याय देवतेवर विश्वास आहे त्यामुळे न्याय आपल्याला मिळालाच पाहिजे.
एकीकडे शिवसेनेत इनकमिंग सुरू असली तरी दुसरीकडे मात्र, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावली सारखा मागे उभे राहणाऱ्या चंपासिंह थापा (वय 60) यांनी सोमवारी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेबांचा विश्वासू असलेल्या चंपासिंह थापांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेनेने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. थापा यांना शिंदेंनी पैसे दिले असतील, त्यामुळे ते त्यांच्यासोबत गेले असतील, असा आरोप शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.