पुणे- शरद पवार माझे हिरो आहेत ;अजित पवारांची सात्विक मूर्ती कायम उजळत राहो ; ‘माणिकचंद ‘च्या वाटेला न गेल्याने तरुण राहिलो … असे मार्मिक टोले आज अभिनेता नाना पाटेकर यांनी यावेळी लगावले .तर २५० कोटीचे काम ७ कोटी त केले असाही उच्चार यावेळी त्यांनी केला .
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, अॅड.भास्कर आव्हाड, माणिकचंद समुहाचे रसिकलाल धारिवाल आणि डॉ.शरद हार्डिकर यांना अजित पवारांच्या हस्ते गणेश कला क्रीडा मंच येथे गुरुजन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी महापौर प्रशांत जगताप,राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण,माजी उपमहापौर दीपक मानकर , स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नाना पाटेकर म्हणाले .’राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबध आहेत. त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही, त्यांच्याकडे मी माझ्या चित्रपटसृष्टीच्या कारकिर्दीच्या सुरवातीपासून पहात आलोय. त्यामुळे ते माझे हिरो आहेत नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळी भागातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटूंबियांना मदत करण्यात आली. पावसाळयापूर्वी दुष्काळी भागातील जवळपास ५४० किलोमीटर परिसरातील ओढे-नाल्यांची कामे करण्यात आली. त्यामुळे पावसाचे पाणी साठण्यास सुरवात झाली. शासनाला हेच काम करण्यासाठी किमान २५० कोटींचा खर्च आला असता. नाम ने केलेल्या या कामाला फक्त ७ कोटींचा खर्च आला. याचे श्रेय राज्यातील जनतेला आहे. त्यांच्यामुळे हे सर्व शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी नाना पाटेकर आणि अजित पवार यांच्यातील मार्मिक टोलेबाजी उपस्थित नागरिकांना ऐकायला मिळाली.
या कार्यक्रमात माणिकचंद समुहाचे सर्वेसर्वा रसिक धारिवाल हे उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातीलाच नाना पाटेकर यांनी मी ‘माणिकचंदच्या’ (कदाचित त्यांना गुटख्याच्या म्हणायचे असेल ) वाटेला न गेल्याने तरुण राहिलो असे वक्तव्य करताच सर्वांचे लक्ष रसिकलाल धारिवाल यांच्याकडे गेले.त्यानंतर अजित पवार यांचे भाषण नेहमीच वादाच्या भोव-यात असल्याचा धागा पकडत त्यांना उद्देशून नाना म्हणाले, अजित पवार यांचे आजचे विद्वत्तापूर्वक भाषण ऐकून मी गहिवरलो… असा मार्मिक टोला त्यांनी लगावून , अजित, तुझी सात्विक मूर्ती कायम उजळत राहो असेही म्हटले .
यावेळी अजित पवार म्हणाले की, आजचे पुरस्कारार्थी असलेल्या या गुरुजनांनी देशाला घडवण्याचे काम केले आहे. यांच्या कडून समाजातील प्रत्येक व्यक्तीला नेहमीच प्रेरणा मिळत असते. यांच्यातील नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशनने केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा सरकारपेक्षा त्यांच्यावरच जास्त विश्वास असल्याचे पहायला मिळते. अशा शब्दात त्यांनी नाम फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव त्यांनी केला.