‘विसर्जन मिरवणुकीतून द्या पर्यावरण जनजागृतीचा संदेश’ : खा.वंदना चव्हाण
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी पुण्यातील गणेश मंडळांना पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करण्याबाबत आवाहन केले आहे. या आशयाचे पत्र त्यांनी मंडळांच्या अध्यक्षांना स्वहस्ते देऊन ‘पर्यावरणपूरक गणेश उत्सव’ जनजागृती बाबत सूचना केल्या आहेत. गणेश मंडळांद्वारे वर्षभरात आयोजित सार्वजनिक कार्यक्रमांद्वारे नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाचे संदेश पोहोचू शकतात, त्यामुळे अधिकाधिक मंडळांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन देखील या पत्रातून करण्यात आले आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीतून देखील पर्यावरण रक्षण जनजागृती संदेश मंडळांनी द्यावा.
यामध्ये कसबा, पर्वती, कॅन्टॉनमेंट, शिवाजीनगर, हडपसर या पाच विधानसभा मतदार संघातील गणेश मंडळाच्या अध्यक्षांना पत्र देऊन आवाहन करण्यात आले आहे. एकोपा आणि पर्यावरण रक्षण याबाबी लक्षात घेऊन गणेशोत्सव साजरा करणार्या गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेली दोन वर्ष सत्कार केला जात आहे.
दिलेल्या पत्रात नमुद केल्याप्रमाणे,
गणपती उत्सव हा आपल्याला उत्साह व समजासाठी/शहरासाठी/देशासाठी अधिक काम करण्याची प्रेरणा देणारा असा सण असल्याचे आपण मानतो. गणपती उत्सवाच्या निमित्ताने गणरायाची भक्तीभावाने पूजा करीत असताना सांघिकरीत्या समविचारी मंडळीना एकत्रित आणून अधिक एकजूट घडवण्यासाठी आणि समाजसेवा करण्यासाठी सुद्धा उत्सव कारणीभूत ठरतो.
अनेक मंडळे उत्सावानंतरसुद्धा अनेक सामाज उपयोगी उपक्रमात कार्यक्रमात सहभागी होत असतात त्यात तुमच्या मंडळाचा देखील सिंहाचा वाटा आहे. प्रदूषणापासून होणार्या दुष्परिणामामुळे आज लहान वयातच आपली मुले आजारी पडायला लागली आहेत. पृथ्वी वर हवामान बदलाचे (Global Warming/Climate Change) चे भीषण संकट उभे ठाकले आहे. यासाठी आपल्या सर्वांनाच आपले कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न करावं लागणार आहे, असे केले नाही तर आपली मुले, आपली भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही.
आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे की, आपण आपल्या मंडळांच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढाकार घ्या. यासाठी आपल्या मंडळांच्या माध्यमातून आपण आपल्या परिसरामध्ये खालील प्रमाणे नागरीकांमध्ये जनजागृती निश्चितच करू शकता –
1. ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी नागरिकांना अधिक प्रवृत्त करा.
2. शक्य असल्यास आपल्याच घरी/ बिल्डींग/ बंगल्यामध्ये कचरा नैसर्गिकरीत्या जीरवण्यासाठी पुढाकार घ्या
3. जिथे शक्य असेल तेथे Rain Water Harvesting साठी पुढाकार घ्या
4. झाडे लावा व अस्तित्वात असणारया झाडांचे संवर्धन करा.आपल्या परिसरात अनाधिकृत झाडे तोड होत असल्यास त्या विरोधात आवाज उठवा.
5. पाण्याचा जपून वापर करा.
6. पुण्याची नदी स्वच्छ रहावी यासाठी सार्वत्रिक प्रयत्न गरजेचे आहे त्यासाठी आपण स्वच्छता मोहीम राबवावी.
7. आपल्या गाडीचा / दुचाकीचा कमीत कमी वापर करा.
8. लाईट चा वापर सुद्धा कमीत कमी कसा होईल ह्या कडे लक्ष द्या जमल्यास solar / wind energy चा वापार करा
या आणि अशा अनेक गोष्टी कराव्या लागतील ही पृथ्वी वाचवण्यासाठी ह्या गणेश उत्सवानंतर सुद्धा हे कार्य आपल्याकडून घडो ही विनंती…