मराठा आरक्षणावर जरांगेंना पुनर्विचाराचे आवाहन; दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरेंवरही निशाणा
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील, समान नागरी कायदा आणि दिशा सालियन प्रकरण या मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. राज्यात समान नागरी कायद्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो, असे संकेत त्यांनी दिले. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे म्हणाले की, सरकार सुरुवातीपासूनच मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत आले आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आपल्या नेतृत्वाखालील सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय ५ हजार ३०० प्रलंबित नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात आला, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली तसेच कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना प्रमाणपत्रे देण्यासाठी शिंदे समितीच्या माध्यमातून काम करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. सरकार प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत असेल तर मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.
सध्या मुंबईत गणेशोत्सवामुळे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जरांगे यांनी मुंबईत येण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.
समान नागरी कायद्याबाबत काय म्हणाले शिंदे?
राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याबाबतही शिंदे यांनी महत्त्वाचे संकेत दिले. एका देशात आणि एका राज्यात सर्वांसाठी समान कायदा असावा, ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती आणि आम्ही त्यांचेच विचार पुढे नेत आहोत, असे ते म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही समान नागरी कायद्याबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याचा उल्लेख करत, सर्व नागरिकांना समान हक्क आणि न्याय मिळावा यासाठी महायुती सरकार राज्यात UCCबाबत लवकरच निर्णय घेईल, असे शिंदे यांनी सांगितले.
दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरेंवर निशाणा
दिशा सालियन प्रकरणावरूनही शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. या प्रकरणात सीबीआयकडून एफआयआर दाखल झाल्याचा दावा करत, त्यानंतर ठाकरे पिता-पुत्रांमध्ये अस्वस्थता दिसत असल्याचे शिंदे म्हणाले.
या प्रकरणात तपास यंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

