वारंवार होणाऱ्या अपघातांवरून प्रशासनाला जाब; रस्त्याचे रखडलेले काम आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
पुणे, दि. १० सप्टेंबर : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सातत्याने होणाऱ्या जीवघेण्या अपघातांचा मुद्दा आज पुणे महापालिकेच्या मुख्यसभेत जोरदारपणे उपस्थित झाला. महापालिकेतील विरोधी पक्षनेते ॲड. निलेश निकम यांनी या रस्त्याची अवस्था गंभीर असल्याचे सांगत “कात्रज-कोंढवा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे”, अशा शब्दांत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला.
कात्रज चौक ते खडीमशिन चौक या मार्गावरील अपूर्ण रस्ता रुंदीकरण, ठिकठिकाणी सुरू असलेली कामे, खड्डे, धोकादायक यू-टर्न आणि अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावरील वाहतूक यामुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा मुद्दा मुख्यसभेत मांडण्यात आला. उपलब्ध आकडेवारीनुसार गेल्या साडेचार वर्षांत या सुमारे साडेतीन किलोमीटरच्या पट्ट्यात ५१ अपघात झाले असून २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
याच रस्त्यावर ८ सप्टेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातात दहावीत शिकणाऱ्या प्रतिभा नाईक या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. वडील आणि बहिणीसोबत दुचाकीवरून जात असताना कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेनंतर कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
निकम यांनी मुख्यसभेत नागरिकांचे बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित करत रस्त्यावरील धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली. रस्त्याचे काम वर्षानुवर्षे रखडत असेल आणि त्याची किंमत नागरिकांना जीव देऊन चुकवावी लागत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. महापालिकेने हा रस्ता सध्याच्या सुमारे १८ ते २४ मीटर रुंदीवरून अधिक रुंद करण्याचे नियोजन केले असले, तरी भूसंपादनासह विविध अडचणींमुळे कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही. परिणामी, बांधकाम सुरू असलेला हा मार्ग वाहनचालकांसाठी अधिक धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे.
विशेषतः दुचाकीस्वार आणि अवजड वाहनांच्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता वाहतूक नियोजन, यू-टर्नची रचना, रस्त्यावरील खड्डे, बॅरिकेडिंग, प्रकाशव्यवस्था आणि अवजड वाहनांवर नियंत्रण याबाबत प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे मुख्यसभेतील चर्चेतून अधोरेखित झाले.
“रस्ता विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च होत असताना नागरिकांचे जीव मात्र वाचत नसतील तर या विकासाचा उपयोग काय?” असा सवाल उपस्थित करत विरोधी पक्षनेते निलेश निकम यांनी कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
आता मुख्यसभेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महापालिका प्रशासन कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी नेमक्या कोणत्या तातडीच्या उपाययोजना करते आणि रखडलेल्या कामाला किती वेग देते, याकडे कात्रज-कोंढवा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

