पुणे : द. मा. मिरासदार हे अत्यंत अभ्यासू आणि विलक्षण प्रसन्न व्यक्तिमत्त्व होते. त्यांची प्रसन्नता चेहऱ्यावरील रेषेरेषेत आणि उच्चारांमध्ये झळकायची. मिरासदार आणि गरवारे महाविद्यालयातील गुरुजनांनी आम्हाला बहुश्रुतता देत घडविले आहे. महाविद्यालयातूनच वाचन, चर्चा करण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे द. मा. मिरासदार यांच्या आठवणी फक्त जन्मशताब्दी वर्षातच नव्हे तर पुढेही सातत्याने जागविल्या जातील, असे प्रतिपादन गरवारे महाविद्यालयातील माजी विद्यार्थी आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
सुप्रसिद्ध साहित्यिक व मएसो गरवारे वाणिज्य महाविद्यालयातील माजी प्राध्यापक, प्रा. द. मा. मिरासदार यांची जन्मशताब्दी तसेच गरवारे महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवानिमित्त महाविद्यालयातील ग्रंथालय वाचन कक्षाचे ‘प्रा. द. मा. मिरासदार ग्रंथदालन’ नामकरण करण्यात आले. त्या वेळी प्रकाश जावडेकर बोलत होते.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे (स्वायत्त) शनिवारी (दि. ५) महाविद्यालयातील स्वा. सावरकर सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. भाजपाचे सरचिटणीस, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक राजेश पांडे, मएसो नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, प्रा. द. मा. मिरासदार जन्मशताब्दी समितीचे निमंत्रक हरीभाऊ मिरासदार, प्राचार्य डॉ. किशोर देसर्डा मंचावर होते.
सुरुवातीस महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक वामन प्रभाकर भावे, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
द. मा. मिरासदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार, मकरंद टिल्लू, मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, मंगला गोडबोले, सुनील महाजन, मेहता पब्लिशिंग हाऊसचे अखिल मेहता, ग्रंथपाल अश्विनी ठाकूर यांच्यासह मिरासदार परिवारातील सुहृद यांची उपस्थिती होती. रवींद्र मंकणी निर्मित व प्रसाद मिरासदार दिग्दर्शित ‘माझी मिरासदारी’ हा द. मा. मिरासदार यांच्या जीवनावरील लघुपट दाखवण्यात आला.
प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरेमध्ये मोठी ताकद आहे. देशात अनेक उत्तमोत्तम ग्रंथालये उपलब्ध होती. परंतु मोगल आक्रमकांनी ग्रंथालये नष्ट केली. भारतीय ज्ञानपरंपरा पुढे जतन करण्यासाठी नॅशनल डिजिटल लायब्ररीचा उपक्रम राबविण्यात आला. पुण्यातील ग्रंथालयांमध्ये आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी दिसून येतात ही वस्तुस्थिती आहे. अशा काळात गरवारे महाविद्यालयातील ग्रंथालयास सुमारे २०० विद्यार्थी दररोज भेट देतात याचे कौतुक आहे. आज महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी उपस्थिती कमी असण्याचे कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर असून शिक्षक देखील याचा आधार घेताना दिसतात. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माहितीवर अवलंबून राहणे योग्य नाही. त्याचा वापर व्हावा परंतु तो सजगतेने केला जावा. म्हणूनच आजही ग्रंथालयांचे महत्त्व विशेषत्वाने जाणवते. कारण पुस्तकांद्वारे मिळणारी माहिती ही अधिकृत असते. महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देताना जेन झीच्या आंदोलनाचा मुद्दा अधोरेखित करत प्रकाश जावडेकर म्हणाले, महाविद्यालयातील सायकल स्टँडचे शुल्क अचानक वाढविल्याने आम्ही देखील त्या विरुद्ध आंदोलन करून निषेध नोंदविला, त्यामुळे जेन झी ही संकल्पना आजचीच नाही तर पूर्वापार चालत आलेली आहे.
राजेश पांडे म्हणाले, द. मा. मिरासदार यांचे जन्मशतब्दी वर्ष साजरे करताना महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खूप हसवत उत्तमोत्तम उपक्रम करण्याचा मानस आहे. युवा साहित्यिक, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत संधी देणे आवश्यक आहे. द. मा. मिरासदार यांच्या नावे असलेल्या ग्रंथदालनाला नॅशनल बुक ट्रस्टच्या माध्यमातून विविध भाषांमधील शंभर चांगली पुस्तके उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
गरवारे महाविद्यालयातील आठवणींना उजाळा देत कृष्णकुमार गोयल म्हणाले, द. मा. मिरासदारांनी आपल्या लेखणीतून ग्रामीण जीवन, माणसाचे स्वभाव, समाजातील वास्तव, दैनंदिन जीवनातील गंमती-जमती मिश्किल शैलीत मांडल्या. त्यांच्या साहित्यामध्ये हास्य होते, पण त्या हास्यामागे माणूस आणि समाज समजून घेणारी संवेदनशील दृष्टी होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी साहित्य पोहोचविण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. गरवारे महाविद्लयातील दालनाला द. मा. मिरासदार यांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या स्मृती जतन करतानाच पुढील पिढ्यांना त्यांच्या साहित्यकृतीशी जोडण्याचा उत्तम उपक्रम आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना भूषण गोखले म्हणाले, ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचन संस्कृती पुन्हा एकदा निर्माण करणे आवश्यक आहे. कारण त्यातून मिळणारा आनंद आणि शब्दांमागील अर्थ शोधणे ही विचार करायला लावणारी प्रक्रिया आहे. महाविद्यालयातील ग्रंथ दालनातून विद्यार्थ्यांनी आपली मने उलगडत नेत भरपूर वाचन करावे. डॉ. सुहास जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
राहुल मिरासदार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले तर प्राचार्य किशोर देसर्डा यांनी आभार मानले.

