‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेनंतर प्रशासनाला निर्देश; मृत गणेशसेवकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
मुंबई, दि. २३ : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील गणेशमूर्ती आगमनाच्या सर्व मार्गांची पुढील २४ तासांत पाहणी करून रस्त्यांची स्थिती, आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीत प्रशासकीय पातळीवर कोणाचीही कसूर आढळल्यास संबंधिताला सोडले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भुलेश्वरचा राजा गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गणेशसेवकांच्या कुटुंबीयांची शेलार यांनी रविवारी भेट घेऊन सांत्वन केले. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे आणि बृजेश जोशी यांच्या पार्थिवाचे चंदनवाडी स्मशानभूमीत अंतिम दर्शन घेऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
या दुर्घटनेचे नेमके कारण आणि त्यासाठी जबाबदार कोण, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल, असे शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून त्यांना त्यांचे काम करू दिले पाहिजे. चौकशीतून सर्व बाबी समोर येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशमूर्ती वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॉली, तिच्या चाकांची रचना, लोखंडी भाग तसेच वाहतुकीदरम्यान निर्माण होणाऱ्या कंपनांबाबत गणेश मंडळांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे गणेश मंडळे आणि भाविकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही शेलार यांनी केले.
२४ तासांत आगमन मार्गांची पाहणी
“काल रात्री मी मुंबई महापालिका आयुक्तांशी स्वतः बोललो. मुंबईतील गणेशमूर्ती आगमनाच्या मार्गांची स्थिती तातडीने तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील २४ तासांत या मार्गांवरील रस्त्यांची स्थिती तपासून आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजनांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी,” असे शेलार यांनी सांगितले.
महापालिकेने यापूर्वीही विविध बैठका घेऊन आवश्यक सूचना दिल्या असल्या तरी या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना पुन्हा निर्देश देण्यात आले आहेत. “प्रशासकीय व्यवस्थेत कोणाचीही कसूर आढळल्यास संबंधित व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” असे शेलार यांनी स्पष्ट केले.
मृत गणेशसेवकांना श्रद्धांजली
ही घटना अत्यंत दुर्दैवी असून दुर्घटनेत दोन गणेशसेवकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करत जखमी गणेशसेवक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना शेलार यांनी केली.
दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात येणार असून जखमींवरील उपचारांसाठी संबंधित रुग्णालयांना आवश्यक मदत व आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शेलार यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी वैयक्तिकरित्या पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे देण्यात आलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

