८,२१७ चालकांची तपासणी; मुंबई महानगर प्रदेशात ६०४, तर राज्याच्या इतर भागांत ६६४ चालकांना नोटिसा
मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यवहार्य ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आल्यानंतर परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत राज्यभरातील ८ हजार २१७ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी मराठी भाषेचे पुरेसे व्यवहार्य ज्ञान नसलेल्या १ हजार २६८ चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगर प्रदेशात आतापर्यंत ३ हजार ९९५ रिक्षा-टॅक्सी चालकांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६०४ चालकांना मराठी भाषेचे पुरेसे व्यवहार्य ज्ञान नसल्याचे तपासणीत आढळून आले. या सर्व चालकांना परिवहन विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्याच्या इतर भागांत ६६४ चालकांना नोटीस
मुंबई महानगर प्रदेशाबरोबरच राज्यातील इतर भागांतही ही मोहीम सुरू आहे. राज्याच्या उर्वरित भागांत आतापर्यंत ४ हजार २२२ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६६४ चालकांना नोटीस देण्यात आली आहे.
त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश आणि उर्वरित महाराष्ट्र मिळून एकूण ८ हजार २१७ चालकांची तपासणी, तर १ हजार २६८ चालकांवर नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
“मराठी शिकण्यासाठी वेळ देणार; पण नियमातून सूट नाही”
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या कारवाईबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करताना, मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांबाबत प्रशासन सहानुभूतीची भूमिका घेत असल्याचे सांगितले.
चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आवश्यक वेळ आणि संधी दिली जाणार आहे. मात्र त्यामुळे संबंधित नियमांचे पालन करण्यापासून कोणालाही कायमस्वरूपी सूट मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
३० सप्टेंबरपर्यंत तपासणी मोहीम
मराठी भाषेच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही विशेष तपासणी मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
या मुदतीनंतरही एखादा रिक्षा किंवा टॅक्सी चालक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास संबंधित चालकावर कठोर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला आहे.
सरकारकडून मराठी शिकण्यासाठी मुदत आणि संधी दिली जात असली, तरी निर्धारित नियम टाळण्याची किंवा त्यातून सुटका करून घेण्याची मुभा दिली जाणार नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

