ओडिशात ९ लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे बाधित; सहा जिल्ह्यांसाठी १,००० कोटींचे मदत पॅकेज
नवी दिल्ली, दि. १९ ऑगस्ट : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सलग पावसामुळे अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून घरांमध्येही पाणी शिरले आहे. पावसामुळे वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला असून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.
उत्तर प्रदेशातील पूरस्थितीचाही हजारो नागरिकांना फटका बसला आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांतील १७३ गावे पूरग्रस्त झाली असून सुमारे ८४ हजार ३६२ नागरिक आणि १३ हजार ५८ हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे. आतापर्यंत ४,८०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बदायूं, बहराइच, बलिया, बाराबंकी, बिजनौर, फर्रुखाबाद, गौतम बुद्ध नगर, गोंडा, कासगंज, लखीमपूर खेरी, मुझफ्फरनगर, सीतापूर आणि उन्नाव या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.
बिहारच्या पश्चिम चंपारणमधील बगहा परिसरात गंडक नदीच्या धूपामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून नदीकाठावरील शाळेलाही धोका निर्माण झाला आहे. नदीचा प्रवाह आणि सातत्याने होणाऱ्या धूपेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये दरडीने तीन जणांचा बळी घेतला आहे. सिरमौर जिल्ह्यातील बगंधार परिसरात दरड कोसळून एका ट्रक चालकासह नेपाळमधील दोन मजुरांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे राज्यातील ८८ रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली असून मंडी जिल्ह्यात सर्वाधिक ३२, कुल्लूमध्ये २५ तर सिरमौरमध्ये १० रस्ते बंद आहेत.
उत्तराखंडमध्येही पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पौरी गढवाल जिल्ह्यातील सतपुली परिसरातील मेहर गावात मुसळधार पावसामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, ओडिशामध्ये पुरामुळे सुमारे ९.४ लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. बालासोर, भद्रक, जाजपूर, मयूरभंज, केओंझार आणि केंद्रपाडा या सहा जिल्ह्यांमध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पूरग्रस्त भागांसाठी १,००० कोटी रुपयांचे विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे. बचाव आणि मदतकार्यासाठी ओडीआरएएफ, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांना तैनात करण्यात आले आहे.
आसामच्या जोनाई भागातही पावसामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. २८ जून रोजी केमी नदीवरील पूल खराब झाल्यापासून केमी-जेलाम मिडल इंग्लिश स्कूलमधील अनेक विद्यार्थ्यांना नदी पार करून शाळेत जावे लागत आहे. शाळेतील निम्म्याहून अधिक विद्यार्थी नदीपलीकडील तीन गावांतून येत असल्याचे शिक्षिका भाग्यश्री सैकिया यांनी सांगितले.
देशाच्या विविध भागांतील या परिस्थितीमुळे मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा धोका कायम असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

