वाहनचालक, मेकॅनिक आणि नागरिक मांडणार E20 चे प्रत्यक्ष अनुभव; मायलेज, इंधनखर्च आणि जुन्या वाहनांवरील परिणामांवर सरकारला सवाल
पुणे : E20 पेट्रोलच्या वापराबाबत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, वाहनधारकांचे प्रश्न आणि प्रत्यक्ष अनुभव सरकारसमोर मांडण्यासाठी १४ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात महाराष्ट्र राज्यस्तरीय टाऊन हॉल आयोजित करण्यात आला आहे. प्रत्यक्ष उपस्थिती आणि ऑनलाइन सहभाग अशा संमिश्र स्वरूपात होणाऱ्या या संवादसभेत वाहनचालक, मेकॅनिक आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना आपले अनुभव व प्रश्न मांडता येणार आहेत.
हा टाऊन हॉल सर्वांसाठी खुला, बिगरराजकीय आणि जनतेचे व्यासपीठ असेल, अशी माहिती विजय कुंभार, डॉ. अभिजीत मोरे, अमित म्हस्के, मुकुंद किर्दत, रविराज काळे, संजय कोने, सुदर्शन जगदाळे आणि धनंजय बेनकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
E20 पेट्रोलच्या वापरानंतर वाहनांमध्ये समस्या निर्माण झाल्याचा अनुभव असलेले वाहनचालक, मेकॅनिक तसेच अन्य संबंधित घटक या टाऊन हॉलमध्ये आपले प्रत्यक्ष अनुभव, साक्षी आणि केस स्टडीज मांडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
E20 धोरणाच्या अंमलबजावणीवर प्रश्न
E20 धोरणाची अंमलबजावणी पुरेशी पूर्वतयारी न करता आणि वाहनधारकांच्या हिताचा पुरेसा विचार न करता घाईघाईने करण्यात आली का, हा या टाऊन हॉलमधील प्रमुख मुद्दा असणार आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढल्यानंतर ग्राहकांना त्याचा आर्थिक फायदा झाला का, मायलेजवर नेमका काय परिणाम झाला आणि त्यामुळे वाहनधारकांचा प्रत्यक्ष इंधनखर्च किती बदलला, याबाबतही सरकारने स्पष्टता द्यावी, अशी आयोजकांची मागणी आहे.
जुन्या वाहनांवर E20 चा नेमका परिणाम काय होतो, अशा वाहनांच्या मालकांना कोणते पर्याय उपलब्ध आहेत, वाहनधारकांचे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची आणि E20 धोरणाच्या परिणामांबाबतचे अहवाल व आकडेवारी जनतेसमोर पारदर्शकपणे मांडली जाणार का, असे प्रश्न या सभेत उपस्थित केले जाणार आहेत.
शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल मिश्रणाचे धोरण राबविण्यात येत असल्याचा दावा केला जात असताना, त्यातून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात किती वाढ झाली, याची माहितीही सरकारने जाहीर करावी, अशी मागणी आयोजक करणार आहेत. भारत-अमेरिका व्यापार चर्चेच्या पार्श्वभूमीवर इथेनॉल आयातीबाबत केंद्र सरकारची भूमिका काय आहे, हाही मुद्दा चर्चेला घेतला जाणार आहे.
‘जलद संक्रमणामागील कारणे स्पष्ट करा’
भारताने E20 कडे केलेल्या वेगवान संक्रमणाबाबतही टाऊन हॉलमध्ये चर्चा होणार आहे. E20 चे लक्ष्य पूर्वीच्या २०३० ऐवजी २०२५ पर्यंत पुढे आणण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर, इतक्या वेगाने बदल करण्यामागील कारणे आणि त्या अनुषंगाने वाहनधारकांसाठी केलेली तयारी सरकारने स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
यापूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या राष्ट्रीय स्तरावरील E20 टाऊन हॉलला ऑनलाइन प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी नमूद केले. त्यानंतर महाराष्ट्रातील नागरिकांना आपले प्रश्न आणि अनुभव थेट मांडता यावेत यासाठी पुण्यात हा राज्यस्तरीय टाऊन हॉल आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“E20 हा केवळ पेट्रोलचा प्रश्न नसून लाखो वाहनधारकांच्या खिशाचा, वाहनांच्या देखभाल खर्चाचा आणि ग्राहकांच्या अधिकारांचा प्रश्न आहे,” अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.

