पुणे : जेन झी आणि मध्यमवयीन पालक, यांच्यामधल्या संवादाची उणीव भरून काढणे, वर्तमानकाळात अगत्याचे आहे. त्यासाठी विचारी, विवेकी समजुतीने समाजजीवन न्याहाळणारा, जेन झी समजून घेणारा शब्द आणि संवाद हवा आहे. असे संवादी शब्द अनुभवाचा जीव सर्जनशील व चैतन्यमय करतात, मात्र त्यासाठी लेखनात सातत्य हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी रविवारी येथे केले.
लेखिका दीप्ती चंद्रचूड लिखित ‘गोष्ट आहे पृथ्वीमोलाची’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या. प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूर, उत्कर्ष प्रकाशनाचे सुधाकर जोशी, प्रदीप चंद्रचूड, शोभा चंद्रचूड आदी व्यासपीठावर होते. सेनापती बापट रस्त्यावरील सुमंत मुळगावकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.
डॉ. ढेरे म्हणाल्या, आपल्या समाजजीवनात आजही एकाचवेळी स्त्रिया मध्ययुगीन, भूतकालीन आणि वर्तमानकालीन वास्तवाच्या निरनिराळ्या पातळ्यांवर झगडा करत आहेत आणि दुसरीकडे जेन झी पिढीशी संवादी राहणारा सेतूच राहिलेला नाही. अशा वेळी दीप्तीसारखी संवेदनशील, मूल्यभान जपणारी, सकारात्मक दृष्टीची लेखिका महत्त्वाची ठरते. आपल्याकडे पित्याचा रक्तवंश आणि ज्ञानवंश अशा दोन्ही परंपरा समर्थपणे चालवणाऱ्या स्त्रियांची अनेक उदाहरणे आहेत. दीप्ती याच परंपरेचा भाग आहे. जेन झी पिढीशी शब्दरूप संवाद साधण्यासाठी, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक असुरक्षितता संपविण्यासाठी आणि माणूसपणाची समृद्धी जाणणारी नवी लेखिका नव्या शब्दकळेसह पुढे येणे हा आनंदाचा भाग आहे. त्यातूनच नव्या पिढीचे पुढचे पाऊल चांगल्या, योग्य वाटेवर पडेल, असा विश्वास वाटतो.
दीप्ती चंद्रचूड म्हणाल्या, माझ्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. वाचन-लेखनाचा वारसा आजोबांकडून मिळाला. औद्योगिक क्षेत्रात बरेच काम केल्यावर, रसायने, मशीन्सच्या सहवासात मोठा काळ घालवल्यावरही शब्दांची ओढ कायम राहिली आणि नित्य-नैमित्तिक लेखन होत राहिले. या पुस्तकात ते लेखन संकलित स्वरुपात मांडले आहे. लेखनातून जुन्या – नव्या संस्कृतीचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. या निमित्ताने ज्ञानसाधनेचे नवे तेजोमय क्षितिज खुणावते आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉ. शिकारपूर यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने एक उद्योजिका लेखिका झाली, याचा आनंद मोठा आहे, असे मत मांडले. दीप्ती यांनी लेखनात सातत्यही राखावे आणि एखादा विशिष्ट विषय निवडून त्यावर केंद्रीत असे लेखनही करावे, असे त्यांनी सुचवले.
प्रदीप चंद्रचूड लिखित ‘गीता अनुभूती’ या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचेही प्रकाशन झाले. प्रदीप चंद्रचूड यांनी स्वागत केले. सुधाकर जोशी यांनी मनोगत मांडले. शोभा चंद्रचूड यांनी आभार मानले. डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. संहिता शेंडे यांनी गणेशस्तवन सादर केले.

