पुणे : पुढील २५ वर्षांचा विचार करून पुणे शहरासाठी एकात्मिक जलशुद्धीकरण मास्टर प्लॅन तयार करावा,
जुने पर्वती व लष्कर जलशुद्धीकरण केंद्रांचे तातडीने आधुनिकीकरण करून त्यांची कार्यक्षमता वाढवावी,
लष्कर येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्राच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया व प्रत्यक्ष काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे असे निर्देश स्थायी समितीचे श्रीनाथ भिमाले यांनी आज प्रशासनाला दिले.
शहरातील काही भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्यानंतर गेल्या आठवड्यात महापालिका प्रशासनाला पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची तातडीने पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश भिमाले यांनी दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि संबंधित अभियंत्यांनी केंद्राची पाहणी केली.
पाहणीनंतर सादर करण्यात आलेल्या अहवालात पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रसामग्री जुनी झाल्याने तिच्यावर अतिरिक्त ताण येत असून, त्यामुळे गढूळ पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी नवीन प्रकल्प उभारण्याची आवश्यकता असून त्यासाठी सुमारे ८१० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. या अहवालाची दखल घेत स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले.
शहराची वाढती लोकसंख्या, भविष्यातील पाण्याची मागणी आणि नागरिकांना दर्जेदार व स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक असल्याचे भिमाले यांनी स्पष्ट केले.

