पुणे, दि. 18 जून : स्वातंत्र्यलढ्यातील अद्वितीय शौर्य आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज अहिल्यादेवी शाळेच्या विद्यार्थिनींनी घोष पथकाच्या वादनातून बालगंधर्व रंगमंदिर चौकातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यासमोर मानवंदना दिली.
विद्यार्थिनींनी राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करत राष्ट्रसेवा आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.
मुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक सुरेश वरगंटीवार, पर्यवेक्षिका स्वाती जज्जल तसेच दिपाली थोरात, सीमा डोईफोडे, विष्णू बुरसे आणि सुनीता पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
विद्यार्थिनींमध्ये देशभक्ती, शिस्त आणि राष्ट्रीय मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापिका अभ्यंकर यांनी सांगितले.

