पुणे:“योगामुळे आध्यात्मिक प्रगती साधली जाते. योगसाधना हा आध्यात्मिक उन्नतीचाच मार्ग आहे. नित्य नियमाने योगाचा अभ्यास केल्यास मनाला शांतता मिळेल. योगामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना जोडण्याचे कार्य केले जात आहे त्यामुळे लोकांमध्ये विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होईल.”असे विचार पतंजली योग समिती (पुणे पश्चिमचे प्रमुख) योग शिक्षक गोविंद गाडगीळ यांनी व्यक्त केले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणेतर्फे चौथ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून कोथरूड येथील एमआयटीच्या प्रांगणात योगदिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्यावेळी सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करताना गोविंद गाडगीळ बोलत होते.
याप्रसंगी पतंजली योग समितीचे (पुणे पश्चिमचे सदस्य) हेमंत पांचाळ, चित्रा मोहोड, सोनाली चिंचवडे व रूपाली यांनी योगाचे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.
यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कुलगुरू डॉ. आय.के.भट, उपकुलगुरू डॉ. मृगानंद, डॉ. जय गोरे, कुलसचिव प्रा.डी.पी. आपटे, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर यांच्यासह माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहातील संचालक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हजारो विद्यार्थी या योगासन कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शांती व उत्तम आरोग्य ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
गोविंद गाडगीळ यांनी योगाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. गाडगीळ म्हणाले“ ज्ञान योग, कर्म योग, भक्ती योग व योगाभ्यास याला आधुनिक युगात विज्ञानाची जोड दिली आहे. त्याला समजून हा योगाभ्यास केल्यास प्रत्येक मनुष्याला ते संस्काराक्षम बनविण्यास परिपूर्ण आहे. शरीर, मन व बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी हा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. या साधनेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ भारतीय संस्कृती, परंपरा आणि योगाच्या माध्यमातून खर्या अर्थाने आंतरिक समाधान लाभते. जात, धर्म आणि देशा देशातील अंतरमोडून योग हा संपूर्ण सृष्टीवर पसरला आहे. योग पद्धत ही निसर्गाशी जोडलेली आहे. भारत हा योगाच्या माध्यमातून विज्ञान आणि धर्माला जोडण्याचे कार्य करेल. मन, बुद्धि आणि शरीर याला जोडण्याचे काम योगाच्या माध्यमातून केले जाते. योग हा भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. २१व्या शतकात संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याचे दायित्व भारताचे असेल. भारतामध्ये ऋषींनी योगाची रुजवण केली. तीच परंपरा शेलारमामा आणि रामदेवबाबा यांनी पुढे चालू ठेवली.”
डॉ. आय.के.भट म्हणाले,“ वैदिक परंपरेनुसार योगा चालत आलेला आहे. आज त्याला जागतिक योगा डे च्या स्वरूपात साजरा केला जात आहे. हा योगाभ्यास शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक आहे. नियमित याचा अभ्यास केल्यास मानवाला अध्यात्माच्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग आहे. आदी शंकराचार्य यांनी सुद्धा सांगितले की हे माध्यम बौद्धिक व अध्यात्माच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. डब्ल्यूपीयू ने हा दिवस साजरा करून महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तसेच येथील अभ्यासक्रमात योगाचा समावेश केल्यामुळे समाजात चांगले व्यक्ति निर्माण करण्यास महत्वाची भूमिका बजावतील.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.