मुंबई-
20 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार असल्याचे भाकित जयंत पाटील यांनी केले आहे. तर आमचे सरकार येईल त्यावेळी यांच्या पेक्षाही उत्तम योजना आम्ही राबवू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि निवडून आलेले आमदार विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री कोण होईल ते ठरवतील असेही त्यांनी म्हटले आहे. जागा वाटपाची चर्चा काल होणार होती मात्र आमची काल बैठक असल्यामुळे झाली नाही लवकरच ती बैठक होईल. तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवू की किती जागा पाहिजे.
जयंत पाटील म्हणाले की, तुतारी आणि पिपाणी या चिन्हामुळे गोंधळ झाला आणि दिंडोरी लोकसभेमध्ये आमची एक लाखापेक्षा अधिक मदत तिकडे गेली त्यामुळे निवडणूक आयोगाने याच्यावर विचार केला पाहिजे. आमच्या पक्षाकडे नवीन चेहरे तरुण मुल आणि नवीन कार्यकर्ते यायला लागलेले आहेत त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून आम्ही योग्य तो विचार करू, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसून शिंदे शिवसेना, भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचे अपयश शिवसेना आणि भाजपा अजित पवारांवर लादत आहेत. तर अजित पवार गटही दोघांना जोरदार प्रत्यूत्तर देत आहे. यामुळे अजित पवार गट महायुतीत राहणार की बाहेर पडणार याचीही चर्चा रंगू लागली आहे.
जयंत पाटील म्हणाले की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. शिवसेनेलाही उद्धव ठाकरे यांच्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल. विधानसभा निवडणुकीत तिनही पक्षांना चांगला प्रतिसाद मिळेल, काही दिवसातच जागावाटपावर चर्चा होणार आहे, असेही आमदार जयंत पाटील म्हणाले. आमच्या पक्षाला मधल्या काळात मोठ्या प्रमाणात त्रास झाला. त्यामुळे जे पक्षासाठी योग्य आहे तोच निर्णय घेऊ असेही त्यांनी म्हटले आहे.