श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या पुण्यस्मरण दिनी म्हणजे सत्तू अमावस्येला बुधवारी, दि. ८ मे रोजी मंदिरात वासंतिक पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत हा पुष्पोत्सव पाहण्यासाठी भाविकांना खुला असणार आहे. जाई, जुई, लिली, मोगरा, चाफा आदी फुलांची आकर्षक सजावट मंदिरात करण्यात येणार आहे.
अशोक सराफ, प्रल्हाद पै, डॉ.कैलास काटकर यांना यंदाचा गुरुमहात्म्य पुरस्कार कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे घोषणा
पुणे : बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे देण्यात येणारा गुरुमहात्म्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै आणि ज्येष्ठ उद्योजक डॉ. कैलास काटकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुक्रवार, दिनांक १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमात देण्यात येईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार अॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, अॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे आदी उपस्थित होते. श्री दत्त महाराजांची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह, महावस्त्र व रुपये २५,०००/- असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
कार्यक्रमाला ज्येष्ठ सिने दिग्दर्शक राजदत्त, विद्यावाचस्पती डॉ.शंकर अभ्यंकर, ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशोक सराफ यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला असून नाटय, सिनेमा, कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात येणार आहे. प्रल्हाद वामनराव पै हे जीवन विद्या मिशनद्वारे मोठया प्रमाणात समाजप्रबोधन करीत असून त्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येईल. तसेच, डॉ. कैलास काटकर हे क्विक हिलचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक असून चांद्रयान प्रकल्पाला सायबर सुरक्षा पुरविल्याबद्दल त्यांचा ट्रस्टतर्फे गौरव करण्यात येणार आहे.