पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८४ व्या पुण्यतिथीनिमित्त नाशिकमधील डुबेरे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या नाशिकमधील डुबेरे या जन्म स्थानी “बर्वे वाड्यात” त्यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या २८४ व्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुतळ्याचे अनावरण लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर व चितळे बंधू मिठाईवालेचे श्रीकृष्ण चितळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे, इतिहास अभ्यासक मोहन शेटे, नारायणशेठ वाजे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था, डुबेरे, नवाब शादाब अली, श्रीकांत नगरकर, चिंतामणी क्षीरसागर, उमेश देशमुख, चंद्रशेखर बर्वे, निखिल बर्वे, सुहास बर्वे, समस्त बर्वे परिवार यावेळी उपस्थित होते.
मोहन शेटे म्हणाले, बाजीराव पेशवे यांनी वीस वर्षाच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या. पालखेडची लढाई जगातील मोठ्या लढायांमध्ये महत्वपूर्ण मनाली जाते. त्या लढाईचे उचित स्मारक आगामी वर्षात प्रतिष्ठान तर्फे उभारण्यात येईल. असेही शेटे यांनी सांगितले.
भूषण गोखले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा वारसा पुढे नेण्याचे काम बाजीराव पेशवे यांनी केले.
कुंदनकुमार साठे म्हणाले, थोरले बाजीराव पेशवे म्हणजे तेजस्वी सूर्य होते. त्यांचा खरा इतिहास सगळ्यांना माहित असायला हवा. पुढच्या वर्षी पर्यंंत बाजीराव पेशवे यांचे तैलचित्र महाराष्ट्र विधान भवन येथे लावणारच असे प्रतिपादन देखील त्यांनी केले.
चंद्रशेखर बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. निखिल बर्वे यांनी आभार मानले.