मुंबई-पुढील 30 दिवसांत राज्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. जानेवारी महिन्यात ऑपरेशन लोट्स घडण्याची शक्यता आहे. हे आगामी निवडणुकांच्या अगोदर होईल. काँग्रेसही फुटेल. या घडामोडी राम मंदिराच्या सोहळ्यापूर्वी किंवा नंतर घडेल, असे त्या म्हणाल्या.
आगामी काळात भाजप काँग्रेस फोडेल. यामुळे राज्यात विरोधी पक्षच उरणार नाही. परिणामी आमच्यासारख्यांना विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागेल. लढावे लागेल. भाजप भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेत असल्याचे पाहून दुःख होते. वेदना होतात. कधीकाळी हीच भाजप भ्रष्टाचाराविरोधात लढायची का? असा सवाल याविषयी आमच्या मनात उत्पन्न होत आहे, असे अंजली दमानिया मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या की, ज्या लोकांना राजकारणातून बाजूला फेकण्याची गरज आहे त्यांना देवेंद्र फडणवीस मोठे करत आहेत. मनोज जरांगे यांच्यामागे एकनाथ शिंदे असल्याचा दावा केला जातो. पण मला तसे वाटत नाही. यापूर्वी मी एकनाथ खडसे व अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याविरोधात लढा दिला. त्यावेळी माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी लढत असल्याचा आरोप झाला. याऊलट आज मी फडणवीस यांच्याविरोधात लढत असताना पुन्हा लोक तर्कवितर्क उपस्थित करतात, असे त्या म्हणाल्या.
मनोज जरांगेंनी फुले उधळून घेणे थांबवावे
अंजली दमानिया यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे कौतुकही केले. जो कुणी लढतो त्यांना अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावेच लागते. पण एवढा मोठा लढा उभा केल्याबद्दल जरांगे यांचे कौतुक वाटते. मराठा आरक्षणासाठी एखादी व्यक्ती लढा देत असेल तर त्याचे कौतुक करायला हवे. एवढा मोठा लढा उभा करणे ही खाऊची गोष्ट नक्कीच नाही. पण जरांगे पाटलांवर ज्या प्रकारे पुष्पवृष्ट होते, 250 जेसीबी लावून फुले उधळली जातात हे जरांगेंनी स्वतःहून थांबवले पाहिजे. आपण आपल्या लढ्याला तत्वे ठेवली तर खरे कोण आणि खोटे कोण? हे लोकांनाही कळते, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.