मुंबई: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली. यानंतर सत्तार यांनी वापरलेल्या भाषेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सत्तारांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान केदार दिघे यांनी खोके घेऊन बोके इतके माजलेत की ते महाराष्ट्र धर्म विसरले आहेत अशा शब्दात सत्तारांवर निशाणा साधला आहे.आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी सोशल मिडीयावर याबद्दल पोस्ट लिहीली आहे, त्यांनी म्हटले की, “मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्या बाबत त्यांचा राजीनामा राज्यपालांनी घ्यावा महिलांचा सन्मान ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण आहे…खोके घेऊन बोके इतके माजलेत की ते महाराष्ट्र धर्म विसरले आहेत.”सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? य़ावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ.