पुणे : समाजातील गरीब, गरजू व अनाथ विद्यार्थ्यांचे पालन-पोषण, शिक्षण, संवर्धन व पूनर्वसन करुन त्यांना स्वावलंबी व सुजाण नागरीक घडविण्याचे मोलाचे कार्य करणार्या पुणे विद्यार्थी गृह संस्थेचा 110 वा वर्धापनदिन संस्थेच्या सदाशिव पेठेतील परिसरात उत्साहात पार पडला. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आवर्जून उपस्थित राहून संस्थापक कुलगुरु कै. वि. गं. तथा दादासाहेब केतकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन श्री रामलक्ष्मणाचे दर्शन घेतले. संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन संस्था पदाधिकारी व संचालकांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य श्री. अ. पाटणकर, सदस्या श्रीमती पूर्णिमा लिखिते, हितचिंतक, देणगीदार, माजी विद्यार्थी, संस्थेचे चार्टर्ड अकौंटंट, कायदे सल्लागार, समाजातील विविध प्रतिष्ठीत मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी विद्यार्थी व संचालक उपस्थित होते. याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थी व देणगीदारांनी संस्थेस देणग्या दिल्या. प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह प्रा. राजेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष राजेंद्र बोर्हाडे, कुलसचिव सुनील रेडेकर, माजी कार्याध्यक्ष प्राचार्य हणमंत भोसले तसेच माजी कार्याध्यक्ष प्राचार्य कृष्णाजी शिरकांडे, डॉ. शं. पां. किंजवडेकर व पुणे, मुंबई व नाशिक येथील सर्व संचालक उपस्थित होते.
तत्पूर्वी, संस्थेच्या आवारातील श्रीराम-लक्ष्मणांच्या मूर्तींना माजी विद्यार्थी डॉ. शं. पां. किंजवडेकर यांच्या हस्ते अभिषेक व आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुलगुरु कै. दादासाहेब केतकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. माजी विद्यार्थी, संस्था पदाधिकारी व संचालक यांचे चर्चासत्र झाले. संस्थेच्या कार्याची व सद्यस्थितीची माहिती सर्वांना देण्यात आली. माजी विद्यार्थी महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महामंडळातर्र्फे चार आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकांना देण्यात आले. संस्थेप्रती माजी विद्यार्थ्यांची जबाबदारी यावर संस्थेचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे यांनी विचार मांडले. संस्थेविषयी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आठवणी सांगून कृतज्ञतापूर्वक आदरभाव व्यक्त केला. श्रीराममंदिरात वैदिक मंगल (वेद घोष) कार्यक्रम झाला. रोषणाईने आवार सजले होते. सायंकाळी 6 ते 10 पर्यंत स्वागत समारंभ झाला.