‘अभि चॅरिटेबल’तर्फे रक्तदान, अवयवदान जागृती शिबीर
पुणे : सामाजिक जाणिवेतून कार्यरत असलेल्या अभि चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रक्तदान व अवयवदान जागृती शिबिराचे नुकतेच आयोजन केले होते. अभि ग्रुप उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त बाणेर येथे हे शिबीर आयोजिले होते. पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहुन शिबिराची सुरुवात झाली.
वाढदिवसानिमित्त प्रत्येकजण केक कापून जल्लोषाने वाढदिवस साजरा करतात. मात्र, डॉ. जितेंद्र जोशी यांनी याला फाटा देत प्रत्येक वाढदिवसाला अभि चॅरिटेबल फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले आहेत. या शिबिराचे उद्घाटन आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. तरुणांनी समाजासाठी व देशसेवेसाठी पुढाकार घेऊन एकत्रित यायला हवे, अशी भावना मेधाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केली. या शिबिरात ७५ पेक्षा अधिक जणांनी रक्तदान केले. वाय. सी. एम. पिंपरी-चिंचवड ब्लड बँकच्या मदतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.
रक्तदानाबरोबरच अवयवदान हेही महत्वाचे आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानाने इतर ७ व्यक्तींचे जीव वाचू शकतात. मृत्यूनंतर सारे शरीर नष्ट होते. मात्र, अवयव जिवंत असतात. हे अवयव दान केल्याने इतर व्यक्ती जिवंत राहू शकतात. त्यामुळे अवयवदानाबाबत असलेले गैरसमज काढून टाकावेत व अवयवदानाचे महत्व तळागाळापर्यंत पटवून देण्याचे काम व्हावे, अशी भावना डॉ. जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केली. अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी तेजपाल सिंग यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरास कंपनीचे पदाधिकारी, कर्मचारी व या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————-