Home Blog Page 699

आर्थिक देवाणघेवाणीतून गोळीबार:बंदुकीसह तब्बल 175 काडतुसे व पिस्टलचे 40 जिवंत काडतुसे जप्त

पुणे-सोलापूर रस्त्यावर उरळीकांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीत इनामदारवस्ती येथे भरदिवसा एकाने पिस्तुलातून दोघांवर गोळीबार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणी उद्योजक दशरथ विठ्ठल शितोळे (वय-४६,रा.कोरेगाव, ता.हवेली,पुणे) , त्याची पत्नी निलीबा दशरथ शितोळे (४२), जिग्नेश बापु ऊर्फ दशरथ शितोळे (१९), आशा सुरेश भोसले (५२), निखील अशोक भोसले (२५, सर्व रा.कोरेगाव,ता.हवेली,पुणे) या आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

४० लाखांचे आर्थिक देवाणघेवाणीतून सदरचा गोळीबार झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आरोपींच्या ताब्यातून स्थानिक गुन्हे शाखेने एक बंदुक तिचे १७५ काडतुसे व पिस्टलचे ४० काडतुसे, तीन बॅरल, दोन खाली मॅगझीन हा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

या घटनेत काळुराम महादेव गोते व शरद कैलास गोते ( दोघे रा.भिवरी, ता.हवेली,पुणे) हे जखमी झाले आहे. आरोपी व जखमी यांच्यात आर्थिक व्यवहाराचा वाद सुरु होता, तक्रारदार गोते यांचे आरोपीकडे ४० लाख रुपये दीड वर्षापूर्वी उसने दिलेले होते. सदरची रक्कम परत देतो असे सांगुन आरोपीने काळुराम गोते व शरद गोते यांना त्यांचे पैसे परत देतो माझ्या घरी या असे सांगितले.

त्यांना घरी बोलावून पैसे परत मागितल्याच्या रागातून आरोपीने त्याच्याकडील परवाना असलेल्या पिस्टलमधून सदर दोघांवर गोळीबार केला. यात काळुराम गोते याच्यावर जीवे ठार मारण्याचे उद्देशाने चार राऊंड फायरिंग करुन काळुराम गोते यांना हाताला व पायाला राऊंड लागून गंभीर जखमी करण्यात आले आहे.

उरळीकांचन सारख्या मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार झाल्याने पोलिस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन एलसीबी व उरळीकांचन पोलिस स्टेशन यांचे वेगवेगळे तपास पथक कार्यरत केले. एलसीबीचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे पथकास या गुन्हयातील मुख्य आरोपी हा उरळीकांचन परिसरात रेल्वे रुळाचे पलीकडे असलेल्या शेतात लपवून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपींना सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

व्ही जॉन इंडियातर्फे शेविंग क्रीम आणि फोमने बनविलेल्या आशियातील पहिल्या ८ फुटी गणपतीचे अनावरण

पुणे – सर्जनशीलता, परंपरा आणि नावीन्याचा अनोखा मेळ घालत, व्ही जॉन इंडिया या पुरुषांसाठीच्या ग्रुमिंग क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने ८ फुटी गणपतीच्या आकर्षक मूर्तीचे अनावरण केले असून, ही मूर्ती पूर्णपणे शेविंग क्रीम आणि फोम वापरून बनविण्यात आली आहे. पुण्यातील ग्रँड स्ट्रीट मॉल येथे ‘व्ही जॉन गणपती’ नावाने ही मूर्ती बसविण्यात आली आहे. या मूर्तीला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये शेविंग क्रीम आणि फोमपासून बनविलेल्या सर्वात मोठ्या गणपतीचे अधिकृत स्थान मिळाले आहे.

दैनंदिन जीवनातील ग्रुमिंगचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या व्ही जॉन इंडियाच्या प्रयत्नांतून ही सर्जनशील मूर्ती साकारण्यात आली आहे. हुशारी, नवा आरंभ आणि यशाचे प्रतीक असलेल्या गणरायाची निवड करत व्ही जॉन ब्रँडने सेल्फ केयर व ग्रुमिंगचे महत्त्व कल्पकतेने इतरांपर्यंत पोहोचविले आहे. हा संदेश प्रभावीपणे देण्यासाठी व्ही जॉन गणपती, व्ही जॉनची अत्याधुनिक उत्पादने – व्ही जॉन प्रीमियम शेविंग क्रीम आणि व्ही जॉन स्पेशल मॉइश्चरायझिंग फॉर्म्युला- बेस्ड शेविंग फोम वापरून साकारण्यात आला आहे.

हा अशा प्रकारचा पहिलाच गणपती साकारण्यासाठी शेविंग क्रीम आणि फोमचे ३,५०० युनिट्स वापरण्यात आले असून, १५ दिवसांच्या अथक मेहनतीतून मूर्ती तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती नेत्रदीपक आमि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून, ग्रुमिंग आणि सेल्फ-केयर ही ब्रँडची तत्त्वे ठळकपणे अधोरेखित करणारी आहे.

याप्रसंगी व्ही जॉन इंडियाचे विपणन व्यवस्थापक आशुतोष चौधरी म्हणाले, ‘गणेश चतुर्थी हा भक्तीचा, नवी सुरुवात करण्याचा आणि उत्सवाचा काळ असतो. ज्याप्रकारे गणपती बाप्पांना आपल्या हृदयात महत्त्वाचे स्थान आहे, त्याप्रमाणे पर्सनल केयरलाही आयुष्यात महत्त्वाचे स्थान असायला हवे, हे आम्हाला अधोरेखित करायचे होते. व्ही जॉन गणपतीच्या माध्यमातून आम्ही परंपरा जपत ग्रुमिंगचे महत्त्व कल्पकतेनं दाखविले आहे.’

व्ही जॉन गणपतीच्या अनावरणप्रसंगी मॉलमधील ग्राहक आणि भक्तांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या या मूर्तीला मीडियामध्येही ठळक प्रसिद्धी मिळाली. यामुळे उत्सवी काळात ब्रँडचे ग्राहकांशी असलेले नाते आणखी दृढ होण्यास मदत झाली आहे.

या उपक्रमासह व्ही जॉन इंडियाने गणेश चतुर्थीचा उत्सव आणि ब्रँडचे तत्त्व यांचा यशस्वीपणे मेळ घालत परंपरा व आधुनिक मूल्यांशी सुसंगत अविस्मरणीय मार्केटिंग कॅम्पेनची निर्मिती केली आहे.

बेताल आमदार संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा!: नाना पटोले

राहुल गांधींच्या केसाला धक्का लावण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा!

गावगुंड आमदाराच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी.

मुंबई. दि. १६ सप्टेंबर २०२४
आपल्या बेताल वक्तव्यांसाठी आणि बेलगाम वागण्यासाठी कुप्रसिद्ध बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड याने पुन्हा एकदा आपली लायकी आणि पातळी दाखवून देत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले. या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराच्या वक्तव्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळाव्यात अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते या गुंडांचा बंदोबस्त करतील असा खणखणीत इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जननायक राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे हताश आणि निराश झालेले सत्ताधारी. राहुलजींच्या वक्तव्याची मोडतोड करून विपर्यास करून त्यांच्या बदनामीची मोहिम चालवत आहेत. राहुल गांधी कधीही आरक्षण बंद करू असे म्हटले नाहीत. उलट आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून ज्या समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवू असे म्हटले आहेत. पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांची पिलावळ साततत्याने अफवा पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे गुंड प्रवृत्तीचे लोक तर त्यापुढे जाऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. सरकार या गुंडावर काहीच कारवाई करत नाही, त्यामुळे देशात कायद्याचे राज्य आहे की भाजपाच्या गुंडांचे असा प्रश्न जनतेला पडला आहे?

संजय गायकवाड सारख्या अडाणी लोकांना राहुल गांधी अमेरिकेत काय बोलले ते माहित तरी आहे का? राहुल गांधी मोदी, शाह यांना घाबरत नाहीत. संजय गायकवाड सारख्या गावगुंडांच्या धमक्यांना ते थोडेच घाबरणार आहेत. आमच्यासारखे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते ढाल बनून त्यांचे संरक्षण करायला सज्ज आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावायचा प्रयत्न सोडा विचारही करू नका असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.

‌‘गोमु संगतीनं माझ्या तू..‌’, ‌‘दिवाना हुआ बादल‌’,अशा बहारदार गीतांनी रसिकांची सायंकाळ संस्मरणीय

सहजीवन गणेश मित्र मंडळ आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात मराठी, हिंदी गीतांचे सादरीकरण
पुणे : प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर आणि सुप्रसिद्ध पार्श्वगायक राजेश दातार यांनी सादर केलेल्या सदाबहार मराठी, हिंदी चित्रपट गीतांनी रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरली.
निमित्त होते सहकारनगर क्र. दोनमधील सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे. चित्रपट अन्‌‍ चित्रपट गीतांसंदर्भातील विविध किस्से आणि गीतांचे सादरीकरण असा गीतांचा फुलोरा ठरलेला ‌‘नमस्ते बॉलीवुड‌’ हा अनोखा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात ‌‘हृदयाच्या तालावर नाचे गणेशु‌’ या गीताने झाली. ‌‘कानडा राजा पंढरीचा‌’, ‌‘गोमु संगतीनं माझ्या तू..‌’, ‌‘बुगडी माझी सांडली गं‌’, ‌‘मैने तेरे लिये..‌’, ‌‘रेशमाच्या रेघांनी‌’, ‌‘पिया तोसे नैना लागे रे‌’, ‌‘मधुबन मे राधिका नाचे रे‌’, ‌‘दिवाना हुआ बादल‌’, ‌‘निले निले अंबर पर‌’, ‌‘होश वालो को खबर क्या‌’, ‌‘काटा लगा‌’, ‌‘पहेला नशा पहेला खुमार‌’, ‌‘खैके पान बनारसवाला‌’, ‌‘यारा सिली सिली‌’, ‌‘दर्दे दिल‌’, ‌‘लागा चुनरी मे दाग‌’ आदी गीते तसेच ‌‘ये मेरा दिल प्यार का दिवाना‌’ ही गझल सादर करण्यात आली. कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत वाद्यांच्या ठेक्यावर तालही धरला.
केदार परांजपे, (सिंथेसायझर), प्रसन्न बाम (संवादिनी), अभिजित जायदे (तबला), विनोद सोनावणे (ऑक्टोपॅड) यांनी समर्पक साथसंगत करीत कार्यक्रमात रंगत आणली. शिल्पा देशपांडे यांनी चित्रपट, चित्रपट गीतांविषयी विविध किस्से सांगत कार्यक्रमात रंग भरले.
श्रीनाथ भिमाले, अश्विनी कदम, अविनाश सुर्वे यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती.
कलाकार आणि मान्यवरांचा सत्कार सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पाटील, उत्सव समितीचे प्रमुख विनय कुलकर्णी, डॉ. स्नेहल तावरे, डॉ. लालसिंग तावरे, अर्चना जोशी, श्रुती नाझिरकर, विजय ममदापूरकर, अमित शहाणे यांच्या हस्ते करण्यात आला.

‘बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हल’मध्ये प्रीमियर झालेला ‘घात’ हा चित्रपट 27 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये…!

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा झालेले दिग्दर्शक छत्रपाल निनावे यांचे पदार्पण तर ”प्लॅटून’च्या शिलादित्य बोरा यांचा निर्मितीसाठी पुढाकार!

मुंबई, सप्टेंबर 2024: अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्याचा वर्ल्ड प्रीमियर दिमाखात पार पडला तो, छत्रपाल निनावे यांचा ‘घात’ हा मराठी सिनेमा आता महाराष्ट्रातल्या थिएटरमध्ये प्रदर्शित होतो आहे. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकाराला येतो. माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक, पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर सिनेमा रंगत जातो.

शिलादित्य बोरा यांची ”प्लॅटून वन’, मनीष मुंद्रा यांची ‘दृश्यम फिल्म्स’ आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘घात’ सिनेमाची स्टारकास्टही अगदी तगडी आहे. यातील कलाकार हे फक्त स्टार नसून खरेखुरे अभिनेते आहेत. मराठीतील अत्यंत संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची अडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम यांनी सिनेमात काम केलेलं आहे. या सिनेमाची सिनेमेटोग्राफी केली आहे, उदित खुराणा यांनी. नेटफ्लिक्सवरची ‘द हंट फॉर वीरप्पन’ ही डॉक्युमेंट्री तसेच आणि हुमा कुरेशी स्टारर ‘बयान’ असे तगडे प्रोजेक्ट नुकतेच पूर्ण केलेल्या खुराणांची सिनेमेटोग्राफी हेही ‘घात’चं आणखी एक वेगळेपण आहे.

भारतातील रिलीजबद्दल लेखक-दिग्दर्शक छत्रपाल निनावे विशेष उत्सुक आहे. “घात हा एक खोल आशय असलेला सिनेमा आहे. विश्वास आणि कुणीतरी दगा दिल्यावर होणारा विश्वासघात दोन्हीचं चित्रण करणारा ‘घात’महाराष्ट्रातील अशा दुर्गम भागात घडतो जिथे कायद्याचं राज्य तर आहे पण अंमल नाही. जिथे प्रत्येक पावलावर काहीतरी भयप्रद काहीतरी धोकादायक दडलेलं असू शकतं, तशी भीती असते. तरीही तिथे जीवनाचा एक प्रवाह चाललेला आहे. तिथल्या आयुष्यातली नैतिक-अनैतिकता निराळी आहे. त्यांच्या दुविधा निराळ्या आहेत, त्यातून आकार घेणारं जगणं निराळं आहे. त्यामुळेच अनेक भावभावनांचं मिश्रण असलेली ही कथा भारतीय प्रेक्षकांसमोर आणताना मी विशेष उत्सुक आहे. या सिनेमाद्वारे एका निराळ्या वास्तवाचा अनुभव घेण्यासाठी मी प्रेक्षकांना आमंत्रित करतो आहे. घात-जिथे विश्वास दुर्मीळ आहे आणि तिथल्या जीवाची किंमत पावलापावलावर मोजावी लागते.

‘घात’या 124-मिनिटांच्या क्राईम थ्रिलरची निवड भारतातील फिल्म बाजार येथील वर्क-इन-प्रोग्रेस लॅबसाठी करण्यात आली होती. जिथे सिनेमाने लॅब अवॉर्ड मिळवलं. तर बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमधील GWFF बेस्ट फर्स्ट फीचर अवॉर्डसाठीही नामांकन मिळाले होते. या चित्रपटाचा भारतातील प्रीमियर Jio MAMI 2023 आणि त्यानंतर केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFK) झाला.

चित्रपटाचे निर्माते शिलादित्य बोरा म्हणतात, “घात हा एक अनवट हिरा आहे. एक निर्माता म्हणून, मी नेहमीच वेगळ्या सिनेमांकडे आकर्षित होतो. खरोखरच आपल्या मातीतल्या गोष्टी जगापुढे आणणारा ‘घात’ हा असाच एक सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे, तो थिएटरमध्ये पाहण्याचा अनुभव वास्तवाइतकाच खास असेल असा मला विश्वास आहे असं बोरा म्हणतात. ९० व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एंट्री असलेला ‘न्यूटन’, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-विजेता ‘पिकासो’, मराठी जापनीज रॉमकॉम ‘तो, ती आणि फुजी’आणि हुमा कुरेशीचा आगामी ‘बयान’आदी प्रोजेक्टसाठी शिलादित्य बोरा यांनी निर्माता म्हणून भूमिका बजावलेली आहे.

स्वप्न ऑस्करचं
‘घात’ सिनेमाच्या टीमने थेट ऑस्करचं स्वप्न पाहिलं आहे. आणि भारतातून ऑस्करला जाणाऱ्या अधिकृत सिनेएंट्रीसाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. २७ सप्टेंबर २०२४ ला सिनेमा संपू्र्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. त्यानंतरच्या आठवड्यात भारतातील महानगरे आणि प्रमुख शहरांत तसेच नॉर्थ अमेरिकेतील थिएटरमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल. ‘घात’शी जोडली गेलेली नावं अत्यंत प्रतिष्ठित आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माता आणि सिनेमॅटोग्राफर, हे प्रतिष्ठित बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे माजी विद्यार्थी आहेत.

दिग्दर्शक म्हणतात,
कधीतरी जीवघेणा तर कधीतरी जीव वाचवणाऱ्या विश्वासाच्या नाजुक नात्यावर घात या सिनेमाची कथा आधारित आहे. घात या शब्दाचे मराठीत दोन अर्थ आहेत. एक म्हणजे विश्वासघात आणि दुसरा म्हणजे हल्ला. नातेसंबंधातील विश्वासघातातून मानवी मनावर होणाऱ्या एकप्रकारच्या हल्ल्याचा, दगाफटक्याचा हा प्रवास आहे, ही नात्यांची गुंतागुंत आहे. महाराष्ट्रातल्या दुर्गम आणि अनवट पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा असं आयुष्य दाखवतो जिथे चांगल्या वाईटातली सीमारेषा धूसर आहे. पिढ्यानपिढ्या, या प्रदेशातील स्थानिकांनी त्यांची जमीन, पाणी आणि जंगल याचं प्राणपणाने रक्षण केलंय.

‘घात’मध्ये तीन मध्यवर्ती पात्रं आहेत. एक रहस्यमय भटक्या, एक धूर्त विश्वासघातकी आणि एक भ्रमित कायदेपंडित. यातील प्रत्येकाच्या साथीला स्थानिकांचं प्रतिनिधित्तव करणारा एक साथीदार आहे. मुक्ती शोधणारा एक माहितगार, भूतकाळ नसलेला माणूस आणि जगात आपली जागा शोधणारी एक तरुण आदिवासी मुलगी. या साऱ्यांचं आयुष्य एकमेकांत अनपेक्षित पद्धतीने गुंफलं गेलं आहे. नियमच नसलेली या जगात एकमेकांवर विश्वास बसणं आणि तो उडणं हे फार सहज होतं. या जगात भीती हाच विश्वास आहे.

छत्रपाल निनावे
छत्रपाल निनावे एक भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत. २०२२ मध्ये, छत्रपाल हे बर्लिनेल टॅलेंटचा भाग होते. घात हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. पण या पहिल्या फीचर फिल्मने २०२० मध्ये NFDC फिल्म बाजार येथे WIP लॅब अवॉर्ड जिंकला तर बर्लिनले पॅनोरमा २०२३ मध्येही सिनेमाची निवड झाली होती. शिवाय GWFF फर्स्ट फीचर फिल्म अवॉर्डसाठी नामांकनही मिळाले होते. छत्रपाल यांनी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून 15 वा Giuseppe Becce पुरस्कार पटकावला, सिनेक्लब वेरोना आणि FEDIC मासिकाने बर्लिनले २०२३ मध्ये त्याचे आयोजन केले होते. Jio MAMI Mumbai FF, IFFK आणि AEIFF मध्ये देखील ‘घात’ची निवड झाली होती. याबरोबरच छत्रपाल यांनी ‘अ चेक ऑफ डेथ’ (2007) ही मध्य भारतातील शेतकरी आत्महत्या प्रकरणावर आधारित एक शॉर्टफिल्मही केली आहे. ‘फिल्माका इंडिया’ स्पर्धेत या फिल्मला पुरस्कार मिळाला आहे.

‘प्लॅटून वन आणि शिलादित्य बोरा बद्दल
मुंबईत मुख्यालय असलेले, ‘प्लॅटून वन’ हे शिलादित्य बोरा यांनी स्थापन केलेला एक बुटीक फिल्म स्टुडिओ आहे. PVR सिनेमा समूहाची मर्यादित प्रदर्शन करणारी शाखा म्हणजेच PVR डायरेक्टर्स रेअर या आघाडीच्या इंडी रिलीज बॅनरमागे बोरा यांची मेहनत आणि बुद्धी आहे. या बॅनरने आजवर ८५ हून अधिक चित्रपट यशस्वीरित्या प्रदर्शित केलेले आहेत. बोरा हे प्रतिष्ठित ‘बर्लिनेल टॅलेंट्स २०१५’ चे माजी विद्यार्थीसुद्धा आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांनी चित्रपट आणि निर्मितीच्या सर्व अंगांशी संबंधित कामगिरी केली आहे. दिग्दर्शन, निर्मिती, विपणन, वितरणापासून ते एखाद्या प्रकल्पाची सुरुवात करेपर्यंत अनेक भूमिका बोरा यांनी पार पाडल्या आहेत. ‘कोर्ट’, ‘मसान’, ‘न्यूटन’, ‘एसआयआर’ यांसारख्या ऑफबीट सिनेमांसोबतच बोरा गेल्या दशकातील सर्वोत्तम भारतीय स्वतंत्र सिनेमांशी निगडीत आहेत. ‘प्लॅटून वन’चा आगामी चित्रपट, हुमा कुरेशी अभिनीत ‘बयान’ हा सिनेमा एलए रेसिडेन्सी ऑफ ग्लोबल मीडिया मेकर्स – फिल्म इंडिपेंडंट येथे तयार झालाय. याच सिनेमाने ‘ह्युबर्ट बाल्स’ फंडाचं विजेतेपदही पटकावलं आहे. नुकतंच सिनेमाचं मुख्य छायाचित्रण पूर्ण झालं आहे. ‘प्लॅटून वन’ उत्तर अमेरिकन बाजारपेठेतही आपला विस्तार करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच ओकलँड कॅलिफोर्निया येथे ‘प्लॅटून वन इंक’ने आपली धमाकेदार एंट्री केलेली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कुलाबा पोलीस स्थानकात तक्रार

मुंबई दि. १६ सप्टेंबर २०२४
कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कर्नाटकातील घटनेची सत्य माहिती
१३ सप्टेंबर रोजी बेंगलूरूच्या टाऊन हॉल परिसरात कोणतीही परवानगी न घेता विश्व हिंदू परिषदेने आंदोलन आयोजित केले होते. यावेळी आंदोलक गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करत होते. आंदोलकांना ताब्यात घेताना मूर्तीला इजा होऊ नये म्हणून पोलिसांनी मूर्ती सुरक्षित ठेवली व आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी विधिवत पूजा अर्चना करून गणपतीबप्पाचे विसर्जन केले.
ही माहिती अनेक फॅक्ट चेक करणा-या वेबसाईट्स व राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी फॅक्ट चेकच्या माध्यमातून सार्वजनिक केली आहे.

पण राजकीय फायद्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देताना कर्नाटक सरकारने व पोलिसांनी गणपती उत्सव थांबवून गणपतीची मूर्ती जप्त केली असे धडधडीत असत्य विधान करून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या एक्स (ट्वीटर) हँडलवरून या संदर्भात चुकीची माहिती प्रसारित करून कर्नाटकच्या काँग्रेसला जबाबदार धरले. तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात खोटी माहिती प्रसारित करून समाजात तेढ आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा व सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई अशी मागणी करणारी लेखी तक्रार प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष अॅड. रविप्रकाश जाधव यांनी कुलाबा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाकडे केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेत्यांकडून सातत्याने फेक न्यूज आणि अफवा पसरवून राज्यात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचे हे कृत्य सामाजिक शांतता भंग करणारे आहे. पोलिसांनी यांची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

टोळक्याच्या गोळीबारात एकाची हत्या, 14 जण गजाआड

पुणे- सीआरपीएफ जवानाच्या खासगी बंदुकीतून टोळक्याने केलेल्या गोळीबारात एकाची हत्या झाल्याप्रकरणी 14 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सीआरपीएफ जवानावरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.अशी माहिती ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी येथे दिली

हवेली पाेलिस स्टेशनच्या हद्दीत सिंहगड गावाचे परिसरात घेरा, सांबरेवाडी याठिकाणी 14 सप्टेंबर राेजी मध्यरात्री 1 च्या सुमारास राेहिल ऊर्फ भाेऱ्या ढिले व तेजस वाघ ( दाेघे रा. खानापूर, पुणे) यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या किरकाेळ भांडणाचे कारणाचा राग मनात धरुन तेजस वाघ व त्याच्या साथीदारांनी गोळीबार व धारदार शस्त्राने वार केला होता. त्यात राेहित ढिले याचा मृत्यू हाेऊन त्याचा साथीदार साेमनाथ वाघ दाेन गाेळ्या लागल्यामुळे जखमी झाला हाेता. या प्रकरणात 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेषतः आराेपींनी सीआरपीएफच्या जवानाच्या खासगी बंदुकीचा वापर करत गाेळीबार केल्याची बाब उघडकीस आल्याने सीआरपीएफ जवानास देखील अटक करण्यात आली आहे.

मंगेश ऊर्फ मुन्ना माेहन दारवटकर (वय-25,रा.काेंडगाव, पुणे), वैभव शिवाजी जागडे (20,रा.वेल्हा,पुणे), सिध्देश राजेंद्र पासलकर (25,रा.आंबेड, पुणे), प्रथमेश मारुती जावळकर (18), सुमीत किरण सपकाळ (20), केतन नारायण जावळकर (23), वैभव किशाेर पवार (18), तेजस चंद्रकांत वाघ (24), गणेश अंकुश जावळकर (23), आकाश अनंता वाघ (27, सर्व रा.खानापूर, पुणे), वरुण रामदास दारवटकर (36,रा.आंबेड,पुणे), माेहन सबाजी चाेर (52,रा.तळेगाव दाभाडे,पुणे), विकास विलास नारगे (26,रा.सांबरेवाडी, पुणे) व साकहिल बाळु काेंडके (21,रा.सांबरेवाडी,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पाेलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले की, राेहित ढिले याने तेज वाघ यास काही दिवसांपूर्वी फाेनवरुन शिवीगाळ करत तुझ्यात दम असेल तर खानापूर चाैकात ये असे आव्हान दिले होते. त्याप्रमाणे तेजस वाघ हा आपल्या मित्रांसह खानापूर येथे गेला हाेता. तिथे राेहित ढिले व त्याचा मित्र यश जावळकर, विकास नारगे, साहिल काेंडके, चेतन जावळकर, प्रविण सांबरे यांनी साेमनाथ अनंता वाघ, तसेच चंद्रकांत वाघ यांना मारहाण केली होती. यावेळी चेतन जावळकर याने त्याच्याकडील बंदुकीतून साेमनाथ वाघ याच्यावर फायरींग करुन त्याचा खूनाचा प्रयत्न केला.

आराेपींनी घटनेच्या दिवशी बेकायदेशीर गर्दी जमवून बंदुकीने हवेत फायर करुन राेहित ढिले याच्यावर लाेखंडी राॅड, काेयता व घातक हत्याराने हल्ला केला. त्यानंतर कार व दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. या गंभीर गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याची सूचना पाेलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पाेलिस अधीक्षक रमेश चाेपडे यांनी एलसीबी पथक व हवेली पाेलिसांना दिल्या हाेत्या. त्यानुसार आराेपींचा माग काढून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरुन जेरबंद करण्यात आले आहे.

सातारा रस्त्यावर डी-मार्टचे समोर पोटाला चाकू लावुन एकाला लुटले

पुणे- स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या सातारा या हम रस्त्यावर रांका ज्वेलर्स आणि बडी बडी शोरूम्स असलेला वाळवेकर लॉन्स सारखा परिसर असलेल्या डी मार्ट समोर एकाच्या पोटाला चाकू लाऊन चार चोरट्यांनी एकाची ६१ हजाराची जबरी लुट केली.गणेशोत्सव काळात पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास हि चोरी अज्ञात चोरट्यांनी केली या प्रकरणी भा. न्या. संहिता कलम ३०९ (४), ३(५) अन्वये एका २१ वर्षीय बिबवेवाडीत राहणाऱ्या तरुणाने पोलिसात तक्रार नोंदविली आहे त्याला लुटणाऱ्या मोटार सायकल वरिल चार अज्ञात भामट्यांचा सहकारनगर पोलीस शोध घेत आहेत.
दि.१०/०९/२०२४ रोजी पहाटे ०३/३५ वा. ये सुमारास पुणे सातारा रोड येथील डी-मार्टचे समोर
पुणे येथे यातील फिर्यादी हे ट्रॅव्हल्स गाडीतून मधून उतरून वर नमुद ठिकाणी थांबले असताना मोपेड गाडी वरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना घेरून त्यातील एका इसमाने त्याचेकडील चाकु फिर्यादीच्या पोटाला लावुन त्याचा धाक दाखवुन फिर्यादी यांचे खिशातील रोख ३,०००/- रू.व एक मोबाईल असा एकुण ६१,०००/- रू. किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला आहे.फौजदार सागर पाटील मो.नं.८४२४००३९९२ यापाराक्र्णी अधिक तपास करत आहेत.

मयूरपंख रथा’तून रात्री आठ वाजता निघणार भाऊ रंगारी बाप्पाची विसर्जन मिरवणूक

पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या मयूरपंख रथामधून निघणार आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता टिळक पुतळा येथून या विसर्जन मिरवणुकीला सुरवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या मिरवणुकीबाबत माहिती देताना उत्सवप्रमुख पुनीत बालन म्हणाले, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाची विसर्जन मिरवणूक लक्षवेधक अशीच असेल.

आचार्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते सकाळी साडेसात वाजता अनंत चतुर्दशीची पूजा होईल. त्यानंतर साडेआठ वाजता वरद विघ्नेश्वर वाडा येथून बाप्पाचा ‘मयुरपंखी रथ’ विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ होईल. दिवसभरात मानाच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर रात्री आठ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होईल. या मिरवणुकीसाठी आकर्षक विद्युत रोषणाईने मयूरपंख रथ सजविण्यात आला असून या रथासमोर पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशा पथके जोरदार वादन करणार आहेत. श्रीराम, शिवमुद्रा आणि समर्थ या ढोल ताशा पथकांबरोबरच मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक होणार आहेत. ” वेळेत विसर्जन मिरवणूक संपविण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही बालन यांनी सांगितले.


‘‘पुण्यातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक हे जगभरातील गणेश भक्तांचे प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे ती मिरवणूक देखणी, आकर्षक आणि दिमाखदार कशा प्रकारे होईल, असा सर्वच गणेश मंडळांचा प्रयत्न असतो. आमचाही असाच प्रयत्न राहणार आहे. अधिकाधिक गणेश भक्तांनी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन आनंद घ्यावा आणि बाप्पाला भक्तीभावाने निरोप द्यावा.’’-पुनीत बालन(विश्वस्त व उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

तरविंदरसिंह मारवा यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करा पुणे शहर जिल्हा काँग्रेसची मागणी.

 पुणे –    लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना नुकतीच दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे नेते तरविंदर सिंग मारवा यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला जर अशा धमक्या भाजपाचे नेते देऊ लागले तर भाजपच्या या राज्यात सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील हे आपणास दिसून येते.आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तरविंदरसिंह मारवावर गांधी फॅमिलीवर झालेल्या हल्ल्याची पार्श्वभूमी पाहता कठोरात कठोर कारवाई व्हावी व त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांना निवेदन देण्यात आले.

     यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर सौ. कमल व्यवहारे, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्ष संगीता तिवारी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित विभागाचे अध्यक्ष सुजित यादव, रफिक शेख, अविनाश साळवे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, प्रभाग अध्यक्ष मुन्ना खंडेलवाल इत्यादी उपस्थित होते.

 पुनीत बालन स्टुडिओ निर्मित अ‍ॅक्शनपट ‘रानटी’  रुपेरी पडद्यावर

जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच ‘रानटी’ नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, ह्या हल्ल्याना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त ‘रानटी’ असतो. या कथेचा नायक असाच ‘रानटी’ बनला. म्हणून… “काही ‘रानटी’ असतात, काही बनतात!

प्रदर्शित झालेल्या ह्या पोस्टरवरनं ‘रानटी’ चित्रपट दिसतोय तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने  भरलेला आहे. मराठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अ‍ॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे ‘रानटी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हे ‘सरप्राईज’ असणार आहे.

शरद केळकर हा हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा नट हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे ह्या पोस्टरमधूनही कळतंय आणि त्याचा ‘रानटीपणा’ नेमका किती आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की,’अधर्मी वृत्तींचा नाश करणार्‍या विष्णूची भूमिका मी यात केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा अतिशय आनंद आहे.

चित्रपटातील भव्यपणा दाखवण्याची जबाबदारी दिग्दर्शक समित कक्कड ह्यांनी पार पाडलीये. धारावी बँक, इंदोरी इश्क, हाफ तिकीट, आयना का बायना, आश्चर्यचकीत, 36 गुण, अशा भन्नाट कथानकांची स्टाईल हाताळणारा आणि सादर करण्याची कुवत दाखविणाऱ्या या दिग्दर्शकाकडून ‘रानटी’च्या निमित्ताने श्वास रोखून ठेवणारा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक समित कक्कड ज्यांच्या कलाकृतीमध्ये कायम नाविन्यपूर्ण विषय पाहायला मिळतात. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समित कक्कड यांनी रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. मोठ्या पडद्यावर मराठीत आजवर न पाहिलेली पॉवरफुल्ल अ‍ॅक्शन, एंटरटेनमेंट ‘रानटी’ चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटातून महाराष्ट्रातील न्यू ‘अँग्री यंग मॅन’ शरद केळकरच्या रूपाने मिळणार असल्याचे समित सांगतात. समित कक्कड फिल्म्स प्रॉडक्शन्स आणि सन्स ऑफ सॉईल मीडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येणार्‍या या चित्रपटाच्या निर्मीती पुनीत बालन यांनी केली आहे.

ह्या सिनेमासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.

आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कायम उत्तम कलाकृतीला पाठिंबा देणारे निर्माते पुनीत बालन म्हणाले की, ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने एक चांगली टीम झाली आहे. दिग्दर्शक समित कक्कड याने नेहमीच आपल्यातील वेगळेपण दाखविला आहे. त्याच्या साथीने मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे. हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.२२ नोव्हेंबरला हा चित्रपट आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. 

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेतनैशा रेवसकर‌ हिला रौप्य पदक

पुणे – नैशा रेवसकर‌ या पुण्याच्या खेळाडूने हिमाचल प्रदेश मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील पंधरा वर्षाखालील मुलींच्या गटात रौप्य पदक पटकाविले‌.

अखिल भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या मान्यतेने हिमाचल प्रदेश टेबल टेनिस संघटनेने कांगरा येथे ही स्पर्धा आयोजित केली होती. नैशा हिला अंतिम फेरीत दिव्यांशी भौमिक हिच्याकडून ४-११,८-११,२-११ असा तीन गेम्स मध्ये पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत नैशा हिने आरुषी नंदी हिच्यावर ६-११,११-९,११-९,११-६ अशी मात केली होती तर उपांत्यपूर्व फेरीत तिने प्रीती पॉल हिचा चुरशीच्या लढतीनंतर १३-११, ११-६,१०-१२,४-११,११-९ असा पराभव केला होता.

नैशा हिला रौप्यपदकाबरोबरच अकरा हजार दोनशे रुपयांचे पारितोषिकही मिळाले. ती एम्स अकादमीत नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते आजपर्यंत तिने जिल्हा व राज्यस्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकाविले आहे.

आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा उत्सव मित्र मंडळकडून सत्कार

पुणे : उत्सव मित्र मंडळ,नवी पेठ यांच्याकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.तसेच श्रींची आरती कसबा-विश्रामबाग विभागाचे वरीष्ठ आरोग्य निरीक्षक अशोक बंडगर,आरोग्य निरीक्षक संतोष कदम ,मुकादम महादेव अडागळे, आरोग्य सेवक व सेविका,मंडळाचे हितचिंतक.भरत यादव,अतुल प्रधान यांच्या शुभहस्ते संपन्न झाली.मंडळाकडून आरोग्य विभागाच्या ५ पुरुष कर्मचारी व ५ महिला कर्मचाऱ्यांना .भरत यादव व अतुल प्रधान यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष  सुधीर काळे अध्यक्ष अतुल धर्मे,सुमित काळे,विनय कदम,सचिन गायकवाड,तुषार सस्ते,सुनिल वाबळे,सुनिल पाटील,संदीप खराटे, विजय लोणकर,शैलेश कदम,आकाश खराटे,बाळासाहेब कांबळे आदी  पदाधिकारी उपस्थित होते.’ज्यांचा सत्कार केला आहे ते सर्व घरचा उत्सव व सण विसरून  संपूर्ण परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.त्यांच्या योगदानासाठी सामाजिक भावना मनात ठेवून सत्कार करण्यात आला आहे’,असे सुधीर काळे यांनी सांगितले 

विसर्जन मिरवणुकीत घुमणार ‘अयोध्यापती ताल’ 

समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज आणि ढाल-तलवार पथकातर्फे नवा ताल
पुणे : अयोध्यापती प्रभू रामचंद्र यांचे ‘रामजी की निकली सवारी’ आणि ‘भारत का बच्चा बच्चा’ या गीतांवर आधारित नवीन ठेका यंदा विसर्जन मिरवणुकीत घुमणार आहे. तालवादनाने याचा प्रारंभ नुकताच झाला.

मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी येथे उत्सवमंडपात या नवीन तालाचे वादन झाले. समर्थ प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी (२५) वर्षाचे औचित्य साधत हिंदी दिनानिमित्त हिंदी भाषिक उत्तर प्रदेशातील गीतांवर आधारित हा नवीन ताल रचण्यात आला आहे.

यावेळी ‘भगवाधारी’ या पथकाच्या नवीन नाम फलकाचे उद्घाटन देखील करण्यात आले. श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, खजिनदार प्रशांत टीकार, विश्वास नेऊरगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते यांच्या संकल्पनेतून हा ताल बसवण्यात आला आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची संघर्षगाथा आज १६ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळालं तरी मराठवाडा निजामाच्या विळख्यातून मुक्त झाला नव्हता. मराठवाड्यातील जनतेने त्यासाठी उभारलेल्या अभूतपूर्व लढ्याला अखेर यश येऊन १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. या घटनेला १७ सप्टेंबरला ७६ वर्षं पूर्ण होत आहेत. या खास दिनाचे औचित्य साधत ‘मुक्तीसंग्राम- कथा मराठवाड्याच्या संघर्षाची’ हा ७५ मिनिटांचा नाट्य माहितीपट येत्या १६ सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर दु.२ वाजता आपल्या भेटीला येणार आहे. जास्तीजास्त प्रेक्षकांनी हा नाट्य माहितीपट पाहावा असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

महामंडळाची निर्मिती असलेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या माहितीपटात अजय पुरकर, समीर विद्वान्स, समीर धर्माधिकारी, सचिन देशपांडे, श्रीकांत भिडे, अभिजीत श्वेतचंद्र, अक्षय वाघमारे, पूजा पुरंदरे, विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे, बिपीन सुर्वे, ऋषी सक्सेना, ऋतुजा बागवे, दिप्ती धोत्रे, विराजस कुलकर्णी, आस्ताद काळे, आदिनाथ कोठारे, आशुतोष वाडेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

मराठवाड्यातील मुक्तिसंग्रामाचा ऐतिहासिक कालखंड सर्वांना पाहता यावा यासाठी विविध माध्यमातून या माहितीपटाचे प्रसारण करण्याचे नियोजन शासन करत आहे. यातील एक भाग म्हणजे सहयाद्री वाहिनीवर प्रेक्षपण करत आहोत.: स्वाती म्हसे पाटील,व्यवस्थापकीय संचालिका

माहितीपटाचे दिग्दर्शक दिग्पाल सुनिल लांजेकर म्हणतात, ”इतिहास हा माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असून या माहितीपटाच्या माध्यमातून आपल्या स्वातंत्र्यवीरांचा संघर्ष प्रेक्षकांसमोर आणण्याचा मी प्रयत्न केला आहे. या ऐतिहासिक माहितीपटात तगड्या कलाकारांनी भूमिका साकारली असून यानिमित्ताने आम्ही मुक्तीसंग्राममध्ये सहभागी झालेल्या वीरांना आदरांजली वाहात आहोत.”