Home Blog Page 3320

नियमित योगसाधनेने सकारात्मक विचार क्षमता वाढते मारुती पाडेकर; एमआयटीमध्ये तिसरा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

0
पुणे: “ योगसाधनेमुळे सकारात्मक विचार करण्याची क्षमता विकसित होते.
शरीर, मन व बुद्धीची एकात्मता साधण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी योगाभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक आजारांना दूर ठेवणे शक्य होते. त्यामुळे सर्वांनी नियमितपणे योगासने केली पाहिजेत,” असा सल्ला योगाचार्य मारुती पाडेकर यांनी दिला.
डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे तिसर्‍या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून कोथरूड येथील माईर्स एमआयटीच्या प्रांगणात योगदिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्यावेळी सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन करताना योगाचार्य  मारुती पाडेकर बोलत होते. याप्रसंगी जपान येथील इंडियन रिजन ऑफ शार्प कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक टोमियो इसोगाई, जापनीज कॅलिग्राफर कझुको बारिसिक, जगविख्यात पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे व पतंजली योग समिती (महाराष्ट्र पश्‍चिम विभाग) चे प्रमुख बापू पाडळकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. रामचंद्र पुजेरी यांच्यासह माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहातील प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व हजारो विद्यार्थी या योगासन कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगसाधनेची प्रेरणा देण्याचा संकल्प केला.
मारुती पाडेकर यांनी शिबिरार्थींना योगाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. पाडेकर म्हणाले, “ जगात हा आनंदाचा क्षण आहे. परंतू एमआयटीने हा आनंद १८वर्षांपासून घेण्यास सुरूवात केली. येणार्‍या काळत डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यामातून संपूर्ण जगाला सुख आणि शांतीचा संदेश दिला जाईल. योगामुळे आध्यात्मिक प्रगती सुद्धा साधली जाईल. किंबहुना योगसाधना हा आध्यात्मिक उन्नतीचाच मार्ग आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदवी पाऊले !  या उक्तीनुसार डॉ.विश्‍वनाथ कराड यांनी  कार्य करून दाखविले आहे. श्‍वास घेणेसुद्धा एक यौगिक क्रियाच आहेे.”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “ भारतीय संस्कृती, परंपरा आणि भारतीय योगाच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने आंतरिक समाधान लाभते. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातू जगाला सुख, समाधान व शांती मिळेल. बुद्ध आणि गांधी यांच्या नावाने सर्व जगात आपला देश ओळखला जातोे.२१व्या शतकात संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याचे दायित्व भारताचे असेल. भारतामध्ये पतंजलींसारख्या अनेक ऋषींनी योगाची रुजवण केली. तीच परंपरा बीकेएस अय्यंगार, शेलारमामा आणि रामदेवबाबा यांनी पुढे चालू ठेवली.  योगदिनाच्या माध्यमातून तरुणांमध्ये स्वाभिमान व भारतीय अस्मिता जागविण्याचा प्रयत्न होत आहे. श्रध्दा आणि निष्ठेशिवाय खरे ज्ञान मिळू शकत नाही.”
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले,“ एमआयटीमध्ये गेली अनेक वर्षापासून योगाभ्यास  केला जात आहे. आता रामदेव बाबा यांच्या माध्यमातून संपूर्ण जगात योगाचा प्रसार होत आहे. विश्‍वाला नवस्फूर्ती देण्यासाठी पुढील वर्षी एमआयटी प्रांगणात मोठ्या संख्येने योगासनांचा कार्यक्रम केला जाईल. डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून देशातील शिक्षणक्षेत्रात योगप्रसाराचे कार्य मोठ्या प्रमाणात केले जाईल.”
डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले,“ वैज्ञनिक दृष्टया योगाला खूप महत्व आहे. हे वैद्यकशास्त्राने सिद्ध केले आहे. त्यामुळेच आज सर्व जगातील वैज्ञानिकांनी योगसाधनेचा केवळ स्वीकारच नव्हे, तर स्वागत केले आहे. त्यामुळे जगातील सर्व मानव समाज योगाभ्यास करून आपले आरोग्य उत्तम राखू शकेल. योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक दृष्टया तंदुरूस्त बनते. ”
प्रा.अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.

गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलमध्ये योगाच्या आंतरशालेय स्पर्धा संपन्न

0

पुणे :- आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने गोयल गंगा  इंटरनॅशनल स्कूल येथे योगाच्या आंतरशालेय स्पर्धा पार पडल्या. यात ११ शाळांमधील १२ वर्षाच्या आतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अक्षरा इंटरनॅशनल, गोयल गंगा  इंटरनॅशनल स्कूल, विद्यानंद स्कूल, साधू वासवानी स्कूल यांसारख्या शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

मुलांच्या गटात अक्षरा इंटरनॅशनलने तर मुलींच्या गटात साधू वासवानी स्कूलने प्रथम क्रमांक पटकावला.विजेत्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात आले.

यावेळी गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल,शाळेच्या विश्वस्त सोनू गुप्ता ,मुख्याध्यापिका भारती भागवानी, तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. योग गुरु दिगंबर कदम ,संगीता महाबोले,प्रिया कदम, अपूर्वा सावंत, आदित्य शेडकर यांनी ८०० पेक्षा जास्त मुलांना  ध्यानधारणा,अनुलोम विलोम,प्राणायाम चे धडे दिले.

नियमित आणि योग्य योग साधनेमुळे शारीरिक क्षमता वाढते, मानसिक स्थिरता, व्याधी विरहीत शरीर, व्यक्तिमत्त्व विकास, मानसिक संतुलन, सकारात्मक दृष्टीकोन, उत्साह असे अनेक फायदे आहेत. एखाद्या अनुभवी योग शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार नियमित योगसाधना करणे सर्वांच्याच दृष्टीने हिताचे आहे असा सल्ला गोयल गंगा फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल यांनी मुलांना दिला.

जॉब फेअरमध्ये ३० हून आघाडीच्या कंपन्यांतर्फे नोकरीची संधी

0

पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने www.freshersjobfair.in च्या सहकार्याने येत्या शनिवारी (२४ जून) आपल्या बावधन कॅम्पसमध्ये (सर्व्हे नं. ३४२, पाटील नगर, बावधन, चांदणी चौक – पाषाण रोड) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत जॉब फेअर या नोकरी मेळ्याचे आयोजन केले आहे. करिअर विकास पुढाकारांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर व नोकरीचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेने या उपक्रमाचे खास आयोजन केले आहे. सर्व आयटीआय/डिप्लोमा/पदवीपूर्व/पदवीधर/बीई/बीटेक/फार्मसी/पदव्युत्त पदवी विद्यार्थ्यांसाठी हा मेळा म्हणजे रोजगाराची सुवर्णसंधी ठरणार आहे.

 या मेळाव्यात ३० हून अधिक आघाडीच्या कंपन्या नोकरी देऊ करण्यासाठी सहभागी होणार असून त्यात इन्फोसिस, एचसीएल, एचडीएफसी बँक, युरेका फोर्ब्ज, कोटक महिंद्र बँक, एल अँड टी फायनान्स, सीड इन्फोटेक, एफआरआरफॉरेक्स, इक्विटास मायक्रो फायनान्स, अपोलो आदींचा समावेश आहे. मानवी साधनसंपत्ती (एचआर), वित्त, विक्री, माहिती तंत्रज्ञान विकास, यांत्रिकी, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, स्थापत्य, बीपीओ केपीओ आयटीईएस आदी क्षेत्रांतील रोजगार संधींचा लाभ इच्छुकांना घेता येईल. (कंपन्यांचे नाव, पद, अनुभव, उमेद्वारी पात्रता याचा सविस्तर तपशील सोबत जोडला आहे.)

शून्य ते तीन वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या आणि कमाल २९ वयोमर्यादा असलेल्या इच्छुक उमेद्वारांना या मेळ्यासाठी आमंत्रित केले जात असून त्यांनी आपल्यासोबत किमान ८ ते १० रेझ्युमे आणावेत आणि मेळ्याच्या ठिकाणी सादर करावेत. नोकरी मिळाल्यास त्यांना पात्रता व अनुभव यानुसार महिन्याला १२ हजार रुपये ते १८ हजार रुपये आणि १८ हजार रुपये ते ३० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणे अपेक्षित आहे. आतापर्य़ंत २००० इच्छुकांनी या जॉब फेअरसाठी नावनोंदणी केली आहे. नावनोंदणीसाठी प्रत्येकी २०० रुपये शुल्क आहे.

 सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आपल्या करिअर विकास पुढाकाराचा भाग म्हणून अशी जॉब फेअर दरवर्षी आयोजित करते. गेल्या वर्षी तर त्यांनी नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत फ्रेशर्स जॉब.इन व टाइम्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने २ जॉब फेअरचे आयोजन केले होते.

 सूर्यदत्ता ही नोकरीची संधी सर्व इच्छुकांना, प्रत्येकाला आणि प्रत्येक वर्षी मिळवून देते. या मेळ्यात ४००० हून अधिक विद्यार्थी व काम करणारे व्यावसायिक भाग घेत आहेत. या नोकरी मेळ्यात कंपनीच्या धोरणानुसार सुयोग्य उमेद्वारांना जागीच नियुक्तीपत्रे मिळतात, तर पात्र उमेद्वारांची निवड यादी बनवली जाते.

 सर्व विद्यार्थ्यांसाठी (बारावी उत्तीर्ण/पदवीपूर्व/पदव्युत्तर विद्यार्थी व काम करणारे व्यावसायिक) हा नोकरी मेळा घेण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे त्यांना एकाच छत्राखाली विविध नोकरी संधी मिळवून देणे, हा आहे.

सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसआयएमएमसी) या संस्थेला सलग २ वर्षे (२०१५ – २०१६ व २०१६ -२०१७) प्लॅटिनम श्रेणीमध्ये मानांकन मिळाले आहे.

नोकरभर्ती करणाऱ्या सर्व संस्थांना अशा मेगा जॉब फेअर आयोजित करण्यासाठी सूर्यदत्ताचा बावधन कॅम्पस हे प्राधान्याने पसंतीचे ठिकाण ठरले आहे. अशा मेळ्यांसाठी आवश्यक असलेल्या ऑडिओ व्हिडिओ क्लासरुम्स, १००० प्रेक्षक क्षमतेचे सभागृह, शाकाहारी कॅफेटेरिया, भरपूर क्षमतेचा वाहनतळ, विशाल खुल्या लॉबीज व जागा, कंपन्यांच्या एचआर विभागांशी समन्वय साधण्यासाठी उत्साही कर्मचारीवर्ग व विद्यार्थी अशा सुविधा सूर्यदत्ता ग्रुपकडे उपलब्ध आहेत.

 सर्व विद्यार्थी, काम करणारे व्यावसायिक अथवा नोकरीस इच्छुक उमेद्वार यांनी या जॉब फेअरसाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन सूर्यदत्ताचे प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केले आहे.

 

डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत डेक्कन इलेव्हन अ, बीईजी संघांचे विजय

0

पुणे-पुणे जिल्हा फुटबॉल संघटना(पीडीएफए)यांच्या तर्फे आयोजित डीएसके टोयोटा पुणे फुटबॉल लीग स्पर्धेत सुपर डिव्हिजन श्रेणी गटात डेक्कन इलेव्हन अ, बीईजी या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

बीईजी  येथील फुटबॉल मैदानवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात डेक्कन इलेव्हन अ संघाने संगम यंग वन्स संघाचा २-० असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच डेक्कन इलेव्हन संघाच्या खेळाडूंनी आक्रमक धोरण स्वीकारले. ८व्या मिनिटाला डेक्कन इलेव्हन संघाच्या जीवन नलगे याने चेंडूचा ताबा मिळाल्यानंतर शुभम बिबवेकडे पास दिला. शुभम बिबवे याने चेंडू नियंत्रित केला व मिळालेल्या संधीचे सोने करत गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर संगम संघाने जम बसवायला सुरुवात केली. संगमच्या सोमेश सिंग, आरिष शेख यांना संघाला आघाडीवर नेण्याची संधी मिळाली होती, पण डेक्कन इलेव्हन संघाची बचावफळी भेदू शकली  नाही.  १२व्या मिनिटाला लिऑन नायर याने दिलेल्या पासवर साहिल भोकरे याने संधी साधत गोल नोंदवून डेक्कन इलेव्हन संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हि स्थिती कायम होती. उत्तरार्धातील खेळ सुरु झाल्यानंतर संगम यंग वन्सला आघाडीची प्रतीक्षा राहिली. अमेय तलगांवकर, सोमेश सिंग यांनी डेक्कन इलेव्हनच्या गोलकक्षात वेळोवेळी धडक मारत होते, परंतु प्रतिस्पर्ध्यांचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश येत होते. डेक्कन इलेव्हनने बचावावर जास्त लक्ष केंद्रित करताना संगम यंग वन्सची आक्रमणे सफल ठरणार नाही याकडे लक्ष दिले. सामन्याच्या शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवत डेक्कन इलेव्हन अ संघाने संगम यंग वन्स संघावर २-० असा विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात बीईजी संघाने डेक्कन रोव्हर्स अ संघाचा ८-० असा धुव्वा उडविला. बीईजी कडून प्रेमानंद सिंग(३,१५,७०,८५मि.) याने चार गोल, सिमॉन अॅनलने दोन गोल, तर रिठा अॅनल आणि आर.जे.सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

डेक्कन इलेव्हन अ: २(शुभम बिबवे ८मि.पास-जीवन नलगे, साहिल भोकरे १८मि.पास-लिऑन नायर)वि.वि.संगम यंग वन्स: ०;

बीईजी: ८(प्रेमानंद सिंग ३,१५,७०,८५मि.,सिमॉन अॅनल ११, ७९मि.,रिठा अॅनल ३०मि.,आर.जे.सिंग ३७मि.)वि.वि.डेक्कन रोव्हर्स अ: ०.

ह. भ. प. मंगला फुके यांना माऊली पुरस्कार प्रदान

0

पुणे-

अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट आणि अभिषेक साप्ते स्मृती फाऊंडेशनतर्फे शंकरराव साप्ते यांच्या स्मरणार्थ  ह. भ. प. मंगला फुके यांना माऊली पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार उल्हास पवार ,माजी उपमहापौर दीपक मानकर, अशोक कोकाटे, चंद्रकांत सणस, माजी नगरसेवक दत्ता सागरे, अशोक जाधव, दिपक साप्ते, पंडितराव रोकडे उपस्थित होते. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्कारचे स्वरुप होते.

दीपक मानकर म्हणाले,  वारीमधून आचार-विचारांची शिकवण मिळते. वारी करणे म्हणजे परमेश्वराची सेवा आहे. परमेश्वराची सेवा करताना ऊन, वारा, पाऊस, तहान, भूक लागत नाही. त्यामुळे वारीमध्ये एक वेगळ्या प्रकारचे वातावरण तयार झालेले असते. यामध्ये सामील झालेल्या वारक-यांमध्ये भगवंत स्वत: ऊर्जा निर्माण करून देतो.

अशोक जाधव म्हणाले, वारकरी संप्रदायामध्ये अखंडित वारी आणि मनोभावे विठ्ठलाची सेवा करणाºया वारकºयाचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात येतो. ह.भ.प. मंगला फुके या अतिशय समर्थपणे ५०० लोकांची दिंडी चालवत आहे. अनेक वर्षे वारकरी संप्रदायाची परंपरा त्या पार पाडत आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. दिपक काळे यांनी सूत्रसंचालन केले. अथर्व जाधव यांनी आभार मानले.

परस्पर स्कुलबस चा दर दुप्पट केल्याने मुंढे विरोधात संताप

0

पुणे- तुकाराम मुंढे नावाचे  अधिकारी पीएमपीएमएल ला आले  म्हणजे पुण्यातील वाहतुकीचे सर्व काही सुरळीत झाले असे अजून तरी कोणी मानत  नाही . आणि नव्याची नवलाई संपून , मुन्ढेचे कोडकौतुक करण्याचे दिवस आता सरलेत हेच खरे .. परस्पर हेकट वृत्ती दाखवून स्कूलबस चा दर दुप्पट केल्याने तुकाराम मुंढे विरोधात आता संतापाची लाट उसळते आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या सुपुत्राला मुंढे नी दिलेली वागणूक  सर्वांना ठाऊक आहे , शिरोळे आपले सोज्वळ म्हणून मिटले सारे ..पण पुढे पुढे मुंढे यांची हेकटशाही वाढते कि काय ? असा प्रश्न निर्माण होईल अश घटना घडताना  दिसत आहेत .लोकप्रतिनिधींना  फाट्यावर टाकून परस्पर निर्णय घेण्यात जणू यांना स्वर्गीय सुखाचा आनंद प्राप्त होतो असे आता बोलले जावू लागले आहे .

याचाच भाग म्हणून कि काय ; शाळांना पुरवण्यात येणाऱ्या बससेवेचे दर दुपटीने वाढवताना संचालक  मंडळाला विश्वासात घेणे आवश्यक होते, मात्र पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे  पीएमपीएमएलचे मालक असल्यासारखे वागत असल्याची टीका स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहळ यांनी आज केली.
पुणे शहरामध्ये शाळांना पीएमपीएमएलकडून पुरवण्यात येणाऱ्या बससेवेचा दर 61 वरून 141 रुपये करण्यात आला असून हा निर्णय घेताना मुंढे यांनी संचालक मंडळाला विश्वासात घेतले नाही. हा निर्णय धोरणात्मक नसून प्रशासकीय असल्याचे सांगत मुंढे यांनी या  निर्णयापासून लोकप्रतिनिधींना दूर ठेवले, मात्र यामुळे नागरिकांच्या प्रश्नांना लोकप्रतिनिधींना तोंड द्यावे लागत आहे, अशी आगपाखडही मोहळ यांनी केली.
मोहळ म्हणले की, मुंढे यानी निर्णय घेताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले पाहिजे. महापालिकेच्या सभांना सुध्दा ते येत नाहीत. आपण पीएमपीएमएलचे मालक असल्यासारखे ते वागत आहेत. महापालिका आणि पीएमपीएमएल यांच्यामध्ये समन्वय असला पाहिजे. महापालिका पीएमपीएमएल कंपनीमध्ये भागधारक आहे. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका आयुक्त हे संचालक मंडळाचे सभासद आहेत. त्यामुळे त्यांना सुध्दा महत्वाच्या निर्णयामध्ये सहभागी करुन घेतले पाहिजे.
मुंढे यांनी अचानकपणे शाळांच्या बस बंद केल्या. शाळा सुरु झाल्या असून मुलांचे हाल होत आहेत. अचानक पैसे वाढवल्यामुळे शाळांना पर्यायी व्यवस्था सुध्दा करता आली नाही. मनमानी पध्दतीने मुंढे काम करत असल्याचा आरोप मोहोळ यांनी केला आहे.

ज्ञानोबा तुकारामांच्या पालख्या ..पंढरीच्या वाटेवरी मार्गस्थ …

0

पुणे- दोन दिवसांच्या मुक्कामानंतर निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखी आज सकाळी मार्गस्थ झाली ,सकाळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने संत ज्ञानेश्वर माऊली व जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी स्वागताकरीता पुलगेट येथे स्वागत कक्ष उभारुन दोन्ही पालख्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालखीतील वारकरी बांधवाना फराळांचे पाकीट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. दोन्ही पालख्यांचे आदरतिथ्य झाल्यानंतर दोन्ही पालख्या पुढे  रवाना झाल्या.


नंतर पालखीचे हडपसरवासीयांनी उत्साहात स्वागत केले. विसावास्थळी रांगोळ्याच्या पायघड्या व फुलांच्या वर्षावाने स्वागत करण्यात आले. दुतर्फा गर्दी करून पालखीचे दर्शन घेत वारकऱ्यांना फराळ, अन्नदान करण्यात आले. विसावा घेतल्यानंतर माउलींची पालखी सासवड रस्त्याने ; तर तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्याने लोणी काळभोर मुक्कामी मार्गस्थ झाली.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास; तर संत तुकाराम महाराजांची पालखीपावणेबाराच्या  सुमारास हडपसरमध्ये पोचली. विसावा घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास; तर तुकाराम महाराजांची पालखी दुपारी दीडच्या सुमारास मार्गस्थ झाली.  स्वागतासाठी महापौर मुक्ता टिळक, आमदार योगेश टिळेकर, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी महापौर वैशाली बनकर, चंचला कोद्रे, नगरसेवक योगेश ससाणे, मारुती तुपे, संजय घुले, उज्वला जंगले, बंडू गायकवाड, हेमलता मगर, नाना भानगिरे उपस्थित होते. गाडीतळ येथे पादुकांची पूजा झाल्यानंतर लाखो भक्तांनी दर्शनबारीमध्ये उभे राहून शांततेत दर्शन घेतले.

विद्युत वितरण सनियंत्रण समित्या आता मनपा क्षेत्रामध्ये गठित होणार

0

मुंबई :

महापालिका क्षेत्रातील वीज ग्राहक व वितरण कंपनी यांच्यात सुसंवाद व समन्वय व्हावा म्हणून व ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तराप्रमाणे महापालिका क्षेत्रातही विद्युत वितरण संनियंत्रण समित्या गठित करण्यास शासनाने मंजुरीचे परिपत्रक जारी केले आहे.

वीज पुरवठा हा अत्यंत महत्वाची बाब असून महापालिका क्षेत्रात अशा नियंत्रण समित्या गठित केल्या तर ग्राहक व महावितरण यांच्यात सुसंवाद राहील व ग्राहकांच्या समस्या लवकर सोडविण्यात येतील. विद्युत वितरण सनियंत्रण समिती गठित झाल्यावर या समितीच्या बैठका दर तीन महिन्यांनी होतील. बैठकीतील निर्णयांची माहिती शासनाला करावयाच्या शिफारसीसंदर्भात मुख्य अभियंत्यामार्फत शासनाला कळवावी.

मनपा क्षेत्रातील या समितीचे गठन मनपा आयुक्तांनी करावे. त्यापूर्वी अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीला पालकमंत्र्यांची सहमती घ्यावी. महिनाभरात ही नियुक्ती करावी. अशासकीय व शासकीय सदस्यांना प्रवास खर्च व देय भत्ते अनुज्ञेय नाही.

या समितीच्या अध्यक्षपदी विधानसभा सदस्य, सहअध्यक्ष, संबंधित क्षेत्रातील विधानसभा सदस्य व त्या क्षेत्रातील महावितरणचे कार्यकारी अभियंता, सदस्य म्हणून त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील सर्व झोन सभापती, विधानसभा मतदारसंघातील 10 नगरसेवक, आयुक्त नेमतील ते मनपा अधिकारी, त्या-त्या विधान सभा मतदारसंघातील तहसिलदार या शिवाय उद्योग, शिक्षण व्यावसायिक ग्राहक, घरगुती ग्राहक, वितरण क्षेत्रात उत्कृष्ट काम कारणारी व्यक्ती, ग्राहक हितासाठी काम करणाऱ्या दोन अशासकीय संस्थांचा एक प्रतिनिधी. यांचा समावेश असेल.

 

अाढावा बैठक

महावितरणतर्फे प्रत्येक जिल्हयात सुरू असलेल्या व मंजूर असलेल्या विकास कामांची माहिती जिल्हयाचे पालक मंत्री, अन्य मंत्री, विधिमंडळ सदस्य यांना देण्यासाठी प्रत्येक जिल्हयातील अधीक्षक अभियंत्यांने प्रत्येक महिन्याच्या कार्यालयीन कामकाजाच्या शेवटच्या दिवशी अाढावा बैठक आयोजित कारावी असा निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने घेतला आहे.

तिसर्‍या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

0

पुणे : संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्णयानुसार २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे तिसर्‍या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून बुधवार, दि. २१ जून २०१७ रोजी सकाळी ७.०० वाजता कोथरूड येथील माईर्स एमआयटीच्या प्रांगणात योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराच्या निमित्ताने माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सुमारे १० ते ११ हजार विद्यार्थी या योग प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहेत. तसेच पतंजली योग समितीचे २०० लोक या शिबिरात सहभागी होणार आहेत.
योगाचार्य श्री. मारुती पाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे योग प्रशिक्षण शिबिर संपन्न होणार आहे. जपान येथील इंडियन रिजन ऑफ शार्प कॉर्पोरेशनचे मुख्य अधिकारी व कार्यकारी संचालक श्री. टोमिओ इसोगाई, जापनीज कॅलिग्राफर कझुको बारिसिक, नोबेल पारितोषिक विजेते डॉ. राजेंद्र शेंडे, पतंजली योग समिती (महाराष्ट्र पश्‍चिम विभाग) चे प्रमुख श्री.बापू पाडळकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे १९९६ सालापासून दरवर्षी २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकरिता योग प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाते. १९८३ सालापासून एमआयटी संस्थेच्या प्रांगणात धूम्रपान करण्यास बंदी आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व चारित्र्य संवर्धन व्हावे, यासाठी योगाला नेहमीच प्रोत्साहन दिले जात आहे.
माईर्स एमआयटीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या योग प्रशिक्षण शिबिरात जास्तित जास्त लोकांनी व विशेषतः विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी केले आहे.

आयएसएल स्पर्धेला फिफाच्या नियमांचे पालन करावे लागणार-गौरव

0
पुणे: आयलीग स्पर्धेतील सहभागाबद्दल या गोष्टीचा संबंध नसला तरी इंडियन सुपर लीग स्पर्धेतील संघांना फिफाच्या परदेशी खेळाडूसंबंधी विशिष्ट खेळाच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. या नियमाप्रमाणे त्यांना जास्तीत जास्त चार परदेशी खेळाडूंना खेळविण्याची परवानगी असल्याचे एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी सांगितले.
राजेश वाधवान समूह आणि ह्रितिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्पोरेट सुपर कप स्पर्धेतील विजेत्या संघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
गौरव मोडवेल पुढे म्हणाले कि, भारतातील अग्रगण्य आयलीग फुटबॉल स्पर्धेतील संघ आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघ यांच्यात आशियाई फुटबॉल कॉन्फिडरेशनच्या उपक्रमांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी सुरु असलेला वाद संपण्यासाठी अद्याप काही कालावधी लागणार आहे. यांसंबंधी आम्हांला लेखी सूचना अद्याप मिळालेल्या नसल्या तरी एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशन(एएफसी)कडून आयएसएलला  मान्यता मिळाली आहे आणि जर आयएसएलमधील संघ एएफसीच्या स्पर्धांमध्ये खेळणार असतील तर आम्हांला परदेशी खेळाडूसंबंधी एएफसीचा नियम मान्य करावा लागेन.
आशियाई फुटबॉल फेडरेशनने आयएसएलला नुकतीच अधिकृत मान्यता दिली असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आयलीग स्पर्धांमधील दोनच संघ एएफसी स्पर्धेसाठी पात्र ठरत असल्यामुळे त्यांचा आता या नियमासंबंधी एएफसीशी संघर्ष होऊ घातला आहे. सध्याची आयएसएल स्पर्धेतील परदेशी खेळाडूंसंबंधी नियम आणि धोरण हे एएफसी आणि फिफा नियमांपेक्षा वेगळे आहे. परंतु फिफा आणि एएफसीच्या नियमांप्रमाणे आता आम्हाला परदेशी खेळाडूंची संख्या चारवरच आणावी लागणार असल्याचे मोडवेल यांनी नमूद केले.
 आयएसएल आणि आयलीग स्पर्धा  एकाच वेळी खेळविल्या जाणार असल्यामुळे यासंबंधी कोणताही वाद निर्माण करण्याऐवजी अधिकाधिक खेळाडूंना दर्जेदार फुटबॉल खेळण्याची संधी मिळणे महत्वाचे आहे. दोन्ही लीग स्पर्धा एकाच वेळी होत असल्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या संघातील दर्जेदार खेळाडूंना देशातील सर्वोत्तम दर्जाची स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी आयएसएल स्पर्धा खेळण्यासाठी आयलीग संघाच्या खेळाडूंनी क्लबला परवानगी देणे आवश्यक होते. परंतु आता दोन्ही स्पर्धा एकाच वेळी होत असल्यामुळे दोन स्पर्धांमध्ये कोणते वेगळे खेळाडू हे संघांना निश्चित करावे लागणार आहे. तसेच, एकाच वेळी स्पर्धा होत असल्यामुळे व्यावसायिक फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या १०० ते १२० वरून आता थेट ३०० वर पोहोचणार आहे. त्यामुळे अधिकाधिक खेळाडूंना क्लबशी व्यावसायिक करार करण्याची  संधी मिळेल आणि राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी मोठ्या संख्येने गुणवान खेळाडू निर्माण होतील. भविष्यामध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघाला मोठ्या प्रमाणात गुणवान खेळाडू उपलब्ध करून देण्यासाठी हि योजना लाभदायक असल्याचे मोडवेल यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी कंपनीला कोटय़वधी रुपयांचा कर भरावा लागणार..नितीन करीर

0

पुणे -स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) या कंपनीला शासकीय दर्जा देण्यास कॅगने आक्षेप नोंदविल्यामुळे या कंपनीला कोटय़वधी रुपयांचा कर भरावा लागणार असल्याच्या राष्ट्रवादीच्या चेतन तुपे यांच्या वक्तव्यानंतर या वृत्तास कंपनीचे अध्यक्ष आणि राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. कंपनी कायद्यानुसार पीएससीडीसीएलची स्थापना झाली आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे करही भरावा लागेल. मात्र कंपनी फायदा मिळविणारी नसल्यामुळे तिला विशेष दर्जा देऊन करामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार असल्याचेही डॉ. करीर यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीस शासकीय दर्जा देण्यास कॅगने आक्षेप नोंदविला आहे. कंपनीमध्ये ५१ टक्के भागभांडवल हे राज्य शासनाचे नाही. त्यामुळे कंपनी शासकीय ठरत नाही. त्यामुळे या कंपनीला उलाढालीवर कर भरावा लागणार असल्याचे कॅगकडून स्पष्ट करण्यात आले होते.

त्यामुळे कंपनीला तीन हजार कोटी रुपयांच्या उलाढालीवर तब्बल नऊशे कोटी रुपये कर भरावा लागण्याची शक्यता आहे. ही बाब पुढे आल्यानंतर कंपनीला शासकीय दर्जा देण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर कंपनीला कर भरावा लागणार असल्याचे डॉ. नितीन करीर यांनी स्पष्ट केले आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकांची बैठक नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पीएससीडीसीएल ही शासकीय कंपनी नाही. त्यामुळे कंपनीला कर भरावा लागणार आहे. मात्र कंपनीला विशेष दर्जा देऊन करामध्ये सवलत द्यावी, असे पत्र केंद्र सरकारला पाठविण्यात येईल, असे आश्वासन करीर यांनी या बैठकीत दिले.

सँनफ्रान्सिसकोमध्ये रंगणार इंडियन अँकेडमी अँवाँर्ड सोहळा,शाहरूख खान या सोहळ्याचा ब्रँड अॅम्बेसेडर -मराठी सिनेमांचाही होणार गौरव

0

पणजी-: भारतीय सिनेमा आता जगातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला आहे. इतर देशात भारतीय सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणं करत आहे. या भारतीय सिनेमाचं जागतिक पातळीवर कौतुक होण्यासाठी इंडियन अॅकँडमी अँवाँर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सँनफ्रान्सिसको शहरात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे. गोव्यात सध्या सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्याभारतीय सिनेमा आता जगातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला आहे. इतर देशात भारतीय सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणं करत आहे. या भारतीय सिनेमाचं जागतिक पातळीवर कौतुक होण्यासाठी इंडियन अॅकँडमी अँवाँर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सँनफ्रान्सिसको शहरात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे. गोव्यात सध्या सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.  शाहरुख खान या पुरस्कार सोहळ्याचा ब्रँड अँबेसेडर आहे.

या आगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्यं म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडसोबत मराठी आणि टॉलिवूडच्या सिनेमांचाही गौरव करण्यात येणार आहे.  तसेच मराठी सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञांनाही गौरवण्यात येणार आहे. हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने भारताची शान उंच करणाऱ्या भारतीय कलाकारांनासुद्धा यावेळी गौरविण्यात येणार आहे. सौरभ पांडे, वंदना कृष्णा हे या पुरस्कार सोहळ्याचे प्रायोजक असून प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, अभिनेता सुशांत शेलार  तसेच विन्सन वर्ल्डचे संजय शेटये हे सहप्रायोजक आहेत.

‘अंड्या चा फंडा’ सिनेमाला लाभला लता दीदींचा शुभार्शिवाद

0
‘कुछ तो गडबड हे दया…’, ‘तोड दो दरवाजा…’ हे सी आय डी चे डायलाॅग्ज लोकं आजही आवडीने बोलतात. सामान्य प्रेक्षकांच्या मनात गेली कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलेल्या या मालिकेची भारताची गानकोकिळा ‘लता मंगेशकर’ देखील भरपूर मोठी फॅन आहे. विशेष म्हणजे या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष शेट्टी यांचा आगामी मराठी सिनेमा ‘अंड्या चा फंडा’ देखील याच धाटणीचा असल्यामुळे, लता मंगेशकर यांनी या सिनेमाला विशेष पसंती दिली आहे. नुकतेच या सिनेमाचे ‘गोष्ट आता थांबली’ हे गाणे लता मंगेशकर यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. विशेष म्हणजे लता दिदींच्या हस्ते एका मराठी चित्रपटाचे गाणे सादर करण्याची ही पहिलीच वेळ असून, हे भाग्य ‘अंड्या चा फंडा’ या सिनेमाच्या टीमला लाभलं आहे. आदर्श शिंदेच्या अवजातले हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, याला अमित राज यांनी ताल दिला आहे.
रहस्य आणि शोध कथा लिहिण्यास विशेष हातखंडा असणाऱ्या संतोष शेट्टी यांनीच या सिनेमाचे लेखन केले असल्यामुळे, हा सिनेमा नक्कीच रोमांचक असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, खुद्द लतादीदींना गूढ आणि शोधकथेवर आधारित असलेल्या मालिका तसेच सिनेमे बघायला भरपूर आवडतात, आणि त्यामुळेच त्यांनी ‘अंड्या चा फंडा’ या सिनेमातील गाण्याच्या प्रसिद्धीसाठी आपला अनमोल वेळ देऊ केला. याप्रसंगी सिनेमाचे दिग्दर्शक तसेच निर्मात्यांसोबतच अथर्व बेडेकर, शुभम परब, मृणाल जाधव हे बालकलाकार आणि दीपा परब व सुशांत शेलार या कलाकारांनी लतादीदींच्या निवासस्थानी हजेरी लावली होती. लाता दिदींनी या सर्वांना शुभार्शिवाद देत, सिनेमाच्या भरघोस यशासाठी शुभेच्छादेखील दिल्या. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी यांची निर्मिती असून प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी यांनी त्याची सहनिर्मिती केली आहे. तसेच  पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली असून जूनच्या अखेरीस ३० तारखेला हा सिनेमा लोकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहात पाहता येणार आहे.

 

‘लपाछपी’च्या अंगाईला लाभला रेखा भारद्वाज यांचा आवाज

0

मराठी सिने संगीताच्या आकर्षणाने हिंदीतील सुप्रसिद्ध गायक-गायिका मराठीत गाताना दिसून येत आहे, ‘ईश्कीया’ फेम हिंदीच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका रेखा भारद्वाज या देखील त्याला अपवाद नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या ‘लपाछपी’ या सिनेमातील अंगाईला त्यांचा आवाज लाभला आहे. ‘एक खेळ लापाछपीचा…’ असे बोल असलेल्या या अंगाई गीताचे भारद्वाज स्टुडियोमध्ये, नुकतेच रेखाजीच्या आवाजात रेकॉर्डींग करण्यात आले.

मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स  प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट आणि सुर्यवीरसिंग भुल्लर यांची निर्मिती असलेला हा हॉंरर सिनेमा असून, याचे दिग्दर्शन लेखन विशाल फुरिया यांनी केले आहे. तसेच दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल कपूर या जोडीने सिनेमाचे लेखन केले आहे. ‘लपाछपी’ सिनेमातल्या या अंगाई गाण्याच्या मूळ गायिका नंदिनी बोरकर जरी असल्या तरी रेखाजींच्या आवाजातील जादू या गीताला लाभली असल्यामुळे, ही अंगाई श्रोत्यांसाठी वेगळीच अनुभूती देणार आहे. स्वयेश्री शसीन वर्धावे यांनी ही अंगाई लिहिली असून, रंजन पटनाईक, टॉनी बसुमातरी आणि उत्कर्ष धोटेकर या तिघांनी त्याला ताल दिला आहे. ‘लपाछपी’ या हॉरर चित्रपटातील हे अंगाई गीत असल्यामुळे यात भय दाखवण्याचा प्रयत्न या तिघांनी केला आहे. पूजा सावंतची मध्यावर्ती भूमिका असलेल्या या सिनेमात उषा नाईक, अनिल गावस आणि विक्रम गायकवाड या कलाकरांचीदेखील भूमिका असून, येत्या  १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

वारकऱ्यांसाठी अनोखी सेवा

0
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले सारी पुण्यनगरी हरी नामाच्या गजराने न्हाऊन निघाली या निमित्त गेली २१ वर्ष वारकऱ्यांची अखंड सेवा पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या वतीने पुण्यनगरीचे मा. उपमहापौर आबा बागुल यांच्या कडून केली जाते १५०० हुन अधिक वारकरी इथे मुक्कामी असतात. वारकरी संप्रदायासाठी सकाळी चहा , नाश्ता,दुपारी स्वादिष्ट भोजन सायंकाळी चहा व रात्री रुचकर भोजनाची सोय करण्यात आली असून त्यांची केश कर्तनाची सोय , बॅग व चप्पल शिवण्याची व भजन कीर्तनाची उत्तम सोय करण्यात आली आहे .  तसेच वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हिंदू -मुस्लिमामध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी. एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी झाल्याने इतर धर्मा विषयी आदर निर्माण होतो या भावनेने गेली दोन वर्ष मुस्लिम बांधव मोठ्या हिरिरीने या उपक्रमात सहभागी होतात. स्वतःच्या हाताने पवित्र रमजान महिन्यात वारकऱ्यांच्या पायाला तेलाने मसाज करून वारकऱ्यांना पुढचा प्रवास सुखकर होण्यास प्रार्थना करतात जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने मुस्लिम बांधव या वारकरी सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतात.   
 यावेळी पुण्यनगरीचे माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल,मुस्लिम यंग सर्कलचे अध्यक्ष अल्ताफ सौदागर,अयाज सौदागर,मुनीर शेख,जावेद शेख, फारुख शेख,महेबूब नदाफ,डॉ.कल्पेश पाटील, सागर आरोळे, हेमंत बागुल,महेश ढवळे , अभिजित निकाळजे,धनंजय कांबळे,विजय बिबवे,बाबासाहेब पोळके,संतोष पवार  आदी उपस्थित होते.