राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह- शांती मार्च, परिसंवाद, छायाचित्र प्रदर्शन,फिल्म शो, सुफी दरबारसह कार्यक्रमांची रेलचेल
झी टॉकीज वर झी महाराष्ट्र कुस्ती लीग २ नोव्हेंबरपासून …
कुस्ती हा महाराष्ट्रातील अस्सल मातीतला रांगडा खेळ. झी टॉकीजच्या विद्यमाने महाराष्ट्रातील मातीतल्या या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खास ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग‘चे आयोजन करण्यात आले आहे. या लीगचा थरार २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालवधीत पुण्याच्या बालेवाडीत रंगणार आहे. ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग‘ च्या निमित्ताने महाराष्ट्रातील नावाजलेल्या कुस्तीगिरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीगिरांशी लढताना बघण्याची पर्वणी झी टॉकीजच्या प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार आहे. या बहुचर्चित ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’ बरोबर सुरवातीपासूनच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज नावे जोडली जात आहेत .त्यातीलचं एक महत्वाचे नाव म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे.
नागराज मंजुळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून ते केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी आणि अभिनेतेही आहेत. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून संवेदनशीलतेची जाणीव करून देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे महाराष्ट्रातल्या खेळाबाबतही तितकेच सजग आहेत. पिस्तुल्या, फँड्री व सैराट यासारख्या चित्रपटातून आपले सामाजिक भान दाखवून देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’चा प्रोमो दिग्दर्शित करणार आहेत आणि मुख्य म्हणजे यात ते अभिनय सुद्धा करणार आहेत. स्वतः स्वतःला दिग्दर्शित करणे आणि ए क दिग्दर्शक आणि अभिनेता याना त्याने उत्कृष्ट काम करणे हे प्रत्येकाला शक्य नसते. मात्र सैराटच्या अफाट यशानंतर प्रेक्षकांच्या नागराज मंजुळे यांच्या कामाबद्दलच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत आणि नागराज यांचे नवीन काम पाहण्याची सर्वानांच इच्छा आहे. प्रेक्षकांची ही इच्छा ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग ’मुळे पूर्ण होणार आहे.
उत्कंठा हा कुस्ती या खेळाचा श्वास आहे. पैलवानांनी शड्डू ठोकल्यापासून चितपट करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाढणारी ही उत्कंठा ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’मुळेआता साऱ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे.नागराज मंजुळे ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’ चा हा थरार प्रोमोच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणार आहेत.
या प्रोमोबद्दल नागराज मंजुळे यांनी सांगितले की,” घरात बसून छोट्या पडद्यावर क्षणक्षणाला उत्कंठा वाढवणारा कुस्ती हा खेळ पाहण्याची मजा काही औरच असेल. ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’शी संलग्न होऊन त्याचा प्रोमो दिग्दर्शित करताना मला खरंच खूप आनंद होत आहे. माझ्या कामावर आजवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलेआहे आणि त्यांना हा प्रोमोसुद्धा आवडेल अशी आशा व्यक्त करतो ”
झी टॉकीज व झी युवाचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितलं. ’नागराज मंजुळे यांनी स्वतःला एक उत्तम दिग्दर्शक म्हणून सिद्ध केलं आहे. कुठल्याही एका पठडीत न अडकता, वेगवेगळ्या पद्धतीचे दिग्दर्शन करणे ही त्यांची खासियत आहे.‘झी महाराष्ट कुस्ती लीग‘चे प्रोमो दिग्दर्शित करणे हा त्यातलाच एक भाग आहे. नागराज यांनी‘झी महाराष्ट कुस्ती लीग‘ साठी योगदान देणे ही झी टॉकीज आणि प्रेक्षकांसाठी भाग्याची गोष्ट आहे.’
19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना, व्हेरॉक क्रिकेट अकादमी यांच्यात विजेतेपदासाठी लढत
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदु जिमखाना संघाने महाराष्ट्र क्रिकेट संघटना 1 संघाचा तर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने पुना क्लब संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत साहिल चुरीच्या अचुक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदु जिमखाना संघाने महाराष्ट्र क्रिकेट संघटना 1 संघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना साहिल चुरी, आदित्य लोंढे , सिध्देश विर व यश माने यांच्या लक्षवेधी गोलंदाजीपुढे महाराष्ट्र क्रिकेट संघटना 1संघ केवळ 35.5 षटकात सर्वबाद 119 धावांत गारद झाला. 119 धावांचे लक्ष अमेय भावे व सिध्देश विर यांनी केलेल्या अफलातून 122 चेंडूत 95 धावांच्या भागीदारीसह पीवायसी हिंदु जिमखाना संघाने केवळ 25.2 षटकात 1 गडी गमावत 120 धावा करून पुर्ण केले. अमेय भावेने नाबाद 64 तर सिध्देश विरने 40 धावा केल्या. 21 धावांत 5 गडी बाद करणारा साहिल चुरी सामनावीर ठरला.
उपांत्य फेरीच्या दुस-या लढतीत अॅलन रोड्रीग्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने पुना क्लब संघाचा 24 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. अतितटीच्या झालेल्या लढतीत शेवटपर्यंत लढा देत व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने विजय संपादन केला. पहिल्यांदा खेळताना सौरभ नवलेच्या अर्धशती खेळीच्या बळावर व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने 38 षटकात सर्वबाद 161धावा केल्या. अलान रोड्रीग्सने नाबाद 30 धावा करून सौरभला सुरेख साथ दिली. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चंद्रकांत सरोजच्या 51 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व अलान रोड्रीग्स, साईगणेश जीदाप व ओम भोसले यांच्या अचूक गोलंदाजीपुढे पुना क्लब संघाचा डाव केवळ 42.1 षटकात सर्वबाद 137 धावांत गारद झाला. नाबाद 30 धावा व 18 धावात 3 बळी घेणार अॅलन रोड्रीग्स सामनावीर ठरला.
पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे,दि.25 :जिल्हा प्रशासनातर्फे पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तहसीलदार सुषमा पाटील, यांनीही अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉल्बी लावून हायकोर्टाचा अवमान – ‘त्या’भाजपा नगरसेविकेचे पद रद्द करा -आ. शरद रणपिसे (व्हिडीओ)
पुणे-डॉल्बी लावून विक्षिप्त अंगविक्षेप ज्या नगरसेविकेचा पती विसर्जन मिरवणुकीत करत होता त्या प्रकरणी केवळ ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा पोलिसांनी आमच्या मागणीवरून दाखल केला वास्तविक पाहता हायकोर्टाच्या आदेशाचे पालन न करता तो धुड्कारून न्यायालयाचा अवमान केला आणि तो हि भाजपच्या नगरसेविकेच्या मंडळाने ..म्हणून आता त्या नगरसेविकेचे पद रद्द करणार काय ? असा सवाल रणपिसे यांनी पुढे उपस्थित केला . शिवाय पालकमंत्री यांनी डॉल्बी लावू नका असे आदेश देवूनही त्यांच्याच पक्षाच्या या नगरसेविकेने आणि तिच्या पतीच्या मंडळाने जुमानले नाही .हि बाब देखील भाजपने ध्यानी घ्यावी .
असल्या भ्याड हल्ल्यांनी कॉंग्रेस घाबरणार नाही -अरविंद शिंदे (व्हिडीओ)
पुणे- नगरसेवक अविनाश बागवे यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक म्हणजे भाजपची पोलिसी संगनमताने कॉंग्रेसचा कार्यकर्ता संपविण्याची कुटनीती असून असल्या ‘भ्याड हल्ल्यांना ‘ कॉंग्रेसचा कार्यकर्ता कधीही घाब्णार नाही तो आपले कार्य सुरूच ठेवेल .असे येथे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे . नेमके पहा आणि ऐका अरविंद शिंदे काय म्हणाले आहेत ….
पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून वर फसवाफसवी केली – मोहन जोशी
पुणे- कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्या वर खोटा गुन्हा दाखल करून वर फसवाफसवी केली असे सांगत भाजपच्या नेत्यांच्या प्रभावाखाली पोलीस अशी दुष्कृत्ये करीत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी आज पत्रकार परिषदेतून केला .
भाजपच्या नगरसेविकेच्या पतीने आपले गणेश मंडळ मार्ग सोडून अविनाश बागवेंच्या इमारती पुढे नेले आणि तिथे डीजे डॉल्बी लावून धिंगाणा घालून बागवेंच्या कार्यकर्त्यांना उचकावण्याचा प्रयत्न केला .हे बाहेर चालू असताना या वेळी बागवे स्वतः 3 पोलिसांसमवेत ऑफिसमध्येच होते. केवळ सत्तेच्या मस्तीपायी अविनाश बागवेंना त्रास देवून त्याद्वारे कॉंग्रेस पक्षाची बदनामी करण्याचे हे भाजपचे षड्यंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे .
पोलिसांनी सकाळी बागवेंना बोलवून नेले आणि आम्हाला सांगितले ,’ त्यांना आम्ही कोर्टात नेतो , आणि थेट लॉकअप मध्ये ठेवले. सकाळी अटक केल्यानंतर संध्याकाळी कोर्टात न्यायला हवे .पण तो नियम तोडून त्यांनी काल कोर्टात नेले नाही . आज नेले .आणि तिथे जामीन झाला . पोलिसांची हि कृती लोकशाहीला अत्यंत घातक अशी असून याबाबत कॉंग्रेस पक्ष गंभीर दखल घेईल असे ते म्हणाले …..
नेमके मोहन जोशी काय म्हणाले हे त्यांच्याच शब्दात ऐका …पहा …
कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांची जामिनावर मुक्तता ..
पुणे-आपल्या कार्यालयासमोर आलेल्या गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना मारहाण आणि गणेश मुर्तीची विटंबना केल्याप्रकरणी काल सकाळी पोलिसांनी अटक केलेल्या काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह त्यांच्या ६ कार्यकर्त्यांची आज न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली .बागवे यांच्या वतीने अॅड. विलास घाडगे पाटील यांनी काम पाहिले.
युवराज सुलतान अडसुळ (27, रा. राजीव गांधी सोसायटी, कासेवाडी, भवानी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडक पोलिसांनी अविनाश बागवे, यासेर बागवे, विवेक उर्फ बंटी बागवे, दयानंद अडागळे, जयवंत मोहिते, सुरज कांबळे, कुमार अडागळे, नितीन कसबे, बापु कसबे, गणेश जाधव, बागवे यांचे पीए अरूण गायकवाड, सुरेखा खंडाळे, विठ्ठल खोरात, परेश गुरव, अविनाश बागवे यांचे मेहुणे सुरज कांबळे आणि शिवाजी काळे (सर्व रा. कासेवाडी, भवानीपेठ) यांच्याविरूध्द भादंवि143,146,148,149,295,296,323,427,504, महाराष्ट्र कायदा कलम 37 (1)(3) सह कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना सोमवारी सकाळी अटक केली
रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संविधान बचाव, देश बचाव कार्यक्रमाचे आयोजन
पुणे-येत्या ३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संविधान बचाव, देश बचाव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री फौजिया खान यांनी दिली. यावेळी खासदार वंदना चव्हाण, विद्या चव्हाण, महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, वैशाली नागवडे आदी उपस्थित होते.
पुण्यात खान यांनी बैठक घेत तीन तारखेच्या कार्यक्रमाची आखणी केली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित असणार असल्याची माहिती खान यांनी दिली. त्या म्हणाल्या की, देशात सध्या असलेल्या स्थितीमुळे संविधान धोक्यात आले आहे. सरकारचे न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगावरही नियंत्रण आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आली असल्याने संविधान बचाव कार्यक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे त्या म्हणाल्या की, दिल्ली, मुंबई, नाशिक, औरंगाबादनंतर आम्ही पुण्यात हा कार्यक्रम घेत असून त्यानंतर औरंगबाद आणि कोकण विभागातही हा कार्यक्रम करणार आहोत. यावेळी त्यांनी सरकारच्या ईव्हीएम मशीन धोरणावरही टीका केली.
दरम्यान, देशाला भाजप पासून वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र यावे अस आवाहन करत एमआयएम हा पक्ष धर्मनिरपेक्ष असेल तर त्यांनी देखील आमच्यासोबत यावं अस आमंत्रण फौजिया खान यांनी दिले.
शांघायमध्ये झालेल्या आयडब्ल्यूईसी ११ व्या वार्षिक परिषदेत अल्पना किर्लोस्कर यांचा ‘आयडब्ल्यूईसी ॲवॉर्ड’ पुरस्काराने गौरव
पुणे-‘कियारा लाईफस्पेसेस’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अल्पना किर्लोस्कर यांना नुकतेच ‘आयडब्ल्यूईसी (इंटरनॅशनल वूमेन्स आंत्रप्रेन्युरियल चॅलेंज) ॲवॉर्ड’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चीनमध्ये शांघाय येथे गेल्या आठवड्यात ‘सीईआयबीएस’च्या परिसरात झालेल्या ‘आयडब्ल्यूईसी’च्या ११ व्या वार्षिक परिषदेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. भारतातून एकूण तीन महिलांना हा पुरस्कार मिळाला असून त्यापैकी अल्पना किर्लोस्कर यांना ‘कियारा लाईफस्पेसेस’ या त्यांच्या यशस्वी महिला संचलित उद्योगासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
‘आयडब्ल्यूईसी’ ही न्यूयॉर्कस्थित विना–नफा संघटना असून तिचे उद्दिष्ट्य यशस्वी व्यवसाय चालक महिलांचा परस्परांशी संपर्क साधून त्यांचे जागतिक जाळे विकसित करण्याचा आहे. यंदाच्या परिषदेत एकूण ३५० उद्योजिका उपस्थित होत्या. त्यांनी प्रमुख वक्त्यांच्या भाषणाचा लाभ घेतला, चीनमध्ये व्यवसायाच्या संधी या विषयावर तज्ज्ञांची चर्चा ऐकली आणि १८ देशांतील ४७ महिला उद्योजकांची भेट घेऊन त्यांना सन्मानित केले.
कियारा लाईफस्पेसेस ही रिअल इस्टेट कंपनी आहे, जी मध्यम उत्पन्न गटांना सुधारित सुविधा व पायाभूत सुविधांसह घरे पुरवण्यावर भर देते. ही कंपनी रचना सौंदर्यशास्त्र, दर्जा व बांधीलकी या तत्त्वांनी प्रेरित आहे.
या कंपनीचा पहिला गृहप्रकल्प लखनौमधील सुशांत गोल्फ सिटीमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी ‘कियारा रेसिडेन्सी’ नावाने राबवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युपी इन्व्हेस्टर्स समिटमध्ये उद्घाटन केलेल्या ६१ प्रकल्पांपैकी तो एक होता.
परिषदेत बोलताना अल्पना किर्लोस्कर यांनी व्यवसायात त्यांना सामना कराव्या लागलेल्या विविध आव्हानांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, की माझ्या प्रवासात आलेले सर्वांत मोठे आव्हान म्हणजे मी महिला आहे म्हणून म्हणून मला अलग ठेवले जाण्याची भावना. मला खूप कष्ट करावे लागले, स्वतःला सिद्ध करावे लागले आणि अखेर वयाच्या पन्नाशीत मला स्वतःचा रिअल इस्टेट प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळाली. या उद्योगात पुरुषांचे वर्चस्व आहे. एकप्रकारे एखाद्या हत्तीने खोली व्यापली आहे, पण कुणीच त्याबद्दल बोलू इच्छित नाही, हा अनुभव सर्व महिलांना येतो. पण त्यातूनच आपल्याला स्वतःच्या खंबीर, चिवट, बहुउद्दिष्ट्ये पूर्ण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते आणि समाजात आदर मिळवण्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्ट कौशल्य दाखवतो. हा पुरस्कार स्वीकारताना मी खरोखर विनम्र आहे. केवळ स्वतःसाठी नव्हे, तर पितृसत्ताक समाजात आपला ठसा उमटवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या सर्व महिलांतर्फे मी हा सन्मान स्वीकारत आहे. समारोपात मी विन्स्टन चर्चिल यांचे एक वाक्य उद्धृत करते. “यश हे अंतिम नसते आणि अपयश हे घातकही नसते. पुढे वाटचाल करण्याचे धाडस हेच अखेर महत्त्वाचे असते.”
कोथरूडनंतर कँन्टोमेंट विधानसभेच्या मोहऱ्यावर पोलिसी संक्रांत ?
पुणे- गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत गोंधळ घातल्याबद्दल आणि मारहाण केल्याबद्दलच नव्हे तर गणेशमूर्ती विटंबनाचाही आरोप ठेवून काल सकाळी कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना खडक पोलिसांनी अटक केली.आणि या बातमीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली …’आता मानकरांनंतर – बागवे …. काय ? असा सवाल उपस्थित करत अनेकांनी धसका घ्यायला सुरुवात केली आहे. माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाची अशी अवस्था होत असेल तर आम्हाला तर देशोधडीला लावतील असा सूर कॉंग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये उमटलेला आज दिसला .
अविनाश बागवेसारखा नगरसेवक गणेश मूर्तीची विटंबना करेल यावर कोणीही विश्वास ठेवताना दिसत तर नाहीच आणि त्यांच्या स्वभावाची माहिती असणारे, ते कधी गुंडा गर्दी करतील, यावरही विश्वास ठेवायला तयार नाहीत . यातील जे काही असेल ते ,खरे खोटे फार काळ लपून मात्र निश्चित रहाणार नाही .मात्र या घटनेने कोथरूड विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या मानकर या मुख्य मोहऱ्यानंतर कँन्टोमेंट विधान सभेच्या कॉंग्रेस च्या मुख्य मोहऱ्याला दणका दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.
विशेष म्हणजे हा प्रकार झाला तो अविनाश बागवे यांच्या कार्यालयासमोरच… भाजपच्या नगरसेविकेचा थेट संबध असलेल्या मंडळाने या ठिकाणी आपली मिरवणूक नेली .आणि डीजेडॉल्बीला, उच्च न्यायालयाने बंदी घातलेली असताना , सत्ताधारी भाजपचा देखील विरोध असताना ,पालकमंत्र्यांचा ही विरोध असताना येथे साऊंडच्या मोठ्ठ्या आवाजात ..पाटील आला ..पाटील आला … या गाण्यावर बराच काळ येथे कार्यालयात उपस्थित असलेल्या अविनाश बागवे यांना टस्सल देण्याचा प्रयत्न केला .हे स्पष्ट दिसते आहे .अविनाश बागवेंचे पाटील हे राजकीय विरोधक आहेत. पण अशा प्रकारे गणपती विसर्जन मिरवणुकीचा उपयोग राजकीय वैमनस्यासाठी करणे हे रुचणारे नाही .
माजी गृहराज्यमंत्री असलेले ,पुणे शहर काॅंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे अविनाश हे चिंरजीव आहेत. विसर्जन मिरवणुकीत काल सायंकाळी कासेवाडी येथे असलेल्या बागवे यांच्या राजीव गांधी पतसंस्थेसमोरच हा प्रकार घडला.
मिरवणुकीदरम्यान मंडळाचा गणपती विसर्जनासाठी जात होता. मिरवणुकीतील ट्रॅक्टरचा चालक आणि साऊंड सिस्टिमचा मालक यांना मारहाण करण्याच्या सूचना आणि चिथावणी अविनाश बागवे यांनी दिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. तेव्हा बागवे यांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरचालक आणि अन्य एकाला मारहाण केली. साऊंड सिस्टिमची यात मोडतोड झाली. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण झाला. चप्पल, शूज, दगड हे मिरवणुकीच्या दिशेने फेकले गेले आणि गणेशमूर्तीची विटंबना केली गेल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.असे पोलिसांचे म्हणणे आहे .
अविनाश बागवे यांच्यासह यासीर बागवे, बंटी बागवे, दयानंद अडागळे, जयवंत मोहिते, सूरज कांबळे, कुमार अडागळे, नितीन कसबे, बापू कसबे, गणेश जाधव, अरूण गायकवाड, सुरेखा खंडागळे, विठ्ठल थोरात, परेश गुरव, सूरज कांबळे, शिवाजी कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
यातील यासिर तर आणि बंटी दोघे बागवेंच्या नातेसंबधातील आहेत.इतर बागवेंच्या कार्यालयात कायम दिसणारे कार्यकर्ते आहेत .
गेल्या आठवड्यातच रमेश बागवे यांचे कट्टर समर्थक असलेले महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते ,नगरसेवक अरविंद शिंदे यांनी महापालिकेच्या मुख्य सभेत … दीपक मानकरांना मोक्का लावल्याबद्दल शासनाच्या भूमिकेवर संशय घेणारे जाहीर वक्तव्य केले होते . 17 पैकी 16 गुन्ह्यात जी व्यक्ती निर्दोष सुटलेली आहे .अशा व्यक्तीवर मोका कसा लागतो…? असा प्रश्न उपस्थित करत राजकीय विरोधक अशा मार्गाने संपविणे हा प्रकार लोकशाहीला घटक असल्याचे म्हटले होते.
दीपक मानकर आणि रमेश बागवे हि दोन्ही नावे पुण्याच्या राजकारणातील भारदस्त नावे मानली जातात .यातील मानकर हे राष्ट्रवादीत तर बागवे हे कॉंग्रेस मध्ये आहेत .बागवे मातंग समाजाचे आणि मानकर मराठा समाजाचे नेते म्हणूनही परिचित आहेत .तत्कालीन खासदार सुरेश कलमाडींचे हे दोघे कधी काळी दोन हात होते .तुरुंगात खितपत पडलेल्या राष्ट्रवादी चे नेते छगन भुजबळ यांची एकीकडे जामिनावर सुटका झाली आणि दुसरीकडे काही दिवसातच पुण्यातील मानकर कारागृहात गेले .दोन्ही घटनांचा प्रत्यक्षात संबध नसला तरी ते दोघे हि एकाच पक्षाचे एवढे तरी साम्य आहे.
सध्या महापालिकेत ,राज्यात ,आणि केंद्रात भाजपची एक हाथी सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर हि सारी चर्चा घडते आहे . आणि मानकरांनंतर आता बागवे काय ? असा सवाल उपस्थित केला जातोय .
आर्यन किर्तने, शार्दुल खवले, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद
पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित 8 व 10 वर्षाखालील गटातील आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज2018 स्पर्धेच्या चौथ्या मालिकेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले व प्रिशा शिंदे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद संपादन केले.
महाराष्ट्र मंडळ कटारीया हायस्कुल, मुकुंद नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 8 वर्षाखालील मिश्र गटात दुस-या मानांकीत आर्यन किर्तनेने अव्वल मानांकीत रित्सा कोंदकरचा 7-1 असा एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत आर्यन किर्तनेने तिस-या मानांकीत सुजय देशमुखचा 6-2 असा पराभव केला. आठ वर्षीय आर्यन बिशप्स स्कुल कॅम्प येथे दुस-या इयत्तेत शिकत असून, पीवायसी हिंदु जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
10 वर्षाखालील मुलांच्या गटात संघर्षपुर्ण लढतीत पाचव्या मानांकीत शार्दुल खवलेने अव्वल मानांकीत सक्षम भन्साळीचा 7-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीच्या सामन्यात शार्दुलने आठव्या मानांकीत देवराज मंदाडेचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत सहज विजयासह अंतिम फेरी गाठली. शार्दुल वॉलनट स्कुल येथे चौथ्या इयत्तेत शिकत असून, डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक मदन गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील हे पहिले विजेतेपद आहे.
10 वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकीत प्रिशा शिंदेने दुस-या मानांकीत मृणाल शेळकेचा 7-1 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीच्या लढतीत प्रिशाने रित्सा कोंदकरचा 6-2 असा पराभव केला. नऊ वर्षीय प्रिशा संस्कृती इंग्रजी माध्यम शाळा येथे चौथ्या इयत्तेत शिकत असून, सोलारीस क्लब येथे प्रशिक्षक विरेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तीचे या गटातील या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र मंडळ लॉन टेनिस अकादमीचे संचालक विक्रम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक धरणीधर मिश्रा व नितिन किर्तने उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल –
8 वर्षाखालील मिश्र गट – उपांत्य फेरी
रित्सा कोंदकर(1) वि.वि देवराज मंदाडे 6-3
आर्यन किर्तने(2) वि.वि सुजय देशमुख(3)6-2
अंतिम फेरी- आर्यन किर्तने(2) वि.वि रित्सा कोंदकर(1) 7-1
10 वर्षाखालील मुले- उपांत्य फेरी
सक्षम भन्साळी(1) वि.वि अर्चित धुत(3) 6-2
शार्दुल खवले(5) वि.वि देवराज मंदाडे(8) 6-0
अंतिम फेरी- शार्दुल खवले(5) वि.वि सक्षम भन्साळी(1) 7-4
10 वर्षाखालील मुली – उपांत्य फेरी
प्रिशा शिंदे(1) वि.वि रित्सा कोंदकर 6-2
मृणाल शेळके(2) वि.वि काव्या देशमुख(3)6-3
अंतिम फेरी – प्रिशा शिंदे(1) वि.वि मृणाल शेळके(2)7-1
लष्कर भागात विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न
पुणे- लष्कर भागात विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली . भोपळे चौक येथे मानाचा कामाठीपुरा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापासून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ गणेशभक्त राजू सांकला यांच्याहस्ते प्रारंभ झाला . यावेळी पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या उपाध्यक्ष प्रियांका श्रीगिरी ,कामाठीपुरा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल केदारी , महेंद्र भोज , देवेंद्र कुऱ्हे , लष्कर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड , लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले , विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त इसाक जाफर , पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समितीचे सदस्य बापूसाहेब गानला , विकास भांबुरे , शाम सहानी , वाहिद बियाबानी, सुनिल शिंदे , बलबीरसिंग कलसीं , नगरसेवक दिलीप गिरमकर , संदीप भोसले , हसन कुरेशी आदी मान्यवर व गणेश भक्त उपस्थित होते .
या विसर्जन मिरवणुकीत हिंद तरुण मंडळाने शिवकालीन मर्दानी खेळ , शिवकालीन संगीत नृत्य , जागरण गोंधळ व गणेश स्तुती सादर केले . मर्दानी खेळ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती . भीमपुरा गल्ली मधील यंग बॉयज क्लबच्या ढोल ताशा पथकाने सर्वांची माने जिंकली . तसेच कामाठीपुरा मंडळाचे तालवाद्य पथकाने भोपळे चौकात विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांना ठेका धरायला लावले . नवयुग सुर्वणकार मंडळाने आकर्षक फुलांची सजावट देखावा केला होता . श्रीमंत साईनाथ तरुण मंडळ व श्री शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या मंडळाने संगीताच्या तालावर युवक नृत्य करत होती . त्याचप्रमाणे कुंभारबावडी तरुण मंडळ , सुयोग तरुण मंडळ , उत्सव संवर्धक मंडळ , श्री शिव तरुण मंडळ , नवमहाराष्ट्र युवक मंडळ , नवयुग तरुण मंडळ , श्री राजेश्वर तरुण मंडळ , कुंभारबावडी स्थायिक सेवा मंडळ , धोबीघाट मित्र मंडळ , श्री शिवाजी मित्र मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती .
कुरेशी मस्जिद येथे विघ्नहर्ता न्यासच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात विसर्जन मिरवणुकीचे परिक्षण शाम सहानी , इसाक जाफर , वाहिद बियाबानी , सुनिल शिंदे , प्रकाश अरगडे , अनिता जंगम व मोना राठोड यांनी केले . भीमज्योत मंडळाने सोलापूर बाजारजवळील कालव्यावर काम करणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जीवरक्षकांना अल्पोपहार व्यवस्था केली होती . हि व्यवस्था भीमज्योत मंडळाचे अध्यक्ष नितीन आडसुळे , उपाध्यक्ष आनंद शितोळे , मनोहर परदेशी , श्रेयस काळे , नरेंद्र चव्हाण , दीपक अरगडे , मंगल वाल्मिकी व देविदास कापडिया या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले . सेंटर स्ट्रीटवरील विसर्जन मार्गावर जमेतुल कुरेशी वर्किंग कमिटीच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे स्वागत कमिटीचे अध्यक्ष हसन कुरेशी यांनी शाल व पुष्पगुछ देउन केले . तसेच , रिपब्लिकन सोशल पार्टीचे अध्यक्ष विशाल रेड्डी यांनी पाण्याच्या बाटल्याचे वाटप केले . अखिल नेपियर रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गुलाल विरहित विसर्जन मिरवणूक काढली . पूना कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ८० युवक युवतींनी विसर्जन मिरवणुकीचे व्यवस्थित पार पाडण्याकरिता पोलिसांना सहकार्य करून विशेष परिश्रम घेतले.
डवायर लेनमधील अशोक चक्र मंडळाने विसर्जन मिरवणुकीचा खर्च केरळ पूरग्रस्तांना मदत करून जागेवर विसर्जन केले . अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रघुवीर व्हावळ व विनय भगत यांनी दिली . तसेच श्री दत्त समाज तरुण मंडळ व श्रीकृष्ण तरुण मंडळ, शिवराम तरुण मंडळाने जाग्यावर विसर्जन केले .
प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रस्ताव सादर करा- जिल्हाधिकारी राम
पुणे- प्रत्येक माणसाला घर मिळावे, यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली आहे. हा शासनाचा महत्त्वांकाक्षी कार्यक्रम असून ही योजना यशस्वी करण्यासाठी ज्यांना स्वत:ची जागा नाही त्यांना शासकीय जमीन उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. संबंधित गट विकास अधिकारी,तहसिलदार यांनी त्याबाबतचे प्रस्ताव येत्या आठ दिवसांत सादर करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंभावी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस येत्या 3 आक्टोबरपासून शासनाच्या काही महत्त्वाकांक्षी योजनांचा जिल्हास्तरावर आढावा घेणार आहेत. यासाठी जिल्हा आणि विभागनिहाय समित्या गठीत करण्यात येणार असून अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण), सामाजिक न्याय विभागाचे सचिव, ग्रामविकासचे सचिव आणि मेडाचे महासंचालक हे पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरचा आढावा घेतील. या समित्या जिल्ह्यातील प्रत्येक योजनेच्या सद्यस्थितीत असलेल्या प्रगतीची आकडेवारीनिहाय माहिती संकलित करुन पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत योजनांची फलनिष्पत्ती साध्य करण्यासाठी पाठपुरावा करेल. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. राम यांनी आढावा बैठक घेतली.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ही ग्रामीण भागातील गरीब माणसाला घरकूल मिळवून देण्यासाठी सुवर्णसंधी असून संबंधित गटविकास अधिकारी, तहसिलदार यांनी समन्वयाने काम करुन विहीत नमुन्यातील प्रस्ताव मोजणीसह इतर सर्व बाबींची पूर्तता करुन पाठवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. राम यांनी दिले. प्रांताधिका-यांनी येत्या तीन दिवसात या संदर्भात बैठक घेऊन त्याचा पाठपुरावा करावा,अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) राबविण्याबाबत नगरपालिकांच्या मुख्याधिका-यांनी सकारात्मक भूमिका घेऊन कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.
जलयुक्त शिवार, महानरेगा, धडक विहीर योजना, शेततळे आदींबाबत झालेली कार्यवाही, मुख्यमंत्री ग्रामीण पेय जलयोजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा विकास प्रकल्पाचीही बैठकीत माहिती घेण्यात आली. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी जिल्ह्याचे उद्दिष्ट, पूर्ण झालेले काम, प्रगती पथावर असलेले काम, दलित वस्ती सुधारयोजना, ठक्करबाप्पा योजना, प्रधानमंत्रीकृषी सिंचन योजना आदींचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने माहिती सादर केली. सातारा जिल्ह्यात सरकारी पंच उपलब्ध व्हावेत यासाठी नियमबध्द कार्यक्रम तयार करण्यात आला होता. तसाच कार्यक्रम पुणे जिल्ह्यात करावा, अशी सूचना त्यांनी केली. न्यायालयात पंच ‘होस्टाईल’ झाल्यामुळे पुरावा टिकत नाही आणि गुन्हे साबीतीचे प्रमाण कमी होते,त्यासाठी सरकारी पंच असण्यावर त्यांनी भर दिला. शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनी सुरक्षा समिती, महिला सुरक्षा समिती स्थापन करण्यात आल्या असून अत्याचारासंबंधीच्या तक्रारी संबंधित पोलीस स्थानकाकडे पाठवाव्यात असे आवाहनही त्यांनी केले. वाहतूक व त्यासंदर्भातील समस्या सोडविण्याची गरज असून नगरपालिकांनी रस्त्यावरील अतिक्रमणे, पार्कींगची सुविधा, रस्त्यावरील पांढरे पट्टे, आवश्यक तेथे सीसीटीव्ही कॅमेरे आदींची व्यवस्था करावी, असे ते म्हणाले. प्रत्येक गावाचा वाहतूक आराखडा असतो,मात्र त्याची योग्य पध्दतीने अंमलबजावणी झाली तर ते सर्वांच्याच हिताचे असते, असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही बैठकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना केल्या. बैठकीस गटविकास अधिकारी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
मिरवणूक संपली ..चलो चले अपने घर … आयुक्तांनी केले पोलिसांच्या कामाचे कौतुक
पुणे : शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावरून शास्त्री रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर बहुतांश मार्गांवरील वाहतूक सुरळीत झाली आहे. मिरवणुकीमुळे बंद असलेले शहरातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत.
मिरवणूक संपताच पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश यांनी अलका चौकात येवून ,’चलो चले अपने घर …म्हणत पोलिसांच्या कामगिरीचे आज दुपारी येथे कौतुक केले. दरम्यान मिरवणुकीमध्ये चोरी करणारी मालेगावच्या एका टोळीसही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 75 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि इतर साऊंड सिस्टिमवर बंदी घालण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रशासनामध्ये तणाव निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी नियोजन केले आणि त्याची अचूक अंमलबजावणी केल्यामुळे मिरवणुकीत त्याचा परिणाम दिसून आला, असे डॉ. व्यंकटेश यांनी येथे सांगितले.
मानाच्या ५ गणपतींचा अपवाद वगळता अन्य मंडळे इतर वर्षांच्या तुलनेत लवकर मिरवणुकीत दाखल करण्यात पोलिसांना यश आले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी विविध मंडळांवर कारवाई करून 33 उपकरणे जप्त केली आहेत; तर विविध कलमांखाली 75 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.



