पुणे-‘कियारा लाईफस्पेसेस’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अल्पना किर्लोस्कर यांना नुकतेच ‘आयडब्ल्यूईसी (इंटरनॅशनल वूमेन्स आंत्रप्रेन्युरियल चॅलेंज) ॲवॉर्ड’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. चीनमध्ये शांघाय येथे गेल्या आठवड्यात ‘सीईआयबीएस’च्या परिसरात झालेल्या ‘आयडब्ल्यूईसी’च्या ११ व्या वार्षिक परिषदेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. भारतातून एकूण तीन महिलांना हा पुरस्कार मिळाला असून त्यापैकी अल्पना किर्लोस्कर यांना ‘कियारा लाईफस्पेसेस’ या त्यांच्या यशस्वी महिला संचलित उद्योगासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
‘आयडब्ल्यूईसी’ ही न्यूयॉर्कस्थित विना–नफा संघटना असून तिचे उद्दिष्ट्य यशस्वी व्यवसाय चालक महिलांचा परस्परांशी संपर्क साधून त्यांचे जागतिक जाळे विकसित करण्याचा आहे. यंदाच्या परिषदेत एकूण ३५० उद्योजिका उपस्थित होत्या. त्यांनी प्रमुख वक्त्यांच्या भाषणाचा लाभ घेतला, चीनमध्ये व्यवसायाच्या संधी या विषयावर तज्ज्ञांची चर्चा ऐकली आणि १८ देशांतील ४७ महिला उद्योजकांची भेट घेऊन त्यांना सन्मानित केले.
कियारा लाईफस्पेसेस ही रिअल इस्टेट कंपनी आहे, जी मध्यम उत्पन्न गटांना सुधारित सुविधा व पायाभूत सुविधांसह घरे पुरवण्यावर भर देते. ही कंपनी रचना सौंदर्यशास्त्र, दर्जा व बांधीलकी या तत्त्वांनी प्रेरित आहे.
या कंपनीचा पहिला गृहप्रकल्प लखनौमधील सुशांत गोल्फ सिटीमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी ‘कियारा रेसिडेन्सी’ नावाने राबवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युपी इन्व्हेस्टर्स समिटमध्ये उद्घाटन केलेल्या ६१ प्रकल्पांपैकी तो एक होता.
परिषदेत बोलताना अल्पना किर्लोस्कर यांनी व्यवसायात त्यांना सामना कराव्या लागलेल्या विविध आव्हानांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, की माझ्या प्रवासात आलेले सर्वांत मोठे आव्हान म्हणजे मी महिला आहे म्हणून म्हणून मला अलग ठेवले जाण्याची भावना. मला खूप कष्ट करावे लागले, स्वतःला सिद्ध करावे लागले आणि अखेर वयाच्या पन्नाशीत मला स्वतःचा रिअल इस्टेट प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळाली. या उद्योगात पुरुषांचे वर्चस्व आहे. एकप्रकारे एखाद्या हत्तीने खोली व्यापली आहे, पण कुणीच त्याबद्दल बोलू इच्छित नाही, हा अनुभव सर्व महिलांना येतो. पण त्यातूनच आपल्याला स्वतःच्या खंबीर, चिवट, बहुउद्दिष्ट्ये पूर्ण करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते आणि समाजात आदर मिळवण्यासाठी आपण प्रत्येक गोष्टीत सर्वोत्कृष्ट कौशल्य दाखवतो. हा पुरस्कार स्वीकारताना मी खरोखर विनम्र आहे. केवळ स्वतःसाठी नव्हे, तर पितृसत्ताक समाजात आपला ठसा उमटवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या सर्व महिलांतर्फे मी हा सन्मान स्वीकारत आहे. समारोपात मी विन्स्टन चर्चिल यांचे एक वाक्य उद्धृत करते. “यश हे अंतिम नसते आणि अपयश हे घातकही नसते. पुढे वाटचाल करण्याचे धाडस हेच अखेर महत्त्वाचे असते.”