२०२१ प्रमाणे विशेष मदत पॅकेजची मागणी; पूरग्रस्त मूर्तिकारांना तातडीने दिलासा देण्याची शासनाकडे मागणी
मुंबई | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अतिवृष्टी, पाताळगंगा नदीला आलेला पूर आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गणेशमूर्ती उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या माजी उपसभापती आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्य शासनाकडे तातडीने विशेष मदत पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मकरंद पाटील तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवून, २०२१ मधील पूरपरिस्थितीप्रमाणेच यंदाही विशेष बाब म्हणून नुकसानग्रस्त मूर्तिकारांना आर्थिक मदत व पुनर्वसन पॅकेज देण्याची मागणी केली आहे.
पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, देशभरात गणेशमूर्ती निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेणमधील शेकडो कार्यशाळांमध्ये पाच ते सहा फूट पाणी शिरल्याने तयार व अर्धवट तयार गणेशमूर्ती, साचे, कच्चा माल, यंत्रसामग्री आणि इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना हजारो मूर्तिकार, कारागीर आणि कामगारांच्या उपजीविकेवर संकट कोसळले आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी सर्व बाधित कार्यशाळांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची, उद्योग विभागामार्फत कमी व्याजदराचे कर्ज व विशेष अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना व गणेशमूर्ती कार्यशाळांना एसएमएस, मोबाईल अलर्ट, सायरन आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून वेळेत पूर्वसूचना देण्यासाठी प्रभावी यंत्रणा विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
याशिवाय जलसंपदा, मदत व पुनर्वसन, महसूल आणि उद्योग विभाग यांच्या समन्वयातून पूरप्रवण भागातील गणेशमूर्ती उद्योगासाठी कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना आणि कृती आराखडा तयार करण्याचीही त्यांनी शासनाकडे मागणी केली.
पेणचा गणेशमूर्ती उद्योग हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार असल्याने शासनाने या विषयात तातडीने हस्तक्षेप करून नुकसानग्रस्त मूर्तिकारांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

