Home Blog Page 1108

लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

पुणे, दि. ५: जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ८ हजार ३८२ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रकिया करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवळे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरवले आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ११ हजार ८९८ बॅलेट युनिट, ११ हजार ८९८ कंट्रोल युनिट आणि १२ हजार ७४९ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.

सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या १४१ टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १५२ टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूममध्ये आणि पुणे लोकसभा मतदारसंघासाठीची यंत्रे भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघात देखील मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे डॉ.दिवसे यांनी सांगितले.

सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे योगेश बाबर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे गणेश नलावडे, भारतीय जनता पार्टीचे राजाभाऊ शेडगे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अशोक कांबळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रमेश सकट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित गव्हाणे, शिवसेनेचे राजू गवळी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसचे 5 न्याय, 25 गॅरंटीचे न्यायपत्र जाहीर:400 रुपये मजुरी, गरीब महिलांना वार्षिक 1 लाख, MSP कायदा आणि जातनिहाय जनगणनेचे आश्वासन

नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी 48 पानी जाहीरनामा प्रसिद्ध केला. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात सोनिया, राहुल, खरगे आणि घोषणापत्र समितीचे अध्यक्ष पी. चिदंबरम यांनी 5 न्याय आणि 25 गॅरंटींची घोषणा केली.

पक्षाच्या जाहीरनाम्यात मजुरी वाढवून दररोज 400 रुपये करणे, गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देणे, एमएसपीसाठी कायदा करणे आणि जात जनगणना करणे यांचा उल्लेख आहे.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात तरुण, महिला, मजूर आणि शेतकरी यावर लक्ष केंद्रित केले आहे. या सर्व विभागांसाठी विविध प्रकारच्या योजनांचे आश्वासन देण्यात आले आहे.

आपला जाहीरनामा वर्क, वेल्थ आणि वेलफेअर यावर आधारित असल्याचे पक्षाने म्हटले आहे. येथे वर्क म्हणजे रोजगार, वेल्थ म्हणजे उत्पन्न आणि वेलफेअर म्हणजे सरकारी योजनांचा लाभ देणे आहे.

काँग्रेस पक्षाच्या आणखी 4 मोठ्या घोषणा…

  1. वन नेशन वन इलेक्शनला विरोध. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेळेवरच होतील.
  2. मतदान ईव्हीएमद्वारे केले जाईल, परंतु व्हीव्हीपीएटी स्लिप जुळवली जाईल.
  3. 10 व्या शेड्युलमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन. याअंतर्गत पक्षांतर झाल्यावर विधानसभा किंवा संसदेचे सदस्यत्व आपोआप रद्द होईल.
  4. पोलिस आणि केंद्रीय यंत्रणा कायद्यानुसार काटेकोरपणे काम करतील. प्रत्येक प्रकरण संसद किंवा राज्य विधानमंडळांच्या देखरेखीखाली आणले जाईल.

राहुल गांधी म्हणाले- ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. एकीकडे एनडीए आणि पंतप्रधान मोदी आहेत जे संविधान आणि लोकशाहीवर हल्ला करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला संविधान आणि लोकशाहीचे रक्षण करणारी इंडिया आघाडी आहे.

काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात ज्येष्ठांना रेल्वेत सवलत देण्याचे आश्वासन दिले आहे. कोरोनानंतर केंद्र सरकारने ते जवळपास रद्द केले आहे.

संपूर्ण देशासाठी 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची योजना (राजस्थानमध्ये राहुल गांधींनी 50 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार जाहीर केले होते, तरीही त्यानंतर तिथे काँग्रेसचा पराभव झाला). आरोग्यासाठी एकूण बजेटच्या 4 टक्के, हे 2028-29 पर्यंत शक्य होईल.

पोलीस, तपास आणि गुप्तचर यंत्रणा कायद्यानुसार काटेकोरपणे काम करतील याची खात्री करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. ते सध्या वापरत असलेल्या बेलगाम शक्तींना कमी केले जाईल. कोणतेही प्रकरण असेल, त्यांना संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळांच्या देखरेखीखाली आणले जाईल.

पक्षांतर (ज्या मूळ पक्षातून आमदार किंवा खासदार निवडून आले होते ते वगळता) विधानसभा किंवा संसदेच्या सदस्यत्वापासून आपोआप अपात्रत करण्यासाठी काँग्रेस संविधानाच्या दहाव्या अनुसूचीमध्ये सुधारणा करेल.

काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा विश्वास पुनर्संचयित करण्याचे आश्वासन दिले आहे. EVM ची कार्यक्षमता आणि बॅलेट पेपरची पारदर्शकता यांची सांगड घालण्यासाठी काँग्रेस निवडणूक कायद्यात सुधारणा करेल. मतदान EVM द्वारे होईल परंतु मतदार VVPAT युनिटमध्ये मशीनद्वारे तयार केलेल्या मतदान स्लिप ठेवू आणि जमा करू शकतील. इलेक्ट्रॉनिक मतांची संख्या VVPAT स्लिप टॅलीशी जुळवली जाईल.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 10 घोषणा

  1. काँग्रेस देशव्यापी आर्थिक-सामाजिक जात जनगणना करणार आहे. या माध्यमातून काँग्रेस जाती, पोटजाती आणि त्यांची आर्थिक-सामाजिक स्थिती जाणून घेईल. काँग्रेस कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व जाती आणि समुदायाच्या लोकांसाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) 10% आरक्षण लागू करेल.
  2. काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि गरीब सामान्य प्रवर्गासाठी आरक्षणावरील 50% मर्यादा काढून टाकेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असलेली सर्व रिक्त पदे काँग्रेस 1 वर्षाच्या आत भरेल.
  3. ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांसाठी केंद्र सरकारचे पेन्शनचे योगदान दरमहा केवळ 200-500 रुपये आहे. काँग्रेस पेन्शनची ही रक्कम दरमहा किमान 1,000 रुपये वाढवणार आहे.
  4. काँग्रेस 2025 पासून केंद्र सरकारच्या अर्ध्या (50 टक्के) नोकऱ्या महिलांसाठी राखीव ठेवणार आहे. न्यायाधीश, सरकारचे सचिव, उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी, कायदा अधिकारी आणि मंडळ संचालक यासारख्या वरिष्ठ पदांवर अधिकाधिक महिलांची नियुक्ती केली जाईल याची काँग्रेस खात्री करेल.
  5. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीला काँग्रेस कायदेशीर गॅरंटी देईल.
  6. कृषी खर्च आणि किंमत आयोग (CACP) ही एक वैधानिक संस्था बनवली जाईल.
  7. काँग्रेस जनतेला भीतीपासून मुक्त करण्याचे वचन देते.
  8. प्रसारमाध्यमांच्या पूर्ण स्वातंत्र्यासह भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.
  9. काँग्रेस मानहानीच्या गुन्ह्याला गुन्हेगार ठरवण्याचे आणि कायद्याने, नागरी नुकसानीद्वारे त्वरित उपाय देण्याचे आश्वासन देते.
  10. काँग्रेसने इंटरनेटचे अनियंत्रित आणि अंधाधुंद निलंबन समाप्त करण्याचे आश्वासन दिले आहे.

‘स्वामी दरबार’ १० एप्रिलपासून भक्तांच्या भेटीला

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा ‘ दरबार ‘ पुढील आठवड्यापासून भक्तांच्या भेटीला येत आहे. गीत, संगीत, नृत्य, नाट्य आणि नामस्मरण असे या आगळ्या अध्यात्मिक रंगप्रयोगाचे स्वरूप असून बुधवार, १० एप्रिल रोजी म्हणजेच स्वामी प्रकट दिनी शिवाजी मंदिर येथे रात्री ८ वाजता या दरबाराचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.

ऑल सेट या संस्थेची निर्मिती असलेला हा दरबार स्वामीराज प्रकाशन यांनी आयोजित केला आहे. या दरबाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रयोगाला काही नामवंत सेलिब्रिटी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांचे स्वामी कृपानुभव सांगणार आहेत. शुभारंभ प्रयोगाला अनेक चित्रपट, मालिकांमध्ये ‘ स्वामींची ‘ भूमिका साकारणारे अशोक कुलकर्णी आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री दिप्ती भागवत या दरबारात निरूपण सुसंवादकाची भूमिका साकारणार आहेत.

सागर देशपांडे संकल्पित – दिग्दर्शित या कार्यक्रमासाठी खास गीत लेखन श्रावण बाळा यांनी केले असून शशिकांत मुंबरे यांनी स्वरसाज दिला आहे. पद्मश्री सुरेश वाडकर आणि साधना सरगम हे गायक असून  नाट्य दिग्दर्शन, नेपथ्य सुनील देवळेकर यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन सचिन गजमल यांचे असून नृत्य – नाट्य कलाकारांसह तरुण रंगकर्मी मयुरेश कोटकर हे स्वामींची भूमिका साकारणार आहे रजनी आणि पूजा राणे निर्मात्या आहेत.

हा दरबार सर्व स्वामी भक्तांसाठी अध्यात्मिक पर्वणी असून सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे.

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई- गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु

मुंबई, दि. ५ : मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी 50 हजार अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील 5 प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत.

या सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असून गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य असून यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.

अनुप जलोटा यांनी इसरत टोनी आणि प्रतीक गांधी यांचे नवीन सिंगल “डेझर्ट सोल” लाँच केले

गूढ बल्लाड डेझर्ट सोलने प्रेक्षकांना मोहित करणारी कथा “डेझर्ट सोल” लाँच केली ज्यात इसरत टोनी आणि प्रतीक गांधी अभिनीत
मुंबई– डेझर्ट सोलच्या ज्यामध्ये इसरत टोनी आणि प्रतीक गांधी या डायनॅमिक जोडीचा समावेश असलेल्या गाण्याच्या लाँच इव्हेंटमध्ये पद्मश्री अनुप जलोटा यांच्यासह नामवंत सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

इसरत टोनी, डेझर्ट सोलच्या गूढ गाण्यांमागील बहु-प्रतिभावान शक्ती, तिची समृद्ध कलात्मक पार्श्वभूमी समोर आणते. इसरत टोनीने बांगलादेश चित्रपट उद्योगात एक अभिनेता आणि निर्माता म्हणून महत्त्वपूर्ण ठसा उमटवला आहे, तिच्या उत्कृष्ट योगदानासाठी नऊ राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. आता, ITFAM (Israt Tonni Films and Music) च्या बॅनरखाली डेझर्ट सोल लाँच करून, तिच्या कलात्मक प्रयत्नांद्वारे प्रेम आणि सकारात्मकता पसरवण्याचे तिचे उद्दिष्ट आहे.

डेझर्ट सोलच्या रिलीझवर बोलताना इसरत टोनीने म्हटले आहे कि की या गाण्याला माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे कारण ते माझ्या संगीताची आवड आणि कथाकथनाच्या प्रेमाची जोड देते. डेझर्ट सोलद्वारे, मी श्रोत्यांना जादूच्या जगात नेण्याची आणि त्यांच्या आत्म्यामध्ये खोलवर प्रतिध्वनी करणाऱ्या भावना जागृत करण्याची आशा करतो.

संगीताच्या प्रायोगिक दृष्टिकोनासाठी ओळखले जाणारे दूरदर्शी संगीतकार प्रतीक गांधी यांनी डेझर्ट सोलमध्ये असुरक्षितता आणि सशक्तीकरण यांचे उत्तम मिश्रण आणले आहे. राजस्थानी लोकसंस्कृतीत रुजलेल्या वैविध्यपूर्ण संगीतमय पार्श्वभूमीसह, प्रतीकने त्याच्या भावनिक भारदस्त रचनांसाठी प्रशंसा मिळवली आहे. मैं रोइयान आणि इश्क हो जायेगा सारख्या हिट गाण्यांचा त्याचा ट्रॅक रेकॉर्ड संगीत उद्योगातील एक जबरदस्त शक्ती म्हणून त्याचे स्थान मजबूत करतो.

गाण्याची लिंक:

वीज दरवाढ महाविकास आघाडीनेच करून ठेवलेली -अन आता तेच आंदोलन करताहेत: भाजपाच्या पाठकांचा आरोप

भाजपा प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांची टीका

मुंबई-शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना महावितरणवर मोठा आर्थिक बोजा आल्यामुळे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार राज्यात वीज दरवाढ लागू झाली. महावितरणचा वाढीव खर्च आणि त्यामुळे झालेली वीजदरवाढ याला सर्वस्वी महाविकास आघाडीचे सरकार जबाबदार असून सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आघाडीच्या नेत्यांनी आता वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलन करणे आश्चर्यकारक आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी केली.

विश्वास पाठक म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे व हस्तक्षेपामुळे महावितरणला अडीच वर्षात मोठा आर्थिक बोजा सोसावा लागला. परिणामी ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या वाढीव आर्थिक बोजामुळे मध्यावधी दरवाढीसाठी राज्य विद्युत नियामक आयोगासमोर सुनावणी झाली व ३१ मार्च २०२३ नंतर दरवाढ लागू झाली. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीतील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांमुळे महावितरणवर बोजा आला व त्याची किंमत वीज ग्राहकांना मोजावी लागली.

त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळातील गैरव्यवहारामुळे वीज दरवाढ अपरिहार्य असल्याचे ध्यानात आल्यावर महायुतीच्या सरकारने वीज ग्राहकांवर कमीत कमी बोजा असावा यासाठी प्रयत्न केले. परिणामी वीज ग्राहकांच्या मासिक बिलात चार ते पाच टक्के इतकीच वाढ लागू झालेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महावितरणवर आर्थिक बोजा आला नसता तर वीज ग्राहकांवर मध्यावधी वाढ लागू झाली नसती, हे सुप्रिया सुळे व अन्य नेत्यांनी ध्यानात घेण्याची गरज आहे.

सुप्रिया सुळे यांना आंदोलन कराचेच असेल तर त्यांनी ते तत्कालीन ऊर्जा मंत्री यांच्या विरोधात आणि महाविकास आघाडी चालविणाऱ्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात करावे, असा टोला पाठक यांनी हाणला.

विद्युत नियामक आयोगाचा आदेश गेल्या वर्षी आला होता व त्याचा पहिला टप्पा गेल्या वर्षी १ एप्रिलला लागू झाला होता. आता निवडणुकीमुळे सुप्रिया सुळे हा विषय पुढे आणत असल्या तरी तो त्यांच्यावरच बूमरँग होईल, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महावितरण व महानिर्मितीचे नियोजन पूर्णपणे चुकले होते. त्यामुळे राज्यात लोडशेडिंगला पुन्हा सुरुवात झाली होती. लोडशेडिंगचे कारण सांगून खासगी पुरवठादारांकडून खूप जास्त दराने वीज खरेदी करण्यात आली. यामुळे आलेल्या आर्थिक बोजाची किंमत आज वीज ग्राहकांना मोजावी लागत आहे.

सायबर गुन्हेगारीच्या घटना देशभरात:इंटरपोल पासून विविध एजन्सींच्या नावाचा गैरवापर-पण पुणे पोलीस म्हणाले,पुणेकरांनो न घाबरता पुढे या..

पुणे-आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पुणेकरांना मोठे महत्वपूर्ण आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे कि देशभरात सायबर गुन्हेगारी फोफावली आहेअगदी इंटरपोल , सीबीआय ,आय बी पासून ते विविध तपास यंत्रणाच्या नावाने देखील फसवणूक आणि गुन्हेगारी वाढली आहे. पण पुणेकरांनो घाबरू नका , कोणत्याही बदनामीच्या भीतीला न घाबरता पुढे या आपण अशा गुन्हेगारीचा बिमोड करू ….
ट्रेडिंग फ्रॉड, टास्क फ्रॉड, फेडेक्स फ्रॉड, मॅन ईन मिडल फ्रॉड, फेसबूक फ्रेन्ड रिक्वेस्ट फ्रॉड, मेट्रिमोनी फ्रॉड (लग्न जमविणा-या साईट वरुन होणारे फ्रॉड), सेक्सटॉर्शन, लोन अॅप याव्दारे ऑनलाईन फसवणूक तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL), गुप्तचर विभाग (IB), केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), सायबर गुन्हे समन्वय केंद्र (14C) या केंद्रीय एजन्सींच्या नावाचा गैरवापर करून होणा-या ऑनलाईन आर्थिक फसवणुकी संदर्भात जनजागृती म्हणून पुणे पोलिसांनी पत्रक काढले आहे त्यात त्यांनी म्हटले आहेकी,’सध्याच्या युगात संगणक, इंटरनेट, मोबाईल, समाजमाध्यम जसे फेसबूक, व्हॉटस्अॅप, व्टिटर, इन्स्टाग्राम इ.चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून (शाळेच्या गृहपाठाकरिता) ते जेष्ठ नागरीकां पर्यत इंटरनेटचा सर्रास वापर सुरु आहे. ऑनलाईन बँकिंग, ऑनलाईन खरेदी विक्री, ऑनलाईन खादयपदार्थ मागविणे इ. प्रकारे ऑनलाईन सव्र्व्हस पुरवणाऱ्या संस्थांकडून प्रिपेड सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. अशा चांगल्या सुविधांबरोबरच काही समाजकंटक हे त्या सुविधांचा गैरवापर करुन नागरिकांना भिती दाखवून, प्रलोभने देवून, जास्त नफ्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. तसेच काही समाज माध्यमांचा वापर करुन फोटो मॉर्फ करुन महीलांना असे अश्लील फोटो पाठवून त्यांचेकडून पैसे उकळण्याचे गैरप्रकार देखील करतात. त्यामुळे नागरिकांनी शांत डोक्याने, सुरक्षितरित्या, सद्स‌द्विवेक बुध्दीचा वापर केल्यास त्यांना होणारा मनस्ताप, फसवणूक टाळता येवू शकते.
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (INTERPOL), गुप्तचर विभाग (IB), केंद्रीय अन्वेषण ब्युरो
(CBI), सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) यांसारख्या विविध केंद्रीय एजन्सींच्या नावाचा गैरवापर सायबर गुन्हेगारांकडून पैसे उकळण्यासाठी केला जात असून अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीच्या घटना देशभरात घडत आहेत.
विविध केंद्रीय एजन्सींच्या उच्चपदस्थ शासकीय अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगार खोट्या सहयांचे बनावट पत्र तयार करीत असून सदरचे पत्र बनावट ईमेल व्दारे नागरिकांना पाठविले जातात. सदर ईमेलव्दारे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाईची भिती दाखवून ऑनलाईन पैसे भरण्यासाठी भाग पाडून आर्थिक फसवणूक केली जात आहे.

‘गोमाता चारा खा… पाणी पी आणि सुखी रहा’ उपक्रमास महाराष्ट्रात प्रारंभ 

पुण्यातील महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने उपक्रम :  तब्बल ४५० हून अधिक गायींना दररोज  मिळणार चारा

 पुणे : ‘गोमाता चारा खा.. पाणी पी आणि सुखी रहा’ हा आगळा-वेगळा उपक्रम महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने सुरु करण्यात आला आहे. वाढत्या उन्हाच्या झळा गोमातेला देखील सोसाव्या लागत आहेत. अनेक ठिकाणी दुष्काळामुळे गोमातेला चारा – पाणी मिळत नाही, यासाठी  महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने हे अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती  महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. 

या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील श्री बोरमलनाथ गोशाळा ट्रस्ट येथे सुमारे ४५० हून अधिक खिलार,थारपार,गीर जातीचे गोवंश आहेत. या गोशाळेतील गोवंशांना दररोज सुमारे ६ टन चारा लागतो, ज्याचा दर दिवसाचा खर्च सुमारे १० हजार  आहे. लीला मणियार यांनी गाईंसाठी ५० हजार रुपयांचा चारा उपलब्ध करून देत या उपक्रमाला प्रारंभ झाला.  
शेखर मुंदडा म्हणाले, आपण गायीला मातेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे गोमातेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. उन्हाळ्यात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे गोमातेला चारा आणि पाणी देखील मिळत नाही. यासाठी ‘गोमाता चारा खा… पाणी पी आणि सुखी रहा’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. फेडरेशनच्या अंतर्गत महाराष्ट्रात २ हजार ५०० पेक्षा अधिक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. या संस्थाच्या माध्यमातून व सहकार्याने हा उपक्रम मोठ्या स्तरावर राबविला जाईल.

सिंधू सेवा दलातर्फे बुधवारी ‘चेटीचंड’ महोत्सव

पुणे : सिंधी समाजाचे नूतन वर्ष व भगवान साई झुलेलाल यांच्या १०७४ व्या जन्मोत्सवानिमित्त सिंधू सेवा दलातर्फे ‘चेटीचंड’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी (दि. १० एप्रिल) हा महोत्सव डेक्कन कॉलेज बँक्वेट हॉल, डेक्कन कॉलेज ग्राउंड, बॉम्बे सॅपर्स जवळ, येरवडा, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती सिंधू सेवा दलाचे अध्यक्ष अशोक वासवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी सिंधू सेवा दलाचे माजी अध्यक्ष सुरेश जेठवानी व दीपक वाधवानी, विजय दासवानी, सचिव सचिन तलरेजा, खजिनदार राजेंद्र फेरवानी, जनसंपर्क अधिकारी देवेंद्र चावला आदी उपस्थित होते.
अशोक वासवानी म्हणाले, “चेटीचंड महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम आणि सिंधी समाज बांधवांचा मेळावा होणार आहे. भगवान साई झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात होईल. मुंबईतील प्रसिद्ध गायक शुभम नाथानी आणि टीम, नागपूरची प्रतिभावान गायिका दृष्टी कुकरेजा, राजस्थानचे उत्कृष्ठ गायक मास्टर हर्षल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि  जयपूर येथील विनोदवीर भाग्यश्री दर्यानी सादरीकरण करणार आहे. सिंधी समाजात कपिल शर्मा अशी ओळख असलेल्या मोहित शेवानी कार्यक्रम संचालित करणार आहे. जनरेशन नेक्स्ट डान्स अकँडमीतर्फे नृत्यकलेचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर प्रीतिभोजने (महाप्रसाद) महोत्सवाची सांगता होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील चार हजार अधिक सिंधी बांधव या महोत्सवात सहभागी होतील.”
या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आसवानी प्रोमोटर्स अँड बिल्डर्सचे संस्थापक संचालक श्रीचंद आसवानी असणार आहेत. निवृत्त न्यायाधीश व महाराष्ट्राचे लोकायुक्त एम. एल. तहालियानी आणि बीजे मेडिकल महाविद्यालयातील निवृत्त सहयोगी प्राध्यापक डॉ. लछमनदास फेरवानी यांच्यासह सिंधी समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. सिंधी समाजाचा विकास करून समाजाच्या संस्कृतीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे व सिंधू समाजाच्या परंपरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. सिंधू सेवा दल गेली ३७ वर्ष कार्यरत आहे,” असे सुरेश जेठवानी यांनी नमूद केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित तमाशा महोत्सवाचे नियोजन आणि त्याची “फलनिष्पती”

सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दि 26मार्च ते 31मार्च 2024 या दरम्यान नवी मुंबईतील जुईनगर नाट्यगृहात सहा दिवस आयोजित केलेल्या “ढोलकी तमाशा महोत्सवा”मध्ये हलगी -ढोलकीचा जुगलबंदी बघायला मिळाली. पारंपारिक गण, गवळण, बतावणी, रंगबाजी, शृंगाराच्या लावण्या, सवाल -जवाब, शिलकार,फार्सा, वगनाट्य, आणि शेवटीची भैरवी सुद्धा भरगच्च गर्दीने भरलेल्या नाट्यगृहातील कला रसिकांना ऐकायला मिळाली.याचा अर्थ महाराष्ट्राची लोक संस्कृती किती विशाल आणि समृद्ध आहे. हे यातून स्पष्ट होतेय.

सन 2006पासून सांस्कृतिक कार्य संचालनालयाने सुरू केलेल्या तमाशा महोत्सवाची परंपरा अजून ही कायम राहिली आहे. कुठेही त्यात खंड पडला नाही. पण यावर्षाच्या ढोलकी तमाशा महोत्सवाचे वैशिष्ट्य वेगळे होते.सहा ही दिवस सादरीकरण करणाऱ्या तमाशा मंडळाने अगदी पारंपारिक पद्धतीने नवी मुंबईच्या रसिकांसमोर तमाशाचे सादरीकरण केले. हळीची गवळण. तक्रारीची गवळण, विनवनीची गवळण, सुटकेची गवळण, अगदी अध्यात्मिक रसातील गवळण अशा विविध प्रकारच्या गवळणी ऐकायला मिळाल्या, त्याला चक्क टाळ्या वाजवून लोकांनी दाद दिली.
हलगी -ढोलकीची जुगलबंदी, जणू काय पहिल्यांदाच आपण पाहतोय, या आनंदात टाळ्या आणि शिट्ट्याचा नाद ही ह्या वाद्याबरोबर नाट्यगृहात घुमू लागला होता.
बतावणी रंगबाजी या बरोबर शृंगाराच्या लावण्याचे जोरदार सादरीकरण झाले.काही तमाशात अगदी जुन्या काळातील लावण्या सादर केल्या.अन तेथे बसलेल्या अनेक जेष्ठ कला रसिकांना आपला तरुणपणाचा काळ आठवला.
तमाशा हा उन्नती रंजक, विचार आणि संस्कार या प्रेरणेतून उदयाला आलेली कला आहे.त्यामुळे सहा दिवस सुरू असलेला महोत्सव सुद्धा शासननाने त्याच उद्देशाने आयोजित केला असावा.असे वाटते.
समाज भेद, धर्म भेद, वंशभेद, वर्णन भेद यावर वगनाट्यातून समाज प्रबोधन केले. एकेकाळी अंधश्रद्धा, जुन्या रूढी चालीरीती याचा लोकांवर फार प्रभाव होता. त्या काळात तमाशा कलावंतांनी वग नाट्यातून समाजाचे प्रबोधन केले. आता वेळेअभावी तशी वगनाट्य सादर होत नाहीत. त्यामुळे अनेक तमाशा कलावंतांनी आपल्या रंगबाजीत काही मिनिटांचे ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक विषयावर “टायटल”दाखविण्यास सुरू केले आहे. जसे की, कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या पहिल्या कार्यक्रमाने या महोत्सवाचा शुभारंभ झाला. या तमाशातील कलाकारांनी जुन्या तमाशाचा बाजा बरोबरच आपल्या रंगबाजीत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भावनिक भेट दाखविली. हे दृष्य लोकांच्या काळजाला भिडले.शूरवीर तान्हाजी मालुसरे यांचा उत्तम अभिनय दाखविला. विनोद अवसरीकर, बुढन व्यापारी, रोहिदास पाठारे यांच्यासारखे मुरलेले कलावंत रंगमंचावर आले की, प्रेक्षक जोरदार टाळ्या वाजवून कलाकारांना प्रोत्साहन दयायचे.
शांताबाई संक्रापूरकर सह शाहिर संभाजी जाधव, अहमदनगर यांनी पारंपारिक आणि जुन्या बाजाच्या लावण्या सादर केल्या, स्वतःहा शाहिर संभाजी जाधव गणाला उभे राहिले होते. त्यांचा पहाडी आवाज लोकांच्या पसंती पडला होता.
सुनंदा कोचुरे धुळेकर, चि. शुभम कुमार धुळेकर या लोकनाट्य तमाशा मंडळाने तर खान्देशी ढोलावर खान्देशी गण, खान्देशी हळीची गवळण, त्याच बोली भाषेत टाकण, फार्सा सादर केला, अहिराणी भाषेत अनेक गीतं गायली.या वेगळ्या लोक कला प्रकाराला सुद्धा या शहरी भागातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
ढोलकी, हलगी,तुणतुणं, टाळ आणि हार्मोनियम अर्थात पारंपारिक पाय पेटी जी आता दुर्मिळ गोष्ट झालेली आहे.या वाद्यावर महादेव मनवकर (कराड ) यांनी रसिकांची मनं जिंकली. कुठेही आधुनिक वाद्य रंगमंचावर न ठेवता, या पारंपारीक वाद्यावर त्यांनी कला रसिकांच्या टाळ्या मिळविल्या,
चक्क कृष्ण आणि मावशी यांच्या संवादाला (सांधा)मनमुराद दाद देणारा प्रेक्षक पहिल्यादा दिसला.सरदार शंकरराव भुयाजीवाडीकर यांनी आपल्या गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्यांच्या सुरात लय होता.ताल होता.शास्त्रशुद्ध आवाजाचा कलाकारच ते जाणवत होते.

हळीची गवळण, तक्राराची गवळण, विनवनीची गवळण, सुटकेची गवळण, अशा विविध कला प्रकारच्या गवळणी त्यांनी सादर केल्या. सवाल जवाब, लावण्या, खांडगी त्याला काही भागात कड्या टाकणे म्हणतात. पोवाडा, शिलकार, झिल, वग असा सर्व कला प्रकार मनवकर यांनी पारंपारिक पद्धतीने सादर केला.यावेळी तमाशाला उपस्थित असलेले लोककलेचे अभ्यासक प्रा.डॉ. प्रकाश खांडगे यांनी तर आपल्या भाषणात मनवकर यांचा तमाशा हा “वास्तूपाठ”आहे.अशी प्रतिक्रिया दिली.
समाज प्रबोधनाची प्रेरणा घेवून जन्मास आलेल्या तमाशाला आधुनिक काळात नृत्य, संगीत, गायन, वादन आदी कलागुणांची जोड मिळाल्याने ही लोककला विकसित झाली. भक्ती, प्रबोधन आणि रंजन या तीन सूत्रांनी तमाशा रंगत असतो.असाच या महोत्सवात उषा खोमणे सह अर्चना पुणेकर (संभाजी नगर ) यांनी तमाशा जोरदार सादर केला
गण गौळण लावणी यांच्या सादरीकरणात वाद्याची उत्तम साद होती. ढोलकी जोरदार कडाडत होती. आपल्या लहान वयात आपल्याच तमाशात उत्तम सोगाड्या म्हणून काम करणारा, वडिलांसोबत रंगबाजीत जुगलबंदी करणारा, अन आज चंदेरी दुनियेत रमणारा,आघाडीचा गायक म्हणून आपले अस्तित्व निर्माण करणारा रविंद्र खोमणे याने आपल्या आईच्या तमाशाला वेळात वेळ काढून हजेरी लावून कला रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. म्हणजेच पारंपारिक तमाशाला आधुनिकतेची जोड देणारा हा तमाशा कला रसिकांच्या पसंती पडला होता.उषाबाईनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला.”माझी मैना गावाकडं राहिली”…! हे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचं गाणं गावून एका कलाकाराने लोकांमध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागृत केली.एका नृत्यगांने तर थेट रंगमंचवरून खाली उतरून या लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी आलेल्या एका गृहणीच्या हाताला धरून लावणीचा ठेका धरायला लावला.येवढे समरस सहा ही दिवस तमाशा कलाकारांनी प्रेक्षकांना करुन घेतले होते.
“तमाशा महोत्सवाची”सांगता अगदी दणक्यात झाली. रविवार असल्यामुळे सभागृहात हाऊस फुल्ल झाले होते. प्रेक्षक खाली बसले होते. काहींनी उभे राहून तमाशाचा आनंद घेतला.
वडिलांपासून गेली पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या मास्टर सुनिल वाडेकर यांच्या सोनाली-गजरा लोकनाट्य तमाशा मंडळाने पारंपारिक तमाशा सादर केला.
गण गवळण, बतावणी,रंगबाजी, यावर कला रसिकांनी मनमुराद दाद दिली.म्हणीमध्ये सरदार प्रभाकर सिंदेवाडीकर यांनी साळू सादर करू जुन्या बाजाची आठवण करून दिली. वाद्येही पारंपरिक वापरण्यात आली होती . एक ही नवीन आधुनिक वाद्ये नव्हते,हलगी ,पाय पेटी ,ढोलकी, या नादाने सभागृह डोलू लागले होते. विशेषतः हलगी वाजविणारे वसंतराव वाडेकर हे या तमाशाचे फड मालक सुनिल वाडेकर यांचे वडील होते. सुनिल वाडेकर यांच्या ढोलकी वादनाने प्रेक्षकांची मने जिंकली, सोनाली कुडाळकर आणि पाटणकर या नृत्यागंनानी सुंदर अशा लावण्या सादर केल्या. त्यांचे सादरीकरण उत्तम होते,
तमाशा महोत्सवाची सांगता, यांच्या सादरीकरणामुळे ठसक्यात आणि दणक्यात झाली . टाळ्या शिट्ट्याचा नेहमी प्रमाणे वर्षाव झाला. सहा ही दिवस या महोत्सवाला महिलांचा प्रतिसाद मोठा होता. यावर्षीच्या तमाशा महोत्सवात दाद देण्यास शहरी कला रसिकांनी कुठेही हात आखडता घेतला नाही. त्यामुळे तमाशा हेच रंजनासोबत उदबोधनाचे प्रभावी माध्यम आहे.खऱ्या अर्थाने ही कला जनसामान्यावर अधिराज्य गाजविणारी कला आहे, असे लोककला अभ्यासकांचे योग्य मत आहे.तमाशाला लिखित संहिता नसते.त्यातील संवाद व कृती बव्हंशी उत्स्फूर्त असते. संवाद मौखिक पंरपरेतून आलेले असतात. संवाद कल्पनेने आठवून म्हटले जातात. ही कला आता काळाच्या ओघात लोप पावत चाललेली आहे. याला खऱ्या अर्थाने जतन आणि जोपसण्याची गरज आहे.
आतापर्यंत राज्य सरकारने अभिजात कला आणि ग्रामीण कला यामध्ये सतत भिन्नता निर्माण केली आहे.हे वारंवार निर्दशनास आले आहे.. गाव कुसा बाहेरच्या कलेला सन्मान मिळत नव्हता. परंतु यावर्षीच्या तमाशा आणि लावणी महोत्सवाचे आयोजन करताना सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. दोन्ही महोत्सवाचे नियोजन उत्कृष्ट होते.
नवीमुंबई येथील जुईनगरमध्ये घेतलेल्या तमाशा महोत्सवात नाट्यगृहाला आकर्षण रंगीबेरंगी साजवट करण्यात आली होती. सुंदर असा रंगमंच सजवला होता. नाट्यगृहाच्या गेटवर तमाशा कलावंतांचे चित्र असलेले सेल्फीपॉईंट उभा करण्यात आला होता.
विशेष म्हणजे सहा ही दिवस लोककलावंतांना जेवण आणि अल्पपोहार, चहा पानाची उत्तम व्यवस्था संचालनालयाकडून करण्यात आली होती. या सर्व नियोजनासाठी कार्यक्रम अधिकारी संदिप बलखंडे आणि निलेश धुमाळ यांनी प्रचंड मेहनत घेतली. या दोघांचे कौतुक करावे. तेवढे कमी आहे.
पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यत संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महिंद्र कोंडे यांनी आपल्या विनयशील वाणीतून केले. मच्छिद्र पाटील यांनी सुद्धा या काळात लोककलावंतांना स्थानिकदृष्ट्या प्रामाणिकपणे भरपूर सहकार्य केले.
या तमाशा महोत्सवाला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवून या महोत्सवाची रंगत वाढविली.सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव बाळासाहेब सावंत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सह संचालक श्रीराम पांडे, लोककलेचे अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, सह प्रा. डॉ. शिवाजी वाघमारे यांची उपस्थिती होतीच, पण यांच्या सहकार्याने या तमाशा महोत्सवाला एक नवीन ऊर्जा मिळाली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्या देखरेखीखाली तमाशा आणि लावणी महोत्सवाचे नियोजन उत्तमच झाले, मात्र या दोन्ही महोत्सवाला आपल्या कार्यबाहुल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीची यामुळे उणीव भासत होती.
खरं तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाने यावर्षीचा तमाशा आणि लावणी महोत्सव खूप घाई घाईत उरकून घेतला. जणू काय एखादी “लगीन घाई”च सुरू होती. त्यामुळे कलाकारांना तालीम करायला अपूर्ण वेळ मिळाला. वगनाट्याची पूर्ण तालीम यामुळे कलाकारांना करतात आली नाही. सहा ही दिवस अनेक रंगबाजीतील सांधे सारखेच वाटत होते. त्यामुळे रोज येणार रसिका वर्ग एकच सांधा ऐकून कंटाळत होता. यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या पुढे दोन्ही महोत्सवात तोच तोच सारखेपणा येणार नाही. यासाठी प्रत्येक कला पथकाकडून कार्यक्रमाचे नियोजन करून घेतले पाहिजे.त्यामुळे तोच तोच पणा येणार नाही.ही कला जुन्याकडून नव्याकडे देण्यासाठी शासनाचे योग्य पद्धतीने प्रोत्साहन दिले पाहिजे. तर ही कला टिकून राहील.
निश्चितच या तमाशा महोत्सवामुळे जुन्या तमाशाचा बाज कला रसिकांना बघायला मिळाला. या कलेची परंपरा कळाली. ही कला अशीच यापुढे जतन ठेवायची असेल तर शासनाचे सहकार्य असलेच पाहिजे.याबद्दल शंका नाही.
या गावकुसा बाहेरच्या तमाशा कलेला शासनाने एका परिसंवादाच्या माध्यमातून विद्वता ही प्राप्त करून दिली. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत आधुनिक तमाशाची जडण घडण या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये हे निश्चित झाले की, तमाशाने आपले मूळ स्वरूप बदलेले नाही.

खंडूराज गायकवाड

‘सीएआर-टी’पेशी जनुकीय उपचार पद्धती कर्करूग्णांना नवजीवन देण्यात यशस्वी होईल – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मुंबई :  भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ असे नाव असलेली ही उपचार पद्धती सुलभतेने तसेच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असल्याने संपूर्ण मानवजातीसाठी ही उपचार प्रणाली नवी आशा देणारी ठरणार आहे. ही उपचार पद्धती असंख्य कर्करोगग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज व्यक्त केला.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात कर्करोगासाठी भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचार पद्धती (जीन थेरपी) चे लोकार्पण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रपती बोलत होत्या. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशीष चौधरी, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुदीप गुप्ता उपस्थित होते. तसेच शैक्षणिक तसेच पायाभूत सुविधा विषयक व्यवहार विभागाचे उपसंचालक प्रा.एस.सुदर्शन, वित्त आणि परराष्ट्र व्यवहार विभागाचे उपसंचालक प्रा.के.व्ही.के. राव यांच्यासह आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागाचे प्रा.राहुल पुरवार, टाटा मेमोरियल केंद्राचे डॉ.हसमुख जैन आणि शस्त्रक्रिया विभाग तज्ज्ञ डॉ.गौरव नरुला आदी या उपचार पद्धतीमधील महत्त्वाचे भागधारक यावेळी उपस्थित होते.

सीएआर- टी सेल थेरपी ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात अभूतपूर्व प्रगती मानली जात असल्याचे सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, सीएआर-टी पेशीवर आधारीत उपचार प्रणाली ही वैद्यकीय शास्त्रातील सर्वात अभूतपूर्व प्रगतीच्या बाबींपैकी एक समजली जाते. विकसित देशांमध्ये काही काळापासून ही प्रणाली उपलब्ध आहे, मात्र ती अत्यंत खर्चिक असल्याने जगभरातील बहुतांश रुग्णांच्या आवाक्याबाहेरील आहे. आज सुरु करण्यात आलेली उपचार पद्धती ही जगातील सर्वात परवडण्याजोगी असल्याचे समजून त्यांनी आनंद व्यक्त केला.

मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्यातील सहकार्यासह आणि इम्युनोअॅक्ट या उद्योग क्षेत्रातील भागीदाराच्या सहकार्याने भारताची ही पहिलीच सीएआर-टी सेल उपचार प्रणाली विकसित करण्यात आली आहे. देशातील शिक्षणक्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील भागीदारीचे हे उत्कृष्ट उदाहरण असून त्यातून अशा पद्धतीच्या इतर प्रयत्नांना प्रेरणा मिळेल, असेही राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी सांगितले.

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, तंत्रज्ञान शिक्षणाचे मॉडेल म्हणून आयआयटी मुंबई केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. सीएआर-टी पेशी उपचार पद्धती विकसित करण्यामध्ये संस्थेसोबत उद्योगाशीही भागीदारी केली जात आहे. आयआयटी मुंबईने गेल्या तीन दशकांमध्ये संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे हे शक्य झाले आहे. आयआयटी मुंबई इतर तत्सम संस्थांमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्ये संपूर्ण भारताला सध्या सुरू असलेल्या तांत्रिक क्रांतीमध्ये खूप उपयोगी ठरणार आहेत.

कर्करूग्णांना सीएआर टी’ उपचार पद्धती वरदान ठरेल – राज्यपाल रमेश बैस

आजचा दिवस हा देशासाठी व विशेषत्वाने आयआयटी मुंबई, टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्या इतिहासातील महत्वाचा दिवस आहे.  देशातील दोन प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन वैद्यकीय क्षेत्रातील हा अत्युत्कृष्ट उपक्रम सुरू केला आहे. आज आपण काही प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात मदत करणाऱ्या नव्या कर्करोग उपचार प्रणालीची सुरुवात करीत आहोत.  ही उपचार पद्धती कर्करोगाशी लढत असलेल्या रूग्णांना वरदान ठरणारी असून खेळण्याच्या वयात आजाराशी झुंज देणाऱ्या लहान बालकांना कुठल्याही संजीवनीपेक्षा कमी असणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

राज्यपाल श्री. बैस पुढे म्हणाले, सीएआर – टी उपचार पद्धती काही मोजक्याच देशांमध्ये उपलब्ध होती.  भारताने ही उपचार पद्धत संशोधित करून जगालाही आशेचा किरण दाखविला आहे. देशाच्या दुर्गम भागात सिकलसेल आजार दिसून येतो. या आजारावरसुद्धा कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज आहे. भारत हा जगामध्ये मधुमेहाची राजधानी बनत आहे, ही चिंतेची बाब असून आयआयटी मुंबई सारख्या अन्य संस्थांनी याबाबत संशोधन केले पाहिजे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर संशोधन करून दुर्धर आजारांच्या निदानाचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे मतही राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केले.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभाशीष चौधरी व टाटा मेमोरियल केंद्राचे संचालक डॉ.सुदीप गुप्ता यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला मान्यवरांसह आयआयटी संस्थेतील प्राध्यापक, विद्यार्थी,  टाटा मेमोरियल केंद्र आणि इम्युनोॲक्ट या संस्थेचे अधिकारी सहभागी झाले होते.

सीएआर-टी’ सेल उपचारपद्धती विषयी

नेक्ससीएआर 19 सीएआर-टी उपचारपद्धती ही शिक्षण क्षेत्र आणि उद्योगक्षेत्र यांच्या भागीदारीतून स्वदेशी पद्धतीने भारतात पहिल्यांदाच विकसित करण्यात आलेली सीएआर-टी उपचार प्रणाली आहे. नेक्ससीएआर 19 ही जगातील सर्वात परवडण्याजोगी सीएआर-टी उपचारपद्धती आहे. या प्रणालीच्या विकसनामुळे पेशी तसेच जनुकीय उपचार पद्धती विषयक जागतिक नकाशात भारताचे स्थान ठळक झाले आहे. टाटा मेमोरियल केंद्र आणि इम्युनोॲक्ट यांच्या संपूर्ण सहकार्यासह प्रा. राहुल पुरवार आणि त्यांच्या पथकाने आयआयटी मुंबई या संस्थेतील बीएसबीई विभागात ही उपचार पद्धती विकसित केली.

वंचितने सातत्याने अपमान केला पण वैयक्तिक अपमानापेक्षा देशाचे संविधान, लोकशाही महत्वाची: नाना पटोले

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खरा वारसदार मीच: खासदार चंद्रकांत हंडोरे

अकोला मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा अर्ज दाखल.

कोला-
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सातत्याने आपल्या महापुरुषांचा अपमान केला, संवैधानिक पदावर बसून भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रिबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचा अपमान केला. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी महापुरुषांचा अपमान केला. राज्यातील धर्मांध शक्तीने शाहु, फुले, आंबेडकरांचे विचार संपवण्याचे काम केले आहे. मतविभाजन होऊन भाजपाचा फायदा हेऊ नये यासाठी वंचितला महाविकास आघाडीत घेण्याचा प्रयत्न केला परंतु वंचितकडून सातत्याने आपला अपमान केला, टॉर्चर केले परंतु वैयक्तीक अपमानापेक्षा देशाचे संविधान व लोकशाही महत्वाचे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्याआधी झालेल्या सभेत नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पण वंचितकडून त्यात अडथळे आणले गेले. नाना पटोले माईंड गेम करतो असा आरोप केला, अपमान केला गेला असे असतानाही शेवटपर्यंत वंचितला मविआबरोबर घेण्याचा प्रयत्न केला पण वंचितने वेगळी भूमिका घेतली. भारतीय जनता पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक धोरण बदलत आहे. जीएसटीच्या माध्यमातून गरिबांकडून पैसे वसुल करून मुठभर श्रीमंतांचे खिसे भरत आहे. नोट बंदी व जीएसटीने देशाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. काँग्रेस मित्रपक्षांचा पराभव करण्यासाठीच भाजपाकडून मतविभागणी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.

यावेळी बोलताना खासदार चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर जाती धर्माच्या नावाखाली भाजपा समाजात भांडणे लावत आहे. देशाचे स्वातंत्र, लोकशाही व संविधान धुळीस मिळवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान संपवण्याचा भाजपाचा डाव आहे, हा डाव हाणून पाडा. काँग्रेसने सर्वांना समान अधिकार देण्याचे काम केले. सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए सरकारने गरिबांसाठी अन्न सुरक्षा कायदा आणला, माहितीचा अधिकार कायदा आणला, मनरेगा योजना आणली. काँग्रेस पक्षच दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. आपल्याला आमदार, खासदार मंत्री केले. मंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने राज्यभर न्याय भवन उभे केले. रमाई आवास योजना आणली. दलित, गरिब समाजाच्या कल्याणासाठी काम केले. खऱ्या अर्थाने मीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसदार आहे, असेही चंद्रकांत हंडोरे म्हणाले.
डॉ. अभय पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस प्रदेध्यक्ष नाना पटोले, खासदार चंद्रकांत हंडोरे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, आ. अमित झनक, आ. नितीन देशमुख, माजी आमदार गुलाबराव गावंडे, हेमंत देशमुख, उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, राष्ट्रवादीचे संग्राम गावंडे, ॲड.परवेज डोकाडिया, कपिल रावदेव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना वास्तवाचे भान जपावे-लक्ष्मीकांत देशमुख

‘एमआयटी’मध्ये ‘आशेच्या गुंगीत लटकलेले तारुण्य’वर परिसंवाद
पुणे : “युवापिढी स्मार्ट व हुशार आहे. वेगवगेळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण कल्पनांनी जगाला गवसणी घालण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. अशावेळी आपल्या हृदयाचे, मेंदूचे ऐकावे आणि करिअर निवडताना तार्किक विचार करावा. वास्तवाचे भान ठेवून भविष्यातील मार्ग निवडले, तर यशाचा मार्ग सापडतो,” असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी व ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
आळंदी येथील एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने कादंबरीकार ज्ञानेश्वर जाधवर लिखित ‘आशेच्या गुंगीत लटकलेले तारुण्य’ या कादंबरीवरील परिसंवादात लक्ष्मीकांत देशमुख बोलत होते. प्रसंगी ज्येष्ठ समीक्षक व लेखक प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी, एक्स्पोन्शिया लर्निंग सोल्युशन्सच्या संचालिका सारिका कुलकर्णी, उद्योजक शरद तांदळे, लेखक ज्ञानेश्वर जाधवर, ‘एमआयटी’चे संचालक डॉ. महेश गौडर, अधिष्ठाता डॉ. श्रीधर खांडेकर, परिसंवादाचे संयोजक प्रा. हुसेन शेख आदी उपस्थित होते.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “ज्ञानेश्वर जाधवर याचे लेखन आश्वासक असून, मला तो मराठीतील महत्त्वाचा कादंबरीकार वाटतो. त्याचा दर्जा आणि साहित्यिक मूल्य हे महत्त्वाचे आहे. धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि राजसत्ता समजावून सांगणारी ही कादंबरी आहे. माणसांच्या जगण्यातील सुख-दुःखे समजण्यासाठी समता, बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्ये रुजवण्यासाठी साहित्य महत्त्वपूर्ण ठरते. पुस्तके वाचणारी माणसे घडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचत राहावे.”

डॉ. आनंद कुलकर्णी म्हणाले, “आळंदी हे मला दोन कारणासाठी महत्त्वाची वाटते. तेराव्या शतकात ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समाजाला जगण्याचा संदेश दिला. आज या ज्ञानेश्वराने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी ‘आशेच्या गुंगीत लटकलेलं तारुण्य’ ही कादंबरी दिली आहे. युवापिढीला, पालकवर्गाला ही कादंबरी मार्गदर्शक ठरेल. कसदार आशय व रोजच्या जगण्यातली भाषा यामुळे ही कादंबरी आपल्याच जगण्यावर प्रकाश टाकते, असे वाटते.”
सारिका कुलकर्णी म्हणाल्या, “आपल्याकडे व्हाईट कॉलर नोकरीला अधिक महत्त्व आहे; पण ते सर्वस्व नाही. वर्तमान पिढीसमोर अनेक संधी आहेत. त्यातून काही विद्यार्थ्यांचा गोंधळ होत आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेऊन करिअर निवडावे. स्पर्धा परीक्षा म्हणजे सर्वस्व नसून, त्यात करिअर करणे म्हणजेच यशस्वी होणे असेही नाही. माणूस म्हणून जगणे हे खऱ्या अर्थाने यश आहे.”

शरद तांदळे म्हणाले, “स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वतःची क्षमता ओळखून वेळ द्यावा. दोन-तीन प्रयत्नात निवड झाली नाही, तर पर्यायी मार्ग निवडावा. ‘प्लॅन बी’ सुरुवातीपासून तयार ठेवायला हवा. मोठी स्वप्न पाहण्यास हरकत नाही; परंतु स्वप्नपूर्तीसाठी कष्ट करण्याची तयारी ठेवावी.”

ज्ञानेश्वर जाधवर यांनी कादंबरी लेखन व विषयाची पार्श्वभूमी विशद केली. प्रा. हुसेन शेख यांनी परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. महेश गौडर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. महेंद्र शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. श्रीधर खांडेकर यांनी आभार मानले. कौस्तुभ रेळेकर व ऋषिकेश पाटील या विद्यार्थ्यांनी कादंबरीवर पेपर वाचन केले.

दुर्गम भागात प्रभावी संपर्क यंत्रणा राबवा-सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे

पुणे,: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करुन भोर विधानसभा मतदारसंघात असलेल्या दुर्गम भागात प्रभावी संपर्क यंत्रणा राबवावी आणि दूरसंचार सुविधा नसलेल्या भागात संदेशवाहकांची मदत घ्यावी, असे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिले.

वेल्हा तालुक्यात कोंढावळे बु. येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भोर विधानसभा मतदारसंघात नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण सत्राच्यावेळी ते बोलत होते. वेल्हा तहसीलदार निवास ढाणे, निवासी नायब तहसीलदार राजश्री भोसले, निवडणूक नायब तहसीलदार उत्तम बडे, नायब तहसीलदार मनीषा भुतकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. कचरे म्हणाले, भोर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संदेशवाहक (रायडर) नेमण्यात आले आहे. त्यासोबत स्थानिक पातळीवर कार्यरत ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल आदींची मदत घ्यावी. मतदानाच्या दिवशी तांत्रिक अडचण असल्यास तात्काळ वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन स्थानिक पातळीवर ती तात्काळ दूर करावी. मतदान केंद्राबाबत दर दोन तासांनी माहिती प्राप्त होईल, असे नियोजन करावे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी तसेच मतदानाच्या दिवशी कर्तव्य बजावत असताना भारत निवडणूक आयोगाच्या अद्ययावत सूचनांचे पालन करावे.

यावेळी ईव्हीएमचे बॅलेट युनिट व कंट्रोल ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तपासणी, मतदान केद्रांची रचना, मतदान साहित्याची वाहतूक, केंद्रावरील सुरक्षाव्यवस्था, अभिरूप मतदान (मॉकपोल), मतदानाच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन आदीबाबत श्री.कचरे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ईव्हीएम यंत्राच्या प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूमला भेट

स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रुमला भेट देऊन स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले.

डॉ. दिवसे यांनी आज पिंपरी विधानसभा मतदार संघ कार्यालयांतर्गत ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र आणि निगडी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवनातील स्ट्राँग रूम, थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम, साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र, देहूरोड येथील मतदान केंद्र, सोमाटणे येथील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र व नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्लॉलॉजी तळेगाव दाभाडे येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली.

त्यांनी स्टाँगरूम व्यवस्थापन, नियोजनाबाबत आढावा घेतला. मतदान यंत्रे ठेवण्यासाठीची व्यवस्था, सीसीटिव्ही यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था यांची बारकाईने चाचणी करण्यात यावी, तसेच त्याठिकाणी २४x७ आवश्यक पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी. निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पिंपरीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपआयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी येथे आयोजित क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचीही पाहणी करुन क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी श्री. नवले यांनी मावळ विधानसभा मतदार संघातील पूर्वतयारी व नियोजनाबाबत माहिती दिली. मावळ मतदार संघामध्ये एकूण ३९० मतदान केंद्र आहेत. एकूण ४५ सेक्टर ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येकी ६ फिरती पथके (एफएसटी) व स्थीर निरीक्षण पथके (एसएसटी), ३ व्हीएसटी व २ व्हिडीओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) व १ उमेदवार खर्च नोंदणी पथक अशी पथके कार्यान्वित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

चिंचवड मतदार संघामध्ये एकूण ५४९ मतदान केंद्र आहेत. १०० टक्के एपिक रजिस्ट्रेशन झालेले आहे. एकूण ४८ सेक्टर ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच ६ एफएसटी, ६ एसएसटी, २ व्हीएसटी व १ व्हीव्हीटी व एक अकाउंटिंग टीम अशा टीम कार्यान्वित करण्यात आलेली असल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.

पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ८५ इमारतीमध्ये एकूण ३९९ मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर आहेत, अशी माहिती अर्चना यादव यांनी दिली.