शिवाजी महाराजांच्या बदनामी विरोधात लढणे गुन्हा आहे काय ? जयंत पाटलांचा सवाल
राष्ट्रवादीचे नेते ,माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आज पोलिसांनी अटक केल्यावर राजकीय वातावरण तापले असून , सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे म्हणत , राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसेला देखील लक्ष्य केले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील शिवाजी महाराजांच्या बदनामी विरोधात लढणे गुन्हा आहे काय ? असा प्रश्न शिंदे -फडणवीस सरकारला केला आहे.
या सगळ्या प्रकाराचा निषेध करताना अमोल मिटकरींनी ट्विटरवर राज्यात हुकुमशाही नांदत असल्याचं म्हटलं आहे. “राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करून या सरकारने परत एकदा या राज्यात हुकूमशाही नांदते आहे याचा प्रत्यय करून दिल्याबद्दल सरकारचे धन्यवाद!” असं मिटकरींनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारवर टीका करतानाच मिटकरींनी अप्रत्यक्षपणे मनसेलाही लक्ष्य केलं आहे. “मुठभर ‘खोप्या’तील ‘देशी’ गुंडांच्या नादाला लागून सरकारने ज्या पद्धतीने हा प्रकार केलाय, त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील”, असा सूचक इशारा अमोल मिटकरींनी दिला आहे. या उल्लेखातून मनसेच्या अमेय खोपकरांनाच मिटकरींनी लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे.
सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो सुरू होता. या चित्रपटामध्ये शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप करत जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी शो बंद पाडला. यावेळी काही प्रेक्षकांना आव्हाडांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मनसेनं यासंदर्भात टीका केल्यानंतर आव्हाडांविरोधात वर्तकनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली.