अर्जदारांच्या सोयीसाठी 20मे पर्यंत मुदतीत वाढ
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांना मोफत ई रेशनिंग कार्ड अर्थात स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रसेवा प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमास नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमांतर्गत सुमारे 2 हजार अर्जाचे वाटप झाले असून खास नागरिकांच्या सोयीसाठी याची मुदत 20 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री दिलीप वेडेपाटील यांनी दिली आहे.
उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना श्री. वेडेपाटील यांनी सांगितले की,
या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अर्ज भरून द्यावा लागतो. अर्जासह रेशनिंग कार्डची झेरॉक्स प्रत, महिला कुटुंब प्रमुखाच्या पासबूकची झेरॉक्स, महिला कुटुंब प्रमुखासह कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स, दोन छायाचित्रे, एलपीजी गॅस पासबुकाची झेरॉक्स असे दस्तऐवज जोडावे लागतात. उपक्रमाच्या पुढील टप्प्यात अर्जाची पडताळणी होऊन त्यानंतर पात्र नागरिकांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. ई रेशनिंग कार्डमुळे रेशनिंग मालाच्या अवैध व्यापारास आळा बसणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी राष्ट्रसेवा प्रतिष्ठानने उचललेले हे पाऊल आदर्शवत आहे.
पुण्याला स्मार्ट सिटी बनविण्यास हातभार लावण्यासाठी नागरिकांनी देखील या विधायक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.