नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्काराने कलाकारांचा सन्मान
पिंपरी । प्रतिनिधी:
पुरस्कार मिळाल्यामुळे कलाकार रिटायर होत नाही, तर पुरस्कारामुळे आपल्यावरील जबाबदारी अधिक वाढते, असे प्रतिपादन कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन, कामगार कल्याण मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर यांनी केले.
सह्याद्री प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य व विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यामाने रंगकर्मी समिधांचा गौरव व पुरस्कार – 2018 कार्यक्रमांतर्गत नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्कारांने मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीतील कलाकारांचा भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते.
नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांना सन्मानित करण्यात आले. तसेच नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रंगकर्मी पुरस्काराने मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीतील कलाकार शेखर फडके, अशोक शिंदे, भाऊसाहेब भोईर, योगेश सोमण, अरुण नलावडे, भाऊसाहेब शिंदे, नायिका मैथिली जामकर, स्मिता पाटील आदींना गौरविण्यात आले. कवड्याची माळ, स्मृतिचिन्ह, भगतसिंग-सुखदेव-राजगुरु यांची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरुप होते.
यावेळी आमदार महेश लांडगे, सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व आमदार संजय केळकर, सभागृह नेते एकनाथ पवार, लायन ओमप्रकाश पेठे, विक्रम गोजमगुंडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदानंद पिलाने, सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक अमित बच्छाव, नगरसेविका प्रियांका बारसे, लातूर नाट्य परिषदेचे अध्यक्ष शैलेश गोजमगुंडे आदींसह गोजमगुंडे कुटुंबिय उपस्थित होते.
संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले, मराठवाड्याचे सुपुत्र नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांच्या नावाने सांस्कृतिक नगरीत पुरस्कार देणे, ही सर्व मराठवाडा वासियांसाठी अभिमानाची बाब आहे. मी माहिती काढली असता आजपर्यंत मराठवाड्यातील एकाही कलाकाराच्या नावे पुरस्कार दिला जात नाही. आपण राज्य शासनाकडे प्रस्ताव ठेवून यंदापासून नटवर्य श्रीराम गोजमगुंडे पुरस्कार सुरु करणार आहे. राजाश्रयामुळे कलाकारांना उंची प्राप्त होते, या मताशी मी सहमत नाही. तर कलाकारांमुळे आम्ही मंत्रीपदापर्यंत पोहोचलो आहोत. पुरस्कार मिळाल्यामुळे कलाकार रिटायर होत नसतो. पुरस्कारामुळे कलाकारांवरील जबाबदारी अधिक वाढत असते, असेही पाटील यांनी सांगितले.
संजय केळकर यांनी सांगितले, की सह्याद्री प्रतिष्ठान गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करत असतानाच सैनिकांचे कुटुंबिय, पोलिस, कलाकार आदींना सन्मानित करते. आम्ही सध्या चार गड किल्ल्यांचे संवर्धानाचे काम हाती घेतले आहे. गड किल्ल्यांचे जुनेपण जपले गेले पाहिजे. याकामी लोकवर्गणी व लोकसहभाग वाढला गड किल्ल्यांचे संवर्धन करणे अधिक सोयिस्कर होईल. याबाबत प्रतिष्ठानने शासनाकडे लोकसहभाग व लोकवर्गणीतून गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी जीआर काढण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्याला आता मूर्त स्वरुप येत असून, लवकरच या संदर्भातला जीआर काढण्यात येणार आहे.
पुरस्काराला उत्तर देताना अशोक समेळ म्हणाले, नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांच्या नावाने पुरस्कार मिळणे, हे माझे भाग्य आहे. श्रीराम गोजमगुंडे यांच्या नसानसात नाटक भिनले होते. ते फक्त नाटक जगले. नाटक हाच त्यांचा श्वास होता. 1999 साली आभाळमायाचे काम सुरु असताना एका दिग्दर्शकाकडून गोजमगुंडे यांच्यासाठी लेखन करण्याबाबत विचारले. गोजमगुंडे यांना आपण चांगले ओळखत असल्यामुळे आपण याला तात्काळ होकार देत त्यांच्यासाठी लेखन केले, अशी श्रीराम गोजमगुंडे यांच्याबद्दलची आठवणही त्यांनी सांगितली.
दरम्यान, पुरस्कार वितरण कार्यक्रमापूर्वी शाहीर बाळासाहेब काळजे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश गोजमगुंडे यांनी केले. सूत्र्संचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. आभार विक्रांत गोजमगुंडे यांनी मानले.