पुणे दि. 1- महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा गौरवशाली आणि दिशादर्शक आहे. संत साहित्यातील विचार हे आजच्या समाजाची गरज आहेत. याच विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे किसन महाराज साखरे यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कर प्रदान करण्यात येतोय हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, क्रीडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ मंत्री विनोद तावडे यांनी केले.
येथील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराचे मानकरी डॉ. किसन महाराज साखरे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर, महापौर मुक्ता टिळक, शास्त्रज्ञ विजय भाटकर, या पुरस्काराचे माजी मानकरी रामकृष्ण महाराज लहवितकर, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, पुरस्कार निवड समितीचे सदस्य भास्कर आव्हाड, डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, सांस्कृतीक कार्य संचालनालयाचे संचालक संजीव पलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
संत साहित्यातील कार्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी हा पुरस्कार डॉ. किसन महाराज साखरे यांना देण्यात आला. या पुरस्काराचे माजी मानकरी रामकृष्ण महाराज लहवितकर व फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र व धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले, अध्यात्म हे विज्ञाननिष्ठ आहे. आपल्या देशाची संस्कृती जपण्याचे काम किसन महाराज साखरे करत आहेत. संस्कृतमधील अनेक ग्रंथ मराठीत आणून त्यांनी ते समाजामध्ये पोहचवले. राज्याच्या सांस्कृतिक जडण घडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे देखील श्री. तावडे म्हणाले.
डॉ. किसन महाराज साखरे म्हणाले, समाजात दैवी संपत्ती नांदण्यासाठी संत साहित्याची गरज आहे. जगातील सर्व तत्वज्ञानाचा समावेश ज्ञानेश्वरीत आहे. अध्यात्मिक ज्ञानासोबतच शरीर निरोगी असणे गरजेचे आहे त्यासाठी योग हा उत्तम मार्ग आहे. माणसाचे मन, मनगट आणि मेंदू सशक्त असणे गरजेचे आहे. हा पुरस्कार म्हणजे इथून पुढील कार्यासाठी प्रोत्साहन असल्याचे देखील, त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात पंडिता मंजुषा पाटील यांच्या अभंगरंग या कार्यक्रमाने झाली. त्यांच्या सुरेल आवाजातील भक्तीगीतांनी नाट्यगृहातील वातावरण भक्तिमय झाले होते. त्यांना मोहन पारसनीस, नंदू भांडवलकर, रोहित मराठे आणि अमृत भांडवलकर यांनी साथ दिली. स्वागतगीत रघुनाथ खंडाळकर यांनी सादर केले. यावेळी महादेव सस्ते महाराजांच्या विद्यार्थ्यांनी दिंडीचे सादरीकरण केले. या दिंडीने वारकरी परंपरा तसेच डॉ. साखरे महाराज यांच्या साहित्य संपदेचे दर्शन उपस्थितांना घडवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी तर आभार प्रदर्शन संस्कृतीक कार्य संचालनालयाचे संचालक संजीव पलांडे यांनी केले.
■महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळास धनादेश सुपूर्द■
संस्कृत भाषेचे जतन आणि अभ्यास होण्यासाठी डॉ. किसन महाराज साखरे यांनी आपल्या पुरस्काराचा धनादेश शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सुपूर्द केला. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हा धनादेश महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाकडे देणार असल्याचे सांगितले. संस्कृत भाषेतील ज्ञान विद्यार्थांपर्यंत पोहचण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी देखील आपले एक महिन्याचे वेतन देणार असल्याचे यावेळी जाहीर केले.