पुणे दि. 7- समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रमुख कार्य बार्टीतील समतादूत दि. 2 ऑगस्ट पासून सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणेचे महासंचालक कैलास कणसे यांनी दिली.
सामाजिक न्याय मंत्री, राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाधार योजनेचा प्रचार व प्रसार व लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव दिनेश वाघमारे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणेचे महासंचालक कैलास कणसे यांच्या प्रेरणेने, योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे प्रमुख कार्य बार्टीतील समतादूतांनी दि. 2 ऑगस्ट पासून सुरु केले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याती सहायक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण यांच्या उपस्थितीत व प्रज्ञा वाघमारे, मुख्य प्रकल्प संचालिका, (समतादूत, बार्टी) यांच्या संनियंत्रणाखाली एकाच दिवशी, एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
दि.2 ते 31 ऑगस्ट 2018 या कालवधीत जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत समतादूत प्रत्येक दिवशी 2 महाविद्यालयामध्ये जाऊन प्रचार व प्रसार करतील. असे एकूण 150 समतादूत हे काम करणार असुन प्रतिदिन 300 कार्यक्रम घेतले जातील. एकूण 26 दिवसांमध्ये 7800 कार्यक्रम घेण्याचे लक्षांक आहे.
दि. 1 सप्टेंबर 2018 पासून 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत समतादूत स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनांचा लाभ घेणाऱ्या उमेदवारास आवश्यक कागदपत्रे घेऊन फॉर्म भरुन देतील. सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीतर्फे करण्यात आले आहे.