पुणे- उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रात उत्त्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. हा गौरव सोहळा म्हणजे ऊर्जा संवर्धना बाबत प्रोत्साहन आणि प्रबोधन करण्याचेच एक माध्यम आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री गिरीष बापट यांनी केले.
येथील महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा ) या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेतर्फे आयोजित बाराव्या उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पारितोषिक वितरण समरंभात ते बोलत होते. यावेळी राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मेधा कुलकर्णी, बि. इ. इ चे महासंचालक अभय बाकरे, महाऊर्जाचे महासंचालक विपीन शर्मा, अतिरिक्त महासंचालक पुरूषोत्तम जाधव, पुरस्कार निवड समितीचे सदस्य व्ही. व्ही कानेटकर, पी. जी. चव्हाण, बि. पी. भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. बापट म्हणाले, वाहतूक, पाणी टंचाई, ऊर्जा संवर्धन अशा अनेक समस्या आज समोर आहेत, या सर्व समस्यांबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. एका चांगल्या कामाचा गौरव केल्याने एका चांगल्या विचाराचा गौरव होतो. उर्जा संवर्धनासाठी शालेय स्तरापासून प्रबोधन करायला हवे. मोठ्या शहरांमध्ये आज पाण्याचा अतिरीक्त वापर केला जातो तो टाळायला हवा. आज देशातील 38 कोटी लोकांनी नव्याने बँक खाती उघडली आहेत. प्रयत्न केले की अनेक गोष्टी सहज शक्य होतात याचेच हे उदाहरण आहे. देशात ऊर्जा बचतीबाबत महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे हि आनंदाची बाब.
श्री बावनकुळे म्हणाले, ऊर्जा क्षेत्रात काम करणारे देशच जागतीक पातळीवर श्रीमंत देश आहेत. आपल्या देशात देखील ऊर्जा संवर्धनासाठी तसेच प्रत्येक घरा पर्यंत वीज पोहचवण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन प्रयत्न करीत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून दुर्गम भागात प्रत्येक घरात आज वीज पोहचविण्यासाठी प्रयत्न सूरु आहेत. या क्षेत्रात काम करू इच्छीणाऱ्या सर्व संस्थांना लागणारी मदत तसेच सुविधा देखील पुरवण्याचा प्रयत्न आम्ही करु. सन 2025 पर्यंत शेतकरी सौर उर्जेचा वापर करतील असा विश्वास आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री. शर्मा यांनी केले. प्रादेशिक महाव्यवस्थापक आवाड यांनी आभार मानले. उर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यातील सुमारे 63 संस्थांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.