पुणे, दि. 23: भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी ‘जलसमृद्ध ग्रामपंचायत आणि स्वच्छ गाव’ या विषयावर चर्चा करण्यात आली.
केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अप्पर सचिव अर्चना वर्मा म्हणाल्या, ग्रामपंचायत लोकशाही प्रणालीतील सर्वात सशक्त घटक आहे. ग्रामपंचायतींनी सहकार्य केल्यास देशाच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वास आणता येईल. ग्रामस्तरावर विविध घटकांना एकत्र घेऊन सरपंच अनुकूल बदल घडवून आणू शकतात. सरपंच सक्षम असल्यास चांगले बदल घडवून आणण्यात यशस्वी ठरतात. शाश्वत विकासाच्या उद्दीष्टापैकी पाणी महत्वाचे उद्दिष्ट असल्याने त्याविषयी नियोजन महत्वाचे आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा म्हणाले, साधनस्त्रोताचा सुयोग्य उपयोग करून गावाला स्वच्छ आणि हरित करण्याची कार्यवाही करता येईल. यासाठी आवश्यक वातावरण कायम ठेवण्याबाबतही चर्चा करणे गरजेचे आहे. निधीचा कार्यक्षम उपयोगाद्वारे गावाचा विकास कसा करता येईल, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि कौशल्य कसे मिळविता येईल यावरही विचार व्हावा. ग्रामीण भागात प्लास्टिकसारखा कचरा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर प्रक्रिया करण्याचा विचार करण्याची गरज आहे.
पंचायत राज मंत्रालयाच्या संचालिका मालती राव, यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी हेदेखील यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध राज्यातील प्रयोगशील ग्रामपंचायतींच्या यशोगाथांवर आधारित चित्रफिती दाखविण्यात आल्या. उपस्थित सरपंच, ग्रामसेवक आदींनी चर्चासत्रात सहभाग घेतला आणि आपले अनुभव मांडले.