पुणे : लोकांनी तुम्हाला त्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजनांचा अभ्यास करून या योजना सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी राबवाव्यात. लोककल्याणासाठी तुम्ही कार्यरत राहिला तर जनताही तुम्हाला विसरत नाही. असा कानमंत्र देत पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या आजवरच्या राजकीय जीवनातील यशस्वी वाटचालीचे गमक उलगडले. आज कसबा मतदार संघातील कार्यकर्त्यांशी त्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या व त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगरसेवक महेश लडकत, राजेश येनपुरे, योगेश समेळ,धीरज घाटे, अजय खेडेकर,आरती कोंढरे,सुलोचना कोंढरे, हेमंत रासने, सुहास कुलकर्णी, दिलीप काळोखे, सम्राट थोरात यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, निवडणुका ही एक लढाई आहे. ती लढाई आपण लढू तसेच जिंकूही पण येत्या दोन वर्षात कोणत्याही निवडणुका नाहीत. त्यामुळे पक्षबांधणीच्या दृष्टीने येणारी दोन वर्ष महत्वाची आहेत. येत्या निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांकडे पाहून लोकांनी मते दिली पाहिजेत. यासाठी या लोकोपयोगी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचवला पाहिजे. पक्ष आणि पक्षसंघटनेला प्राधान्य देऊन पक्षाने ठरवून दिलेल्या ध्येय धोरणाप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकांसाठी कार्यक्रम राबवा अशा सूचना ही त्यांनी यावेळी केल्या. त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असला पाहिजे . त्यांनी लोकांच्यात मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात संपर्क कार्यालय सुरु करावे. दैनंदिन कामाचे नियोजन करून दिवसातील काही वेळ या संपर्क कार्यालयात बसून लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात अशा सूचना त्यांनी देत आपल्या राजकीय यशाच गमक केल्या.
आजपर्यंत पक्षाला जे यश मिळाले ते कार्यकर्त्यांमुळे मिळाले आहे. गेले अनेक महिने निवडणुकांची लगबग सुरु असल्याने कार्यकर्त्यांशी बोलता आले नव्हते. काही प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ही बैठक बोलवली होती. विधनासभा, लोकसभा तसेच महानगर पालिकेच्या निवडणुकीत लोकांनी विश्वास ठेवून भाजपला भरभरून प्रेम दिले. लोकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वास सार्थ करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ही आपापले मतभेद विसरून सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम केले पाहिजे. असेही ते म्हणाले.