पुणे ता १२ : परतीचा पाऊस न झाल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा तालुकानिहाय आढावा पालकमंत्री उद्यापासून घेणार आहेत. या परिस्थितीचा सविस्तर अहवाल लवकरच मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल.अशी माहिती गिरीश बापट यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे दिली.
यंदा मान्सूनने परततांना ओढ दिली आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच उन्हाच्या झळा लागत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचा ही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी आढावा घेऊन त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला होता. दुष्काळाबाबत केंद्र सरकारने निकष तयार केले असून, त्यानुसार ही माहिती घेण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांसंदर्भात ३१ ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे.
मंचर आणि आंबेगाव तालुक्याची बैठक आज मंचर येथे आयोजित करण्यात आली आहे. उद्या इंदापूर, बारामती तालुक्यातील बैठक बारामती येथे, दौंड पुरंदर तालुक्यातील बैठक सासवड येथे, हवेली तालुक्याची बैठक मांजरी बुद्रुक येथे तर रविवारी भोर, वेल्हा तालुक्याची बैठक नसरापूर येथे होणार आहे. या दौऱ्यात पालकमंत्री या तालुक्यांची पाहणी करून स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दुष्काळामुळे भविष्यात काही गंभीर समस्या निर्माण झाल्यास तर काय उपाय योजना करता येतील याबाबत चर्चा करून अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत.असे या पत्रकात नमूद केले आहे.