पिंपरी, दि १२- भारतातल्या दूध व्यवसायाला सध्या बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरु आहे. १४ कोटी लिटर दूध उत्पादन असून ६४ कोटी लिटर दुधाचा खप हे संशयास्पद आहे. दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत आहे. राजकीय आश्रयामुळे भेसळखोरांचं फावत आहे. या भेसळीचा त्रास सर्वसामान्य शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही भेसळ रोखने गरजेचे आहे. असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
पिंपरी येथे ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे दूध परिषदेचे उदघाटन दुग्ध विकास व पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार राजू शेट्टी , खासदार अमर साबळे, कात्रज डेअरीचे संचालक विष्णूकाका हिंगे ,कांतीलाल उमाप आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महादेव जानकर म्हणाले, पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर भारतात पहिला “एक्सलन्स स्टेट” म्हणून महाराष्ट्राला दर्जा मिळाला. याशिवाय दुधाचे दर ३ रुपयांवरून ७ रुपयांपर्यत वाढवण्याचे काम आमच्या खात्याने केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ” गोवंश गोवर्धन” योजना हि भारतातील सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. चारायुक्त शिवार योजना या सारख्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. गोसंवर्धन गोशाळेला मोठा निधी दिला.
खासदार अमर साबळे म्हणाले, दूध उत्पादक संस्थांनी प्रामाणिकपणा, सचोटीने व्यवसाय करावा. वर्ड हेल्थ ऑर्गनायजेंशनने हि चिंता व्यक्त केली आहे कि, दुधाच्या भेसळीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भेसळ करताना दूध संस्थांनी प्रामाणिकपणा सचोटीने राहणे गरजेचे आहे.