गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
पुणे :- रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे.एकाने रक्तदान केल्यास त्यातून चौघांना जीवनदान मिळते. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. समाजात रक्तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करुन जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करुन रक्तदान वाढवणे ही आजच्या काळाची गरज आहे. त्यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे असे मत अतुल गोयल यांनी यावेळी व्यक्त केले.गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
मार्केटयार्ड येथील गंगा धाम टॉवर्स आणि बावधन येथील गंगा लेजंड येथे १०० पेक्षा अधिक लोकांनी यात सहभाग घेतला. गेल्या १५ वर्षापासून गोयल गंगा फाऊंडेशन हा उपक्रम राबवते आहे. गोयल गंगा फाऊंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल आणि अमित गोयल यांनी या सर्वप्रथम रक्तदान करून या उपक्रमाची सुरुवात केली.
अमित गोयल म्हणाले कि ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ आहे. रक्तदान हे जीवनदान देण्यासाठी आवश्यक आहे. रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही. सुदृढ, सशक्त माणूस रक्तदान करू शकतो. आज धकाधकीच्या बर्याच ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातात ऑपरेशनच्या वेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे आणि तो आपण समाजातील एक सूज्ञ म्हणून करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.