प्रशासकीय सेवेत लोकसमुदायाची गरज जाणून घ्या- कमलेश शर्मा
पुणे-“ प्रशासकीय सेवेत कार्य करतांना प्रत्येकाने प्रामाणिकपणा, धाडस, इच्छाशक्ती आणि न्यायी वृत्ती या चतुःसूत्रीने कार्य करावे. सदैव जागृत राहून आजू बाजूच्या परिस्थितीच भान ठेवावे,”असा सल्ला द कॉमन वेल्थ ऑफ नेशन्सचे माजी महासचिव कमलेश शर्मा यांनी यूपीएससी परिक्षेतील यशस्विताना दिला.
डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) तर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा-२०१७ मधील यशस्वितांच्या १०व्या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अॅकॅडमीच्या माजी संचालिका श्रीमती अरूणा एम.बहुगुणा व भूतपूर्व एयर चीफ मार्शल ए.वाय. टिपणीस हे सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, उपकुलगुरू प्रा.डॉ.एम.मुरूगानंत, कुलसचिव प्रा.डी.पी. आपटे, प्रा.डॉ. सायली गणकर, प्रा.डॉ.शैलश्री हरिदास व प्रा. डॉ.आर.एम. चिटणीस हे उपस्थित होते.
या सोहळ्यात देशातून प्रथम आलेला अनुदीप धुरीशेट्टी, द्वितिय आलेली अनु कुमारी आणि तिसरा आलेला सचिन गुप्ता या तिघांना अनुक्रमे ५१०००/- , ३१०००/- व २१०००/- अशी रोख पारितोषिकेही देण्यात आली. त्याचबरोबर इतर यशस्वितांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, मानपत्र व पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरुप होते.
कमलेश शर्मा म्हणाले,“ समाजामध्ये सेवाकार्य करतांना ज्ञानच तुम्हाला वाचवू शकते. अशा वेळेस सदैव प्रत्येक गोष्टीतून नव-नवीन शिकत राहावे. अज्ञान आणि विस्मृतीमुळेच मानवाची सदैव पिछेहाट झाली आहे. प्रशासकीय सेवेत क्षणा-क्षणाला मागे ओढण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे आत्मविश्वासाने सर्व समाजाला जोडण्याचे कार्य करावे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये महत्वकांक्षा जागृत करण्याचे कार्य विविध प्रकारचे मार्गदर्शक करीत असतात. त्यापासून प्रेरणा घेऊन उंच उडी मारावयाची असते.”
ए.वाय.टिपणीस म्हणाले,“ कार्य संस्कृती, वक्तशीरपणा व सदैव नवीन शिकण्याच्या गुणांमुळे तुम्ही एक आदर्श प्रशासकीय अधिकारी बनू शकता. या सृष्टीवर हास्य टिकून राहण्यासाठी तुम्ही सदैव चेहर्यावर हास्य ठेऊन कार्य करावे. जनतेचे सेवक असल्याची भावना ठेवावी. तुम्ही कुठल्या पदावर किंवा कोणत्या क्षेत्रात काम करीत आहात, हे महत्वाचे नाही. तर ते कार्य तुम्ही किती मन लावून करता, यालाच खरे महत्व आहे. ”
श्रीमती अरूणा एम. बहुगुणा म्हणाल्या,“आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही समाजात परिवर्तनाची ज्योत पेटवू शकता. प्रशासकीय कार्य करतांना सर्वप्रथम स्वतःला प्रश्न विचारा, की हे बरोबर आहे का चूक. तुमच्या आतल्या आवाजाचा कानोसा घ्या. त्यानंतर निर्णय घ्या. तुमच्या चांगल्या निर्णयाला सर्वांचा विरोध असला तरी चालेल. पण तुम्ही त्या मार्गावरच एकटेच चालत रहा. हळू हळू सर्व लोग तुमच्या पाऊलावर पाऊल ठेवतील. महापुरूष असेच वागत आले.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“प्रशासनात काम करताना आपली मूल्ये जपली पाहिजेत.आपले चारित्र्य जपतांना प्रत्येक कार्यात शिस्त असावयास हवी. भारतीय संस्कृती, परंपरेला अनुसरुन काम केल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकते. समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्याचे व कठीण परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य तुमच्या अंगी बाणल्यास प्रत्येक कार्य यशस्वी होईल. सदैव असे कार्य करा की तुमच्या कार्याचा आदर्श नवी पिढी घेईल.”
सत्काराला उत्तर देताना अनुदीप धुरीशेट्टी म्हणाला,“ पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल, असे नाही. त्यामुळे अयशस्वी झाल्यावर निराश न होता त्याचा स्वीकार करून पुढची लढाई जिंकण्याची तयारी करा. त्यासाठी ५-६ वर्षापासून सचोटीने अभ्यास करून स्वतःला परिपूर्ण करा. कठोर परिश्रम हीच यशाची गुरूकुल्ली होऊ शकते त्यासाठी भरपूर अभ्यास करून स्वतःला विकसित करीत रहा.”
अनुकुमारी म्हणाली,“ आपण पाहिलेले स्वप्न अखंड परिश्रमाच्या जोरावर साकार करू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना तुमच्या सामोर अनेक विचित्र प्रसंगसुद्धा येतील. त्या परिस्थितीला घाबरून न जाता आपली वाटचाल चालू ठेऊन सर्व काही भविष्य काळावर सोपवा.”
सचिन गुप्ता म्हणाला,“ चेंजमेकर या भूमिकेतून आम्ही प्रशसकीय सेवेत कार्य करणार आहोत. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. वडिलांच्या प्रेरणेमुळेच मी येथपर्यंत पोहचू शकलो. एमआयटी डब्ल्यूपीयूचा हा उपक्रम खूपच चांगला आहे. येथे उपस्थित विद्यार्थ्यांनी सदैव निर्धाराने वाटचाल करावी. त्याचे फळ आपोआपच तुमच्या पदरात पडेल.”
प्रा. राहुल विश्वनाथ कराड यांनी या राष्ट्रीय सत्कार सोहळ्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली. ते म्हणाले आम्ही भारतीय छात्र संसद, इतकेच नव्हे, तर नॅशनल टीचर्स काँग्रेस व विमेन्स पार्लमेंटच्या द्वारा सर्व समाजात जागृती घडवून आणण्यचा प्रयत्न करीत आहोत. शासक व प्रशासक यांनी हातात हात घालून काम केल्यास विकास योजना वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.
प्रा.डी.पी. आपटे यांनी आपले विचार मांडले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. उपकुलगुरू प्रा.डॉ.मुरूगानंत यांनी आभार मानले.