पुणे :- आषाढी एकादशी निमित्त वारीत अन्न सुरक्षा व स्वछता अभियान राबवणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली . देहू व आळंदी येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीच्या मार्गावरील अन्न विक्रेते व अन्न छत्र चालवणाऱ्यांना हातमोजे, टोपी,अॅप्रन,आदींचा समावेश असलेले हायजिन किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान दिनांक ६ जुलै २०१८ व जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान ५ जुलै पासून पुणे जिल्ह्यातून पंढपूरकडे होणार आहे. देहू, आळंदी येथून पंढपूर पर्यंत सलग १९ दिवस चालणाऱ्या आषाढी वारीत महाराष्ट्रासह विविध प्रांतातून सुमारे १० ते १२ लाख भाविक सहभागी होत असतात. या कालावधीत पालखी मार्गावर हॉटेल, रेस्टॉरंट , फिरते विक्रेते हे अन्न पदार्थांची विक्री करत असतात. या कालावधीत सेवा भावी संस्था, सेवाभावी व्यक्ती, भाविकांना अन्नपदार्थ मोफत देत असतात.
यंदापासून अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अन्नछत्राच्या तपासण्या करून वारकरी व भाविकांना सुरक्षित व स्वच्छ अन्न उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच अन्न व्यावसायिकांचे सुरक्षा व स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. देहू ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मार्गावर अन्न प्रशासन, कोकाकोला इं. लि. आणि नेस्ले इं. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ” परिवर्तन अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान” हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून पालखी मार्गावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सुरक्षित अन्न पदार्थ तयार करण्याबाबत तसेच अन्न सुरक्षेबाबत तज्ञ प्रशिक्षक व अन्न सुरक्षा अधिकारी प्रशिक्षण देणार आहेत . या अन्न व्यावसायिकांना हातमोजे, टोपी,अॅप्रन,आदींचा समावेश असलेले हायजिन किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.