एमआय एम चे पाय चाटण्यापर्यंत पातळी खालावली काय ?
पुणे- एमआय एम चे पाय चाटण्यापर्यंत कॉंग्रेसच्या नेत्यांची पातळी खालावली काय? अशा आशयाची चर्चा शहरात सुरु झाली आहे . कॉंग्रेसला भाजपने नाही तर कॉंग्रेसच्या नेत्यांनीच नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न चालविले आहेत . स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असलेल्या कॉंग्रेस पक्षाची वाताहत चाललेली असतानाच माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांना लिहिलेले हे खरमरीत पत्र जसेच्या तसे वाचा …
प्रति,
मा. श्री. अशोकरावजी चव्हाण
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
विषय; एका स्वीकृत सदस्यपदासाठी जातीयवादी पक्षाशी घरोबा करणे कितपत योग्य ?
महोदय,
महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी दहा जागा मिळाल्याने स्वीकृत सदस्य कोणत्या पक्षाचा घ्यायचा याचा निर्णय चिठ्ठी काढून करावा लागणार आहे. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार पाच सदस्यांना सभागृहात स्वीकृत म्हणून घेता येते. प्रत्येक राजकीय पक्षाच्या संख्याबळानुसार ही सदस्य संख्या ठरते. महापालिकेत सर्वाधिक जागा मिळून सत्ताधारी ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला पाचपैकी तीन जागा मिळणार असून, विरोधी पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादीला एक जागा मिळणार आहे. एक जागा कोणत्या पक्षाला द्यायची याचा निर्णय चिठ्ठी काढून करावा लागणार आहे. सभागृहात पाचवा स्वीकृत सदस्य कोणाचा जाणार याचा निकाल चिठ्ठीवर होणार आहे. त्यामुळे पाचवा स्वीकृत सदस्य आपलाच असावा यासाठी आपल्या पक्षातील काही विद्वानांनी कोणताही विचार न करता एमआयएम या जातीयवादी पक्षाशी घरोबा करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. ज्या जातीयवादी पक्षाच्या प्रमुखाने आपल्या काँग्रेस पक्षाच्या हायकमांडच काय वरिष्ठ नेत्यांवर आगपाखड केली आहे अशांच्या दारात एका पदासाठी जाणे कितपत योग्य आहे? हा आमचा सवाल आहे. ज्या पदासाठी आपले काहीजण ”एमआयएम’शी सूत जुळविण्याचे प्रयत्न करीत आहेत,त्यांना कोणतेही भान नाही याचाच खेद वाटतो. एकप्रकारे आपल्या काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखविल्यासारखे आहे. ज्या निष्ठावंत कार्यकर्त्याने कडवी लढत दिली ;पण अपयश आले . पण प्रश्न असा आहे ज्या जातीयवादी पक्षाच्या उमेदवाराविरोधात आपल्या उमेदवाराने लढत दिली,त्याला या निर्णय प्रक्रियेमुळे काय वाटेल ? त्याच्या भावना काय असतील ? पक्षाप्रती त्याला काय वाटेल यापेक्षा अशाने पक्ष कमकुवत होणार नाही का ? याचा विचार न करता आपले काही विद्वान एमआयएम या जातीयवादी आणि काँग्रेसच्या हायकमांडवर टीकास्त्र करणाऱ्याबरोबर हातमिळवणी करीत आहेत, ते संयुक्तिक आहे का ? ही भावना काँग्रेसच्या निष्ठावंतांची आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता टिकला पाहिजे, तळागाळात काँग्रेस पक्ष रुजलेलाच पाहिजे पण एका पदासाठी लाचार होणे योग्य नव्हे . आम्ही पुण्यातील काँग्रेसची वाताहत बिलकुल होऊ देणार नाही. भविष्यात जर काँग्रेसलाच खरंच पूर्वीसारखे दिवस आणावयाचे असतील तर कार्यकर्त्यांच्या भावनांना प्राधान्य द्यावे लागणार आहे;अन्यथा विद्वानांच्या नादाला लागून काँग्रेस पक्षाची वाताहत होईल. नाही तरी पुण्यातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कुणाच्या हाती द्यावे हे आता प्राधान्याने ठरवावे लागणार आहे; अन्यथा पक्षाच्या पुण्यातील अस्तित्वासाठीही कार्यकर्ते राहणार नाहीत आणि महापालिकेतही पक्ष दिसणार नाही. कृपया आपण जातीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा आणि कार्यकर्त्यांना न्याय द्यावा ही आपणांस आग्रहाची विनंती
कळावे
आपला
आबा बागुल